What is the history of India Vasco da Gama? भारतीय उपखंडाच्या इतिहातील एक सुवर्णपर्व म्हणून सागरी व्यापाराकडे पाहिले जाते. भारताला सिंधू संस्कृतीच्या कालखंडापासून समुद्रमार्गे चालणाऱ्या व्यापाराची परंपरा आहे. वेगवेगळ्या कालखंडात भारताचा व्यापार हा इतर प्रदेशांशी होत होता. ग्रीक आणि रोम बरोबर झालेल्या सागरी व्यापाराला प्रदीर्घ ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. भारतातून गरम मसाले, मौल्यवान रत्न, सुती कापड यांसारख्या अनेक वस्तूंची निर्यात होत होती. भारताकडे येणाऱ्या याच समृद्धीची भुरळ अनेकांना पडली. मध्ययुगात भारतीय सागरी व्यापारावर अरबांचे वर्चस्व होते. तर नंतरच्या कालखंडात पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज या युरोपियन शक्तींचे प्राबल्य आणि त्यानिमित्ताने सत्तास्थापना हा सर्वश्रुत इतिहास आहे. याच इतिहासाचे पर्व वास्को द गामाच्या आगमनाने सुरु झाले. ८ जुलै १४९७ रोजी वास्को द गामाने भारताच्या दिशेने पाऊल टाकले, आणि त्यानंतर व्यापाराच्या निमित्ताने सुरू झालेल्या अमानवी अत्याचारांची परंपरा आजही मन सुन्न करणारी आहे. त्याच इतिहासाचा घेतलेला हा आढावा.

अधिक वाचा: फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवरायांची बखर; बखर म्हणजे नेमकं काय?

Kirit Somaiya
Kirit Somaiya : पक्षाचा आदेश धुडकावल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “साडेपाच वर्ष…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?

१५ वं शतक भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचं शतक मानलं जातं. मुळातच इस्लामी सुलतानांनी अतिक्रमण केलेल्या देशात आणखी एका संकटाने इशारा दिला. १४९८ साली भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर, पोर्तुगालहून आलेल्या वास्को द गामाने पहिले पाऊल टाकले आणि या पर्वाला सुरुवात झाली. भारतीय किनाऱ्यावर येणारे पोर्तुगीज हे पहिले युरोपीय व्यापारी होते. भारतीय व्यापारामुळे होणारा प्रचंड नफा आणि मिळणारी समृद्धी याविषयीच्या कथांमधून प्रेरित होऊन ‘वास्को द गामा’ दीर्घ प्रवास करून भारतापर्यंत पोहोचला होता.

पार्श्वभूमी..What is the Vasco da Gama famous for?

हेन्री हा पोर्तुगालचा राजकुमार व पोर्तुगीज शोध मोहिमांचा आश्रयदाता होता. आफ्रिकेचा पश्चिम किनारा व मादीरा बेटांवरील वसाहतींसाठी तो कारणीभूत होता (संदर्भ: मराठी विश्वकोश). म्हणूनच तो ‘हेन्री द नॅव्हिगेटर’ (१३९४-१४६०) म्हणून ओळखला जात होता. हेन्री याने उत्तर पश्चिमी आफ्रिकेतील केऊटा या बंदरावर पोर्तुगीज सत्ता प्रस्थापित केली होती. तेथे असताना त्याला खुष्कीच्या मार्गाने होणारा पूर्वेकडील व्यापार, त्यातून होणारा प्रचंड नफा आणि जायफळ, लवंग, दालचिनी सारखे मसाले आणि पूर्वेकडील प्रचंड मोठ्या बाजारपेठांविषयी माहिती मिळू लागली. त्यावेळी पूर्वेकडील खुष्कीच्या व्यापारी मार्गावर अरबांचे वर्चस्व होते. या व्यापारात आपलाही फायदा व्हावा या दृष्टीने सागरी मार्ग शोधून, अरबांचा या व्यापारावरील वरचष्मा त्याला संपवायचा होता. १४१८ मध्ये हेन्री पोर्तुगालमध्ये परत आला, त्याने नवीन व्यापारी मार्ग शोधण्याच्या मोहीमा हाती घेतल्या. त्याच्या मृत्यूनंतर अशाच एका मोहिमेत १४८७ साली ‘बार्थोलोमेऊ डियाझ’ला ‘टेम्पेस्ट’च्या भूशिरापर्यंत जाणे शक्य झाले, याच भूशिराचे नाव पुढे ‘केप ऑफ गुडहोप’ असे पडले. येथूनच भारताकडे पोहचण्याचा मार्ग सापडेल याविषयी विश्वास असल्याने हे नाव पडल्याचे मानले जाते. बार्थोलोमेऊ डियाझ हा पोर्तुगीज नाविक आणि शोधक होता. आफ्रिकेच्या दक्षिणेकडील टोकाला फेरी मारणारा आणि जहाजांसाठी सर्वात प्रभावी दक्षिणेकडील मार्ग आफ्रिकन किनारपट्टीच्या पश्चिमेस असलेल्या खुल्या महासागरात आहे, हे दाखवणारा तो पहिला युरोपियन दर्यावर्दी ठरला.

