निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील भाषणात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांची वृत्ती औरंगजेबासारखी असल्याचे म्हटले. शिवरायांच्या राज्यात अजूनही गद्दारांना थारा नाही हे जनता दाखवून देणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचा आत्मविश्वास ठाकरेंनी बोलून दाखविला. महाराष्ट्रात शिवरायांचा जन्म झाला. औरंगजेबाचा जन्म गुजरात मधील दाहोद येथे झाल्याचे सांगून यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यात औरंगजेबी वृत्ती आहे. त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे, मुंबई विकायची आहे अन मराठी माणूस संपावायचा आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. ‘याशिवाय मोदी नाही, औरंगजेब म्हणा’ अशी टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली होती. नरेंद्र मोदींचा जन्म गुजरातच्या ज्या गावात झाला त्या गावाजवळच औरंगजेबाचा जन्म झाला होता. याच कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरहे औरंगजेबासारखा विचार करतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावर आपल्या छोट्याश्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी औरंगजेब असा उल्लेख केल्याचा समाचारही घेतला. मला १०४ शिव्या आत्तापर्यंत देऊन झाल्या आहेत त्यात आता औरंगजेब ही भर पडल्याचा टोला त्यांनी लगावला. याच पार्श्वभूमीवर मुघल साम्राज्य आणि गुजरात यांच्यातील संबंध समजून घेणे समयोचित ठरणारे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक वाचा: भारत आणि पाकिस्तानात अकबर आणि औरंगजेब यांच्या परस्परविरोधी प्रतिमा का आढळतात?

गुजरात मुघलांचे की, मराठ्यांचे?

१७५२ साली अहमदाबाद मराठ्यांच्या हाती लागले आणि मुघल साम्राज्य संपुष्टात आले. अहमद शाह बहादूर या मुघल सम्राटाच्या कालखंडात मुघलांनी गुजरातवर असलेली आपली पकड कायमस्वरूपी गमावली. तोपर्यंत गुजरात हे मुघल साम्राज्याचा अविभाज्य अंग होते. मध्ययुगीन कालखंडात भारताच्या मोठ्या भू-भागावर मुघलांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. त्यात गुजरातचाही समावेश होता. १५७३ साली अकबराने मुझफ्फर शाह तिसरा (गुजरात सल्तनतमधील शेवटचा सुलतान) याचा पराभव करून गुजरात काबीज केलं. १५८४ मध्ये मुझफ्फरने आपले राज्य पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. त्यानंतर गुजरात नेहमीच मुघल आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात राहिले. जवळपास २०० वर्षं मुघलांचे अधिपत्य गुजरातवर होते. अहमदशहा बहादूर याच्या कालखंडात मुघलांची गुजरातवरील पकड कमी झाली, त्यामुळे अखेर १७५२ मध्ये गुजरात काबीज करण्यात मराठ्यांना यश आले. यानंतर काही काळासाठी मोमीन खानने गुजरात पुन्हा हस्तगत केले. परंतु १७५६ साली मुघलांचा मराठ्यांकडून पुन्हा पराभव झाला.

गुजरात काबीज करण्याचा मुघलांचा पहिला प्रयत्न- हुमायूनची स्वारी

१५३२ साली गुजरातचा सुलतान बहादूर शाहचे हुमायूनशी भांडण झाले होते. यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी बहादूर शाहने सुलतान मुहम्मद जमान मिर्झाला आश्रय दिला हे एक कारण होते. १५३५ साली हुमायूनने बहादूर शाहचा पराभव केला आणि सोरठ हा भाग वगळता संपूर्ण गुजरात राज्य मुघलांच्या अधिपत्याखाली आणले. त्याच दरम्यान शेरशाह सुरीने बिहार आणि जौनपूरमध्ये बंड केले, त्यामुळे हुमायूनला आग्र्याला परत जावे लागले. या राजकीय अस्थिरतेमुळे हुमायूनने गुजरात सोडताच बंडखोरी झाली. त्याचाच परिणाम मुघलांच्या पराभवात आणि हद्दपारीत झाला.

