उत्तर प्रदेशमधील गुंड तसेच आमदार, खासदार राहिलेल्या अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची १५ एप्रिल रोजी हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी या दोघांवर गोळीबार केला. या दोघांनाही प्रयागराज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेले जात होते. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी या हत्येचे समर्थन केले आहे तर उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, असा आरोप विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर अतिक अहमद आणि अश्रफ अहमद हत्या प्रकरणात आतापर्यंत काय माहिती समोर आली आहे? हे जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली, प्रसिद्धी मिळावी म्हणून हत्या!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. लवलेश तिवारी (बांडा), अरुण मौर्य (कासगंज), सनी सिंह (हमीपूर) अशी या आरोपींची नावे आहेत. अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येमुळे प्रसिद्धी मिळावी तसेच या कृत्याचा भविष्यात फायदा व्हावा, म्हणून आम्ही त्या दोघांची हत्या केली, असे हल्लेखोरांनी सांगितले आहे.

हेही वाचा>>> विश्लेषण: दुधाच्या वाढत्या दराला काय ठरतेय कारणीभूत, नेमकं गणित समजून घ्या

सर्व जिल्ह्यांत कलम १४४ लागू

या घटनेनंतर पोलिसांनी अतिक अहमदचे घर असलेल्या प्रयागराजमधील छकिया या भागासह संपूर्ण उत्तर प्रदेशमधील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे. तसेच कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी उत्तर प्रदेशमधील सर्व जिल्ह्यांत सीआरपीसीच्या कलम १४४ नुसार जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. यासह प्रयागराजमध्ये इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.

अतिक, अहमद हत्येमध्ये आतापर्यंत काय समोर आले?

अतिक अहमद, अश्रफ अहमद यांची चौकशी जवळजवळ पूर्ण झाली होती. या दोघांना पुन्हा न्यायालयीन कोठडीत पाठवायचे होते. त्याआधी निहित प्रक्रियेनुसार दोघांचीही वैद्यकीय चाचणी करण्यासाठी त्यांना नेण्यात आले होते. पोलिसांच्या वाहनातून त्यांना उतरवण्यात आले आणि पोलीस संरक्षणात त्यांना रुग्णालयात चाचण्यांसाठी नेले जात होते. रुग्णालयापासून हे दोघेही हाकेच्या अंतरावर होते. या वेळी या दोघांना प्रश्न विचारण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी आले होते. अतिक अहमदने माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात केली होती. त्याच वेळी एक अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला. याच क्षणी अश्रफ अहमदवरही गोळीबार करण्यात आला. अश्रफच्या मानेत गोळी घुसली. त्यानंतर दोघेही जमिनीवर कोसळले. या गोळीबारात एका पोलिसालाही गोळी लागली. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा>>> आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या काकांना सीबीआयकडून अटक; त्यांनी आपल्याच भावाचा खून का केला?

वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणले असता गोळीबार!

२००५ साली झालेल्या उमेश पाल हत्याप्रकरणी न्यायालयीन सुनावणीसाठी या दोघांनाही प्रयागराज येथे आणण्यात आले होते. मात्र रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणले असता या दोघांवर गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या घटनेनंतर दोन हल्लेखोरांनी आत्मसमर्पण केले. त्यानंतर काही वेळाने तिसऱ्या हल्लेखोरानेही आत्मसमर्पण केले. हल्लेखोर पत्रकार असल्याचे भासवून रुग्णालय परिसरात दाखल झाले होते, अशी माहिती प्रयागराजचे पोलीस आयुक्त रोहित शर्मा यांनी दिली आहे.

आरोपींच्या नातेवाईकांची भूमिका काय?

आरोपींच्या नातेवाईकांनी ही घटना तसेच अटक केलेल्या आरोपींबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आरोपी लवलेशचे वडील यज्ञ तिवारी यांनी माझ्या मुलाला नोकरी नव्हती तसेच तो ड्रग्जच्या आहारी गेला होता, असे सांगितले आहे. “सदर घटना आम्ही टीव्हीवर पाहिली आहे. लवलेशने केलेल्या कृत्याबाबत आम्हाला कसलीही कल्पना नाही. तसेच लवलेशशी आमचा कोणताही संबंध नाही. तो मागील अनेक दिवसांपासून आमच्यासोबत राहात नाही. तसेच आमच्या परिवाराशी त्याचा संबंध नाही. तो पाच ते सहा दिवसांपूर्वी आमच्या घरी आला होता. मात्र आमचे त्याच्याशी मागील अनेक वर्षांपासून संवाद वा बोलणे नाही. त्याच्याविरोधात याआधीच एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्या प्रकरणात तो तुरुंगातही गेलेला आहे,” असे यज्ञ यांनी सांगितले.