गुजराती व्यापारी ठरला वास्को द गामाचा मार्गदर्शक

बार्थोलोमेऊ डियाझनंतर हा मार्ग शोधण्याची जबाबदारी वास्को द गामावर सोपवण्यात आली. वास्को द गामाने ८ जुलै १४९७ रोजी पोर्तुगालची राजधानी ‘लिस्बन’ जवळील ‘बेलेम’ येथून ‘सान गेब्रीअल’ या १२० टन वजनाच्या जहाजातून हा प्रवास सुरु केला. या काफिल्यात मुख्य सान गेब्रीअल वगळता ‘सान राफे ब्रिओ’ किंवा ‘सान मिगुएल’ आणि एक पुरवठा जहाज यांचा सहभाग होता. हा काफिला घेऊन गामा पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील मेलिंदी येथे पोहोचला. आणि भारताकडे जाणाऱ्या मार्गाविषयी चर्चा करू लागला. इथे त्याची भेट भारताकडे जाण्यासाठी उपयुक्त वारे आणि मार्गाची संपूर्ण माहिती असलेल्या ‘कांजी’ नावाच्या एका गुजराती मालीम किंवा तांडेलाशी झाली. कांजीने ५० सुवर्ण मुद्रांच्या मोबदल्यात हा मार्ग दाखवण्याचे कबूल केले. वास्को द गामा मेलिंदी येथून निघून, अरबी समुद्र पार करत कलिकत जवळ ‘कप्पड’ च्या किनाऱ्यावर ११ मे रोजी उतरला. वास्को द गामाचे भारताच्या किनाऱ्यावर पोहोचणे ही नौकानयन क्षेत्रातील आणि जगातील समुद्रावर पोर्तुगालच्या राजाची मालकी असल्याचा दृष्टिकोन प्रस्थापित करणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. इतकेच नाही तर वास्को द गामाचे मुख्य जहाज ‘सान गॅब्रियाल’ आणि त्यावरील २० तोफा आणि काफिल्यातील इतर जहाजांवरील तोफांची प्रचंड प्रमाणात विध्वंस करण्याची क्षमता, पापल बुल या ख्रिस्ती धर्मगुरूचा धर्मप्रसाराचा आदेश आणि ते घेऊन येणारे पोर्तुगीज यांचा उद्देश भविष्यातील भयानक परिणामाचे द्योतकच होते. या समुद्र मार्गाचा शोध पोर्तुगालने लावल्यामुळे जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन पोर्तुगालला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आणि पोर्तुगालचा उदय पूर्वेकडील मुख्य व्यापारी केंद्र म्हणून झाला. (संदर्भ: डॉ. सचिन पेंडसे: मराठा आरमार एक अनोखे पर्व, २०१७, पुणे)..

Vasco da Gama before the Zamorin of Calicut, by Veloso Salgado, 1898
वास्को द गामा आणि भारतीय राजा झामोरिन यांची भेट (Vasco da Gama before the Zamorin of Calicut, by Veloso Salgado, 1898)
सौजन्य: विकिपीडिया

वास्को द गामा आणि भारतीय राजा झामोरिन यांची भेट

वास्को द गामाने भारतीय किनारपट्टीवर पाय ठेवताच, त्याची भेट स्थानिक राजा झामोरिन याच्याशी झाली. ही भेट २५ मे १४९८ रोजी झाली. राजाने आपल्या पद्धतीने स्वागत केले तर गामाने भेट वस्तू देऊन सलोखा वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीच गामाचे आगमन हे व्यापारापुरतेच मर्यादित होते. राजाने इतर व्यापाऱ्यांप्रमाणे त्यालाही कर भरण्यास सांगितले. वास्को द गामा हा कलिकतमध्ये १०१ दिवस राहिला. २९ ऑगस्ट १४९८ रोजी त्याने कालिकतहून पोर्तुगालकडे प्रयाण केले. गामाने कालिकतच्या शेजारी कप्पडच्या किनाऱ्यावर आठवण म्हणून एक संगमरवरी स्तंभ उभारला होता. जो आजही आपण पाहू शकतो.

The arrival of Vasco da Gama at Calicut, by Roque Gameiro, 1900
कालिकत येथे वास्को द गामाचे आगमन (The arrival of Vasco da Gama at Calicut, by Roque Gameiro, 1900) सौजन्य: विकिपीडिया

अधिक वाचा: विश्लेषण: दालचिनीचं ग्रीक कनेक्शन; भारतीय मसाल्यांना हजारो वर्षांचा इतिहास!

