भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत केंद्राने भारतीय ध्वज संहितेत काही मोठे बदल केले आहेत. या बदलानंतर आता दिवस आणि रात्र तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच यापुढे पॉलिस्टर आणि मशीनपासून बनवलेला राष्ट्रध्वजासही वंदन करता येणार आहे. मात्र, भारताची नेमकी ध्वज संहिता काय आहे आपण जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- विश्लेषण : लोकांनी बँकांमधून पैसे काढू नयेत म्हणून चिनी सरकारने बँकांबाहेर तैनात केले रणगाडे? चीनमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

भारतीय ध्वज काय आहे आणि यात कोणते बदल केले आहे

२० जुलै २०२२ रोजी केंद्र सरकारच्या आदेशानंतर भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानंतर, आता दिवस रात्र म्हणजे २४ तास तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी केवळ सुर्यादय ते सुर्यास्तापर्यंतच तिरंगा फडकवण्याची परवानगी होती. एवढचं नाही तर सुधारीत नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी किंवा नागरिकांच्या निवास्थानी तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तसेच यापूर्वी हाताने विणलेल्या किंवा हाताने तयार केलेल्या राष्ट्रध्वजालाच परवानगी होती. तसेच मशीनवर आणि पॉलिस्टरने बनवलेले राष्ट्रध्वज वापरण्यास परवानगी नव्हती. मात्र, आता कापूस, रेशीम, खादीसोबत पॉलिस्टरचा वापर करुन मशीनवर बनवलेल्या ध्वजाला वंदन करता येणार आहे.

हेही वाचा- विश्लेषण: आखाती देशांमध्ये भारतीय मजूर मृत्युमुखी का पडतायत?

केंद्र सरकारची ‘हर घर तिरंगा मोहीम’ काय आहे ?

केंद्र सरकारची ‘हर घर तिरंगा मोहिमे’अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या घराच्या गच्चीवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले आहे. या आवाहनानंतर २० कोटीहून अधिक या मोहिमेत सहभाग घेतील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. या मोहिमेत सरकारी आणि खासगी आस्थापनेही सहभाग घेणार आहेत. या मोहिमेसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने तीन प्रकारचे ध्वज तयार करण्याची व्यवस्था केली आहे. हे ध्वज पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असतील. तसेच लोक ऑनलाइनच्या माध्यमातूनही तिरंगा खरेदी करु शकतात.

या गोष्टींचे भान ठेवण्याची गरज

ध्वजाचा वापर कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी केला जाऊ नये. कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला सलामी देण्यासाठी ध्वज उतरवला जाऊ नये. ध्वजाचा वापर गणवेश किंवा पोशाख म्हणून करू नये. रुमाल, उशी किंवा इतर कोणत्याही ड्रेसवर तिरंगा छापता येणार नाही. तसेच इमारत झाकण्यासाठी ध्वजाचा वापर केला जाऊ नये. ध्वजावर कोणतीही जाहिरात किंवा सूचना लिहण्यास बंदी घालण्यात आली आहे. ध्वजाचा वापर वाहन किंवा छताला झाकण्यासाठी केला जाऊ नये. दुसरा कोणताही ध्वज भारतीय ध्वजाच्या समान उंचीवर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवर फडकवला जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the flag code of india and what changes has by central government dpj