हेही वाचा>>> उष्माघात म्हणजे काय? उन्हाची तीव्रता आरोग्यासाठी हानिकारक का ठरते?

तो गुन्हेगारी विश्वाकडे कसा वळला याची कल्पना नाही

दुसरा आरोपी सनी याचा भाऊ पिंटू यांनीदेखील या घटनेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. “सनी इकडे-तिकडे फिरायचा. तो काम करायचा नाही. आम्ही त्याच्यासोबत राहात नाही. तसेच तो गुन्हेगारी विश्वाकडे कसा वळला याबाबतही मला काही कल्पना नाही. सध्या जो प्रकार घडलेला आहे, याबाबत मला काहीही माहिती नाही,” असे पिंटू यांनी सांगितले.

अतिक अहमदने सुरक्षेची केली होती मागणी

अतिक अहमदचा मुलगा असद अहमद याची १३ एप्रिल रोजी पोलिसांशी चकमक झाली. या चकमकीत तो आणि त्याचा साथीदार गुलाम याचा मृत्यू झाला. मागील अनेक दिवसांपासून अतिक अहमदचे कुटुंबीय संरक्षण मागत होते. त्यांनी आमच्या जीविताला धोका आहे, आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, असे सांगितले होते. असद अहमदचे एन्काऊंटर झाले, त्याच्या साधारण एका महिन्याअगोदर अतिक अहमदने कोठडीदरम्यान संरक्षण मिळावे, अशी सर्वोच्च न्यायालयात मागणी केली होती.

अतिक अहमदच्या हत्येनंतर विरोधक आक्रमक

अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांच्या हत्येनंतर विरोधकांनी भाजपा तसेच उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. या घटनेनंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्वीट करीत “राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी कायदा मोडणे हे लोकशाहीसाठी चांगले नाही. सर्व कायदे आपल्या देशाच्या संविधानात लिहिलेले आहेत. कायदा हा सर्वोच्च आहे. एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी. मात्र हा न्याय कायद्याच्या चौकटीत व्हायला हवा,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

हेही वाचा>>> विश्लेषण: स्वदेशी हेलिकॉप्टरच क्षेपणास्त्र डागून पाडले…एमआय १७ हेलिकाॅप्टर दुर्घटना प्रकरणाचा निकाल काय? तो विशेष का?

…तर सामान्यांच्या सुरक्षेचे काय?

या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. “उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीने टोक गाठले आहे. पोलिसांचे संरक्षण असताना एखाद्याला गोळ्या घालून ठार केले जात असेल तर सामान्यांच्या सुरक्षेचे काय? लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. काही लोक हेतुपुरस्सर ही भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे वाटत आहे,” असे अखिलेश यादव म्हणाले आहेत.

चांगला आणि वाईटाचा हिशेब याच जन्मात केला जातो!

तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील जलशक्ती विभागाचे मंत्री तथा उत्तर प्रदेश भाजपाचे माजी अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी अतिक अहमद, अश्रफ अहमद यांच्या हत्येचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. “चांगला आणि वाईटाचा हिशेब याच जन्मात केला जातो,” असे स्वतंत्र देव सिंह ट्वीटद्वारे म्हणाले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मोहनलाल गंज यांनीदेखील अशाच आशयाचे ट्वीट केले आहे.

योगी सरकारच्या अपयशाचे हे एक उत्तम उदाहरण!

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश तसेच देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांना बेड्या ठोकलेल्या होत्या. पोलिसांचे संरक्षण असताना या दोन भावांची हत्या झाली आहे. यासह ‘जय श्रीराम’ असे नारे देण्यात आले. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या अपयशाचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या घटनेनंतर जे आनंद व्यक्त करीत आहेत, तेही यामध्ये तेवढेच जबाबदार आहेत. एखाद्याच्या हत्येनंतर सोहळा साजरा केला जात असेल तर येथील न्यायव्यवस्थेचा उपयोग काय आहे?” अशा भावना असुदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा>>> विश्लेषण: पुणे मेट्रोच्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा घोळ काय आहे? सुरक्षिततेबाबत प्रश्न का उपस्थित झाले?