अकबराच्या अधिपत्याखालील गुजरात

१५७३ साली अकबराने गुजरात सुलतान मुझफ्फर शाह तिसरा याचा पराभव केला. आणि आपला मानस बंधू मिर्झा अझीझ कोका याची प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. मिर्झा अझीझ कोका याने गुजरात मधील महसूल व्यवस्थापन सुरळीत केले. आणि तोडरमल यांच्या साहाय्याने बंडखोरांना वश केले. यानंतर मुझफ्फर शाह याने काही काळासाठी गुजरात परत ताब्यात घेतले होते. पुढे परत झालेल्या पराभवामुळे त्याने आत्महत्या केली आणि गुजरात सल्तनत संपुष्टात आली. तसेच दीर्घ काळासाठी गुजरात मुघलांच्या ताब्यात गेले.

जहांगीरच्या राजवटीतील गुजरात

जहांगीरने त्याच्या कारकिर्दीत कुलीज खान याची गुजरातमध्ये नेमणूक केली. परंतु गुजरातमध्ये वारंवार होणाऱ्या बंडखोरीमुळे मुघल प्रतिनिधी वेळोवेळी बदलण्यात आले. त्यातील अब्दूल्ला खान बहादूर फिरोझ जंग हा महत्त्वाचा होता. त्याने अहमदनगरच्या निजामशाही विरुद्ध मोहीम हाती घेतली. जहांगीरच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १६१२ साली कारखाना स्थापन केला. जहांगीरने १६१८ साली शाहजहानला आपला पुढील प्रांतप्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. परंतु त्याने आपल्याच वडिलांविरुद्ध केलेल्या बंडखोरीमुळे त्याच्या जागी दावर बक्श याची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर सैफ खान याला १६२७ साली गुजरातचा प्रांत प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आले, जो जहांगीरचा कालखंड संपुष्टात येईपर्यंत या पदावर कायम होता.

अधिक वाचा: मोहम्मद बिन तुघलकला ‘लहरी मोहम्मद’ का म्हणायचे? जितेंद्र आव्हाडांनी थेट नोटबंदीच्या निर्णयाशी त्याचा संबंध का लावलाय?

शाहजहानचा कालखंड

शाहजहान हा १६२७ मध्ये मुघल सम्राट झाला. त्याने १६३२ ते १६३५ या कालखंडात चार वेगवेगळे प्रतिनिधी गुजरातमध्ये नेमले. त्याने १६४४ मध्ये औरंगजेबाची नेमणूक केली. परंतु औरंगजेबाच्या वादग्रस्त धार्मिक भूमिकेमुळे त्याच्या जागी १६५४ साली मुराद बक्श याची नेमणूक करण्यात आली. परंतु १६५७ शाहजहानच्या आजारपणाच्या बातमीनंतर मुराद बक्श याने शहाजहान आणि आपल्या भावाविरुद्ध विरुद्ध बंड पुकारले. परंतु औरंगजेबाने त्यांचा पराभव केला आणि त्याला बंदिवासात टाकून तो गुजरात आणि मुघलांचा निरंकुश शासक झाला.

औरंगजेबाच्या काळातील गुजरात

औरंगजेबाच्या हातात सत्ता आल्यावर त्याने त्याला मदत केलेल्या अनेकांना पारितोषिक जाहीर केली, शिवाय बऱ्याच भागातील प्रांतप्रतिनिधीही बदलले, त्यात गुजरातचाही समावेश होता. याच कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. १६८३ मध्ये अहमदाबादमध्ये पूर आला होता. तर १६८३ मध्ये भयंकर या भागाला दुष्काळाचा सामना करावा लागला. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दोलायमान झालेल्या परिस्थितीचा फायदा मराठ्यांना झाला, पेशवा बाळाजी विश्वनाथ गुजरामध्ये अहमदाबादपर्यंत आत शिरले, तत्कालीन प्रांतप्रतिनिधीने शरणागती पत्करत त्यांना प्रचंड खंडणी दिली. एकूणच या कालखंडात मुघल साम्राज्य खिळखिळे झाले होते. मुळातच औरंगजेबाच्या कालखंडात मुघल साम्राज्याचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली होती, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर गुजरातमधील मुघल सत्तेचा पूर्णतः ऱ्हास झाला. यानंतर मराठ्यांची सत्ता गुजरातमध्ये स्थापन झाली. तर १७५९ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने गुजरात काबीज केले. अशा प्रकारे मुघलांनी गुजरातवर गाजवलेली एकहाती सत्ता संपुष्टात आली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray and sanjay raut compare pm modi to aurangzeb what exactly is the relationship between gujarat and mughals svs