Where is Purandare Wada from Tumbbad Moive: दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा ‘तुंबाड’ चित्रपट दुसऱ्यांदा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पुनः प्रदर्शित करण्यात आला असूनही या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट २०१८ साली पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु त्यावेळी अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. आता तोच चित्रपट परत प्रदर्शित केल्यानंतर या चित्रपटाने सात दिवसातच आधीपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटातील अनेक पैलूंनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे या चित्रपटात दिसणारा वाडा. हा वाडा नक्की कुठे आहे? आणि त्या वाड्याचा नेमका इतिहास काय? याचा घेतलेला हा आढावा.

अधिक वाचा: R. D. Banerjee-Mohenjo-Daro Man: मोहेंजोदारो मॅनचं पुढं झालं काय? १०० वर्षांनंतरही गूढ कायम.

हा वाडा कुठे आहे?

तुंबाड या चित्रपटात दिसणारा हा वाडा पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सासवड येथे आहे. या वाड्याची ओळख पुरंदरे वाडा अशी आहे. सासवडचा इतिहास अनेक शतकं मागे जात असला तरी १७ व्या शतकात मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. बाळाजी विश्वनाथ भट यांचा पेशवे म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी हे शहर पेशव्यांच्या हाती सुपूर्त केले. त्यानंतर या शहरात ज्या काही महत्त्वाच्या वास्तूंची निर्मिती झाली त्यात पुरंदरे वाड्याचा समावेश होता. मराठाकालीन शहर रचना समजावून घेण्यासाठी सासवड हे उत्तम उदाहरण आहे. सासवड येथे कऱ्हा नदीच्या काठावर या कालखंडात परिवर्तन दिसून आले. मराठा शहर रचनेच्या नियमांचे पालन करून या गावाचा विस्तार करण्यात आला होता. सुरुवातीला लहान समूहांच्या वाड्या तयार करण्यात आल्या. कालांतराने पेठा आणि पूरं मूळ गावाच्या क्षेत्रात वसवण्यात आली आणि हळूहळू या क्षेत्राचा विस्तार झाला. सासवड गाव कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे होते त्यामुळे या गावाला सखोल असा मध्ययुगीन इतिहास आहे.

ब्रिटीश कलाकार रॉबर्ट मेलव्हिल ग्रिंडले यांनी १८१३ साली संगमेश्वर मंदिरातून रेखाटलेले सासवड.चित्रात पुरंदरे वाडा दिसत आहे.
(सौजन्य: विकिपीडिया)

वाड्याची भव्यता

मूलतः सासवड गावात पुरंदरे यांचे दोन वाडे आहेत. त्यापैकी मुख्य वास्तू ही शनिवार वाड्याची प्रतिकृती दिसावी इतकी हुबेहूब आहे. तरीही ही वास्तू शनिवार वाडा बांधण्यापूर्वी २० वर्षे आधी बांधण्यात आली होती. हा वाडा १७१० साली अंबाजीपंत पुरंदरे यांनी बांधला. पुरंदरे वाडा सुमारे चार एकरांच्या क्षेत्रावर सातचौकी पद्धतीने उभारलेला आहे. सुमारे ३०० वर्षांपूर्वी कऱ्हाकाठीच्या खडकाळ परिसराची खास निवड करून हा मजबूत चिरेबंद तटबंदी असलेला आणि आत चार मजली असलेला वाडा बांधला गेला. हा वास्तूचा प्रकार हा भुईकोट असून तिची भव्यता मंत्रमुग्ध करणारी आहे. या वाड्याच्या सुमारे २५ फूट उंचीच्या प्रवेशद्वारापाशी उभं राहिल्यावर याची कल्पना येते. गजखिळ्यांनी युक्त दरवाजा हा या वाड्याच्या संरक्षणासाठी केलेली सोय दर्शवतो. द्वार शाखेवरील नक्षीकाम हे लक्ष वेधून घेणारे आहे. याशिवाय तटबंदी, बुरुज, सज्जे हे तत्कालीन स्थापत्य शैलीची साक्ष देतात.

तटबंदीच्या आत असणारा चारचौकी वाडा मात्र आता भग्न स्थितीत आहे. तटबंदीच्या भिंतीला लागूनच गणेशाच्या मंदिराचे प्रवेशद्वार आहे. या मंदिरातील मूर्ती द्विभुज आहे. या वाड्याच्या बांधकामावर रु. ५०,००० खर्च आला होता. या वाड्यात काही भित्तिचित्रं सुद्धा आहेत. या चित्रांमधून मध्ययुगीन चित्रकलेची कल्पना येते. या वाड्याच्याच शेजारी दुसरा वाडा आहे. या वाड्याचेही प्रवेशद्वार भव्य आहे. नगारखाना, भव्य दरवाजा आणि त्यावरील नक्षी काम हे लक्ष वेधून घेणारे आहेत. आज या दोन्ही वास्तू भग्न अवस्थेत असल्यातरी त्यांच्या अस्तित्त्वातून गतवैभवाची साक्ष मिळते.

अधिक वाचा: Anna Sebastian: कामाच्या अतिताणामुळे तरुणीचा मृत्यू; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कायद्यात केलेल्या सुधारणा या निमित्ताने चर्चेत!

अंबाजीपंत पुरंदरे कोण होते?

मराठा कालखंडात १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात सासवडच्या पुरंदरे कुटुंबाला महत्त्व होते. त्यांनी पेशव्यांच्या कारभारात प्रशासकाच्या रूपाने प्रमुख भूमिका बजावली होती. तसेच त्यांची राजधानीचा विकास, वाड्याचे बांधकाम, मंदिरांचे बांधकाम यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुलकर्णी वतनदार म्हणून त्रिंबक पुरंदरे होते. त्यांचेच वंशज म्हणजे अंबाजीपंत पुरंदरे. शाहू महाराज परत आल्यावर १७०८ साली साताऱ्याला त्यांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. १७१२ साली शाहू महाराजांच्या सेनापती पदावर असणाऱ्या मानसिंग मोरे यांच्या दिमतीस अंबाजीपंत पुरंदरे यांची नेमणूक झाली होती. १७२० साली बाजीरावास छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्याच वेळी अंबाजीपंत यांना मुतालिकीची वस्त्रे मिळाली होती. पुरंदरे मुतालिक म्हणून साताऱ्यास शाहूमहाराजांजवळ राहत होते. त्यांचे पुत्र हेही छत्रपतींच्या सेवेत होते. तत्कालीन अनेक शासकीय व्यवहारांमध्ये अंबाजीपंत यांची उपस्थिती असल्याचे दस्तऐवजांमधून दिसते. त्यांनी बाजीरावांविरुद्ध कारस्थान करणाऱ्या सरदारांना पत्रे लिहून त्यांचा बंदोबस्त केला. त्यांचा मृत्यू भाद्रपद शुद्ध ८, शके १६५६ (सन १७३५) ला माहुली येथे झाला.

सध्या पुरंदरे वाड्याची अवस्था बिकट आहे. तटबंदीच्या आतील वास्तू झपाट्याने ढासळत आहे. त्यामुळे या वस्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची निकड निर्माण झाली आहे.