भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) २१ ऑक्टोबर रोजी गगनयान मोहिमेची पहिली उड्डाण चाचणी घेणार आहे. शनिवारी सकाळी ८ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात ही चाचणी पार पडेल. इस्त्रोने ट्विट करून ही माहिती दिली. कोविडच्या काळाच्या आधीपासून गगनयान मोहिमेची तयारी सुरू होती. आता ही तयारी अंतिम टप्प्यात आली असून यानाची चाचणी शनिवारी पार पडेल. या पार्श्वभूमीवर गगनयान मोहीम काय आहे, गगनयान मोहिमेची चाचणी होणे हे महत्त्वपूर्ण का आहे आणि भविष्यात मानव अंतराळात जाऊ शकेल का, हे जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरेल.

इस्त्रोने ट्विट करून गगनयान मोहिमेची उड्डाण चाचणी २१ ऑक्टोबर, २०२३ रोजी सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान श्रीहरिकोटा येथे होईल, असे सांगितले आहे. गगनयान मोहिमेमधून मानव अवकाशात जाण्याची तसेच भविष्यात अवकाश स्थानक स्थापन होण्याची शक्यता आहे. गगनयान मोहिमेत एकूण दोन मानवरहित उड्डाणे होणार असून नंतर भारतीय व्यक्तींना अवकाशाची सफर करण्याची संधी मिळणार आहे.

Loksatta kutuhal Artificial intelligence based sports equipment
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित क्रीडा उपकरणे
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
israel anti missile system
विश्लेषण: इस्रायलप्रमाणे भारताकडेही परिणामकारक क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा आहे का?
How important is sevens table in life | Inspirational Video
आयुष्यात सातचा पाढा किती महत्त्वाचा आहे! प्रत्येक आकडा सांगतो वयाचे महत्त्व, VIDEO एकदा पाहाच
tafe interim victory over massey ferguson brand ownership dispute
मॅसी फर्ग्युसनच्या मालकी विवादावर ‘टॅफे’ला अंतरिम दिलासा
Loksatta explained Will the study of Future Warfare change the strategy of the Indian Army
‘भविष्यातील युद्धतंत्र’ अभ्यासातून भारतीय सैन्याची रणनीती बदलणार का?
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
venus mission isro
काय आहे इस्रोचे ‘मिशन व्हीनस’? इस्रोला शुक्राचा अभ्यास का करायचा आहे? जाणून घ्या या मोहिमेचे उद्दिष्ट

काय आहे गगनयान मोहीम ?

गगनयान प्रकल्प, मानवयुक्त अंतराळ मोहिमा पाठविण्याची भारताची क्षमता दाखवत आहे.
आत्तापर्यंत भारतासह विविध देशांच्या अंतराळवीरांनी अवकाश वारी केली. रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच स्वबळावर म्हणजेच स्वतःच्या रॉकेटच्या–प्रक्षेपकाच्या साहाय्याने अवकाशात अंतराळवीरांना पाठवलेले आहे. आता चौथा देश म्हणून भारत या पंक्तीत बसेल. म्हणजेच भारत स्वबळावर देशाच्या नागरिकांना अवकाशात पाठवणार असून या मोहिमेला ‘गगनयान’ हे नाव देण्यात आलं. गगनयान मोहिमेसाठी अवकाशात जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले GSLV Mk3 हे प्रक्षेपक रॉकेट सज्ज आहे, तर अंतराळवीर ज्या यानातून प्रवास करणार आहेत, त्या क्रू मॉडेलच्या प्रत्यक्ष चाचण्या घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा : मध्य प्रदेशमध्ये प्रादेशिक पक्ष बिघडवणार भाजपा-काँग्रेसच्या मतांचे गणित? काय सांगते जुनी आकडेवारी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या मोहिमेची घोषणा केली होती. गगनयान २०२२ मध्ये प्रक्षेपित होणे अपेक्षित होते. परंतु, कोविड काळामुळे या मोहिमेला विलंब झाला. ही मोहीम यशस्वी झाली तर मानवयुक्त अंतराळ मोहीम करणारा भारत चौथा देश ठरेल. साधारण गगनयान मोहीम इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहिमेमध्ये अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. गगनयान हे भारतीय अंतराळ संस्थेची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलातील वैमानिक अंतराळवीर म्हणून अंतराळात जातील. यासाठी त्यांचं प्रशिक्षणही सुरू आहे. गगनयान अंतराळ मोहिमेसाठी पहिले रोबोट तयार केले जात आहेत. आधी रोबोटिक चाचणी होईल, त्यानंतर मानवाला अंतराळात पाठवलं जाईल.
आज प्रत्येक देश जमिनीवर स्वतःची जागा मिळवत असताना अवकाशातही स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा सर्व देशांचा प्रयत्न आहे. तसेच अवकाशातही चंद्र आणि अन्य ग्रहांवर संशोधन सुरू आहे.

इस्रोने सांगितल्यानुसार, “गगनयान मोहिमेसाठी अनेक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहेत. या यानामधून अंतराळवीरांना सुरक्षित नेणे-आणणे हे महत्त्वाचे आहे. प्रक्षेपण, ‘क्रू’ला जीवनावश्यक सुविधा, संकटकालीन सुविधा, अंतराळात जाण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण, व्यवस्थापन अशा अनेक घटकांचा विचार तंत्रज्ञान निर्मितीवेळी केलेला आहे.

मानवी अंतराळ उड्डाण मोहीम होण्याआधी तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जाते, प्रात्यक्षिके घेतली जातात. या प्रात्यक्षिक मोहिमांमध्ये इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट (IADT), पॅड अॅबॉर्ट टेस्ट (PAT) आणि टेस्ट व्हेईकल (टीव्ही) यांचा समावेश आहे. सर्व यंत्रणा किती सुरक्षित आणि विश्वासार्ह आहेत, याची चाचणी दोन मानवरहित चाचण्या घेऊन करण्यात येईल.”