पोर्तुगीजांची पाय पसरण्यास सुरुवात

१५०० मध्ये वास्को द गामानंतर पेट्रो अल्वारेस काब्राल नावाचा हा दुसरा पोर्तुगीज खलाशी कलिकत येथे आला. त्याने व्यापाराच्या सोयीसाठी राजाच्या परवानगीने वखार/ गढी उभारली. या गढीचा उपयोग, स्थानिक माल विकत घेऊन, तो साठवून, वर्षास पोर्तुगालहून येणाऱ्या काफिल्याबरोबर पाठविण्यात येणार होता. इतकेच नाही तर त्याने कलिकत येथील अरब व्यापाऱ्यांना कलिकतहून व्यापार करण्यास मज्जाव करण्याचीही मागणी केली. ही मागणी सामुद्री राजाने फेटाळून लावली. त्याचा राग म्हणून काब्रालने कलिकत बंदरावरील जहाजे आणि शहरावर तोफा डागल्या. या घटनेमुळे सामुद्री राजा हा पोर्तुगालचा शत्रू झाला. परंतु आता येथे व्यापार करणे शक्य नसल्याचे काब्रालच्या लक्षात आले, म्हणून तो कोचीनच्या दिशेने गेला. तेथे त्याने कोचीनच्या राजाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. एकूणच त्यावेळी भारतीय किनारपट्टीवर दयनीय स्थिती होती. भारतीय सामुद्री किनारपट्टी अनेक राजांमध्ये विभागली गेली होती. या राज्यांमधील वैमनस्याचा फायदा या परकीय शत्रूंनी घेतला. या सर्व पार्श्वभूमीवर वास्को द गामाने पुन्हा भारताच्या दिशेने प्रवास सुरू केला. वाटेत मेलिंदीच्या राजाबरोबर मैत्री करून समुद्रावर आपली पकड घट्ट केली. भारतीय सागरात प्रवेश करून या समुद्रावरील आपले वर्चस्व सांगण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर अरब व्यापाऱ्यांना परवाना घेतल्याशिवाय या समुद्रात येण्यास मज्जाव करण्यात आला. कार्ताझ- परवाना घेणे सक्तीचे केले. अशा अनेक मार्गाने पोर्तुगीजांनी व्यापारावरील आपली पकड मजबूत केली.

अमानवी अत्याचार

आरमारी बळाच्या सामर्थ्यावर पोर्तुगीजांनी भारतीय व्यापारावर नियंत्रण मिळवायला सुरुवात केली होती. त्यांनी भटकळचे बंदर ताब्यात घेतले. या बंदरातून होणाऱ्या व्यापारावर खंडणी लादली. विशेष म्हणजे त्याला कुणीही विरोध केला नाही. गामाने मदयीच्या खाडीजवळ कालिकतहून येणारे ४०० यात्रेकरूंचे जहाजही जाळले होते. त्यात एकूण ३८० यात्रेकरूंचा अंत झाला, त्यात स्त्रिया आणि मुलांचाही समावेश होता. दरम्यान सामुद्री राजाने मैत्रीपूर्ण अनेक संदेश पाठवले परंतु ते गामाने धुडकावून लावले. यावरच गामा थांबला नाही. संदर्भानुसार त्याने २४ जहाजांचा ताफा अडवला, त्या जहाजांवरील ८०० खलाशांची नाक, कान कापले, हात आणि दात तोडून त्यांना एका जहाजात बसवून आग लावून किनाऱ्याकडे हाकारून दिले. या अमानुष घटनेमुळे राजा हादरून गेला. स्थानिक नायर समाजाने राजाला पोर्तुगीजांना हाकलून देण्याची मागणी केली होती. म्हणूनच सामुद्री राजाने तालापन्नीच्या नंबुद्री ब्राह्मणांना वास्को द गामाकडे पाठवले. परंतु गामाने त्यांचे प्रचंड हाल केले. त्यांचे कान-नाक कापले. कानाच्या जागी डुकराचे कान शिवून त्यांना परत सामुद्री राजाकडे पाठवले. सरतेशेवटी एकटा सामुद्री राजाच पोर्तुगीजांविरुद्ध लढा देण्यासाठी उरला आणि त्याने लढा दिलाही. परंतु यश मात्र आले नाही. आणि पुढील ६० वर्ष पोर्तुगीजांनी भारतीय सागरी व्यापारावर बिनविरोध वर्चस्व गाजवले.

संदर्भ:
Life and Travels of Vasco Da Gama by K. D. Madan, 1998.
Career and legend of Vasco da Gama by Sanjay Subrahmanyam, 1998.
The Three Voyages of Vasco da Gama, and his Viceroyalty from the Lendas da India of Gaspar Correa: Accompanied by Original Documents by Henry E.J. Stanley, 2010.
मराठा आरमार एक अनोखे पर्व; डॉ. सचिन पेंडसे,  २०१७.