अतिक अहमद कोण होता? त्याच्यावर काय आरोप होते?

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अतिक अहमदचा उत्तर प्रदेशमधील राजकारणातही चांगला दबदबा होता. त्याने पाच वेळा आमदारकी आणि एकदा खासदारकी भूषवलेली आहे. त्याने सर्वप्रथम १९८९ साली अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत तो विजयी झाला. त्यानंतर त्याने सलग दोन वेळा निवडणूक जिंकली. पुढे १९९६ साली समाजवादी पक्षात प्रवेश करून पुन्हा एकदा निवडणूक जिंकली. तीन वर्षांनंतर त्याने अपना दल पक्षात प्रवेश केला आणि २००२ साली पाचव्यांदा निवडणूक जिंकली. २००४ साली त्याने समाजवादी पक्षाच्या तिकिटावर फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. याच मतदारसंघातून कधी काळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीदेखील निवडणूक लढवली होती.

२५ जानेवारी २००५ रोजी राजू पाल यांची गोळ्या घालून हत्या

सपाचे नेते राजू पाल यांच्या हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर अतिक अहमदच्या अस्ताला सुरुवात झाली. २००५ साली अलाहाबाद पश्चिम मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अतिक अहमदचा भाऊ अश्रफ अहमदचा राजू पाल यांनी पराभव केला. हा पराभव अतिक अहमदच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. २५ जानेवारी २००५ रोजी राजू पाल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. संदीप यादव आणि देवी लाल या आपल्या साथीदारांसोबत घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर राजू पाल यांच्या पत्नीने अतिक अहमद, अश्रफ अहमद तसेच अन्य सात जणांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, दंगल घडवण्याचा प्रयत्न, असे आरोप करीत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा>>> शीख दंगलीप्रकरणी सीबीआयने काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्या आवाजाची चाचणी का केली? आवाजाचा नमुना पुरावा ठरू शकतो?

अखिलेश यादव यांनी अतिक अहमदपासून लांब राहणे पसंत केले

राजू पाल हत्याप्रकरणी राजकीय तसेच पोलिसांचा दबाव वाढल्यानंतर अतिक अहमदने २००८ साली आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर २०१२ साली त्याची सुटका झाली होती. पुढे त्याने समाजवादी पक्षाच्या तिकिटावर २०१४ सालची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र अतिक अहमदचा गुन्हेगारी इतिहास पाहता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी अतिक अहमदपासून लांब राहणे पसंत केले. त्यानंतर अतिकच्या अडचणी वाढतच गेल्या.

नरेंद्र मोदींविरोधात लढवली होती निवडणूक!

प्रयागराजमधील ‘सॅम हिगिनबॉटम युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर, टेक्नॉलॉजी ॲण्ड सायन्सेस’ प्राध्यापकांवर हल्ला केल्याप्रकरणी अतिक अहमदला २०१७ साली पोलिसांनी अटक केले होते. तुरुंगात असतानाही त्याने २०१९ साली नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्याला ८५५ मते मिळाली होती. वेगवेगळ्या माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार त्याच्याविरोधात ७० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, धमकी देणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

हेही वाचा>>> विश्लेषण: Camille Claudel: एका फ्रेंच (श)सकुंतलेची कहाणी नेमकी आहे तरी काय?

उमेश पाल हत्या प्रकरण काय आहे?

राजू पाल हत्या प्रकरणात उमेश पाल हे साक्षीदार होते. मात्र त्यांचीदेखील याच वर्षातील २४ फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली. उमेश पाल यांच्या पत्नीने अतिक अहमदवर गंभीर आरोप केले होते. माझ्या पतीच्या हत्येबाबत मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, असा दावा उमेश पाल यांच्या पत्नीने केला होता. तसेच उमेश पाल यांचे २००६ साली अपहरण करण्यात आले होते. उमेश पाल यांना अतिक अहमदने माझ्या बाजूने साक्ष दे, अशी धमकी या वेळी दिली होती, असाही दावा उमेश पाल यांच्या पत्नीने केला होता. प्रयागराजमधील स्थानिक न्यायालयातून परतताना उमेश पाल यांच्यासह दोन पोलिसांचीही हत्या करण्यात आली होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh atiq ahmed ashraf ahmed murder know detail information prd
Show comments