गगनयान मोहीम महत्त्वाची का आहे ?

गगनयान या मोहिमेमध्ये दोन मानवरहित उड्डाणानंतर मानवाला अंतराळात घेऊन जाणारे उड्डाण होईल. स्वबळावर मानवाला अवकाशात घेऊन जाणारा भारत हा चौथा देश ठरेल. १२ एप्रिल, १९६१ रोजी रशियाचे युरी गागारिन १०८ मिनिटे अंतराळात राहणारे पहिले नागरिक ठरले होते. भारताचे राकेश शर्मा हे ३ एप्रिल, १९८४ रोजी रशियाच्या सोयुज टी-११ या यानाने अंतराळात गेले होते. २० जुलै, १९६९ रोजी अमेरिकेच्या नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते.

गगनयानमध्ये मानवी मॉड्यूल वापरणार आहे. ४०० किलोमीटर उंचीवर हे यान जाणार आहे. हे यान ५.३ टनांचे (१२,००० पौंड) आहे. या यानातून तीन अंतराळवीर सात दिवसांच्या अवकाश मोहिमेनंतर पृथ्वीवर सुरक्षितपणे परत येणे अपेक्षित आहे.
अंतराळ यानामध्ये जीवनप्रणाली आणि वातावरण नियंत्रणप्रणाली असेल. आपत्कालीन अवस्थेत मोहीम थांबवण्याची क्षमता आणि अंतराळवीरांना बाहेर पडण्यासाठी आवश्यक प्रणाली (क्रू एस्केप सिस्टम – सीईएस)ने सुसज्ज असेल. याची चाचणी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मानवरहित उड्डाणावेळी घेतली जाऊ शकते.
इस्रोचे प्रमुख सोमनाथ म्हणाले होते की, पहिल्या चाचणी उड्डाणानंतर या मोहिमेतील D2, D3, D4 या आणखी तीन चाचणी मोहिमांची योजना आखण्यात आल्या आहेत. थोडक्यात, आता चाचणीमध्ये जिवंत व्यक्तीला अंतराळात पाठवणे, तसेच आणीबाणीच्या काळात अंतराळवीरांना वाचवण्यासाठी क्रू एस्केप सिस्टम किती प्रभावीपणे कार्य करते, याची चाचणी करेल.
या मोहिमेचं महत्त्व म्हणजे मानवी मोहिमा आखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता तपासणे, अवकाशामध्ये वैद्यकीय, जैवअवकाशीय आणि अभियांत्रिकीचे प्रयोग करणे, अवकाशातील यानांचे प्रक्षेपण आणि एखाद्या अपेक्षित ठिकाणी यान पोहोचवणे व थांबवणे असे प्रयोग करणे, अवकाश स्थानकाची निर्मिती आणि अन्य ग्रहांवरील मानवी मोहिमांसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थांबरोबर सहकार्य वाढविण्यास मदत, भविष्यातील जागतिक अवकाश स्थानकाचा विकास आणि राष्ट्रीय हिताच्या संशोधनामध्ये भारताचे स्थान निर्माण करणे, अवकाश क्षेत्रातील तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सहकार्याचे व्यासपीठ तयार करणे असे अनेकांगी आहेत.

चाचणी कशाप्रकारे होईल ?

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र (SDSC) येथून उड्डाण केल्यापासून १६ मिनिटांनी रॉकेट अंतराळयानाला पृथ्वीच्या ३००-४०० किमी (१९०-२५० मैल) कक्षेत नेऊन सोडेल. लँडिंगसाठी तयार झाल्यावर, त्याचे सर्व्हिस मॉड्यूल आणि सौर पॅनेल पुन्हा प्रवेश करण्यापूर्वी नष्ट केले जातील. बंगालच्या उपसागरात पॅराशूट स्प्लॅशडाउनसाठी परत येईल. चाचणी यानामध्ये क्रू मॉड्यूल (सीएम), क्रू एस्केप सिस्टम (सीईएस), सीएम फेअरिंग (CMF), इंटरफेस अडॅप्टर यांचा समावेश असेल.

व्योमनॉट्स कोण आहेत?

गगनयान मोहिमेत मानव अंतराळात जाणार आहे. अंतराळवीर ज्या यानातून प्रवास करणार आहेत, त्या क्रू मॉडेलच्या प्रत्यक्ष चाचण्या लवकरच होतील. अवकाशात जाणाऱ्या संभाव्य अंतराळवीरांचे प्रशिक्षण हे रशियात अंतिम टप्प्यात पोहचलं आहे. गगनयानच्या दोन प्राथमिक मोहिमा होतील, ज्यामध्ये अंतराळवीराचा सहभाग नसेल तर इस्त्रोनेच तयार केलेला रोबोट अवकाश वारी करतील. या मोहिमा सुरक्षित पार पडल्यावर भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येईल. आपल्या देशाच्या अंतराळवीरांना vyomanauts – व्योमनॉट्स असंही संबोधलं जाईल.

२०३५ पर्यंत होईल भारतीय अंतराळ केंद्र!

चांद्रयान मोहिमेला मिळणारे यश बघून पंतप्रधानांनी मंगळवारी इस्रोसाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे सांगितली. यामध्ये २०३५ मध्ये भारतीय अंतराळ केंद्र स्थापन करणे आणि २०४० पर्यंत चंद्रावर भारतीयांना पाठवता येणे, याचा समावेश आहे. आदित्य एल १, चांद्रयान ३ या मोहिमांना मिळत असणाऱ्या यशाबद्दल त्यांनी कौतुकही केले.