केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी गुरुवारी नवी दिल्लीत २१ व्या पशुधन गणनेला प्रारंभ केला. जशी नागरिकांची जनगणना केली जाते, त्याचप्रमाणे इतर प्राण्यांसह गाई-गुरांचीदेखील गणना केली जाते. देशातील पाळीव प्राणी, कुक्कुटपालन व भटक्या प्राण्यांची दर पाच वर्षांनी गणना केली जाते. या गणनेत प्राण्यांच्या प्रजाती, वय, लिंग व मालकीची स्थिती याविषयी माहिती विचारात घेतली जाते. १९१९ पासून आतापर्यंत एकूण २० वेळा पशुधन गणना करण्यात आली आहे. त्यामध्ये शेवटची गणना २०१९ मध्ये करण्यात आली होती. २१ व्या पशुगणनेची प्रक्रिया ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.

पुढील काही महिन्यांत सुमारे ८७,००० प्रगणक माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक स्वतंत्र घर, अपार्टमेंट, उपक्रम, तसेच गोशाळा (गुरांचे गोठे), डेअरी फार्म, पोल्ट्री फार्म, पशुवैद्यकीय महाविद्यालये व संरक्षण आस्थापनांना भेट देतील. या पशुगणनेत भारतातील ३० कोटी कुटुंबांचा समावेश अपेक्षित आहे. पशुगणना म्हणजे नक्की काय? त्यामागील नेमका उद्देश काय? त्याविषयी जाणून घेऊ.

२१ व्या पशुगणनेत १६ प्राण्यांच्या प्रजातींची माहिती संकलित करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

२१ व्या पशुगणनेत कोणते प्राणी मोजले जातील?

२१ व्या पशुगणनेत १६ प्राण्यांच्या प्रजातींची माहिती संकलित करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, गयाळ (मिथुन), याक, मेंढ्या, शेळी, डुक्कर, उंट, घोडा, पोनी (लहान घोड्याचा प्रकार), खेचर, गाढव, कुत्रा, ससा व हत्ती यांचा समावेश होतो. आयसीएआर- नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस (एनबीएजीआर)द्वारे मान्यताप्राप्त या १६ प्रजातींच्या २१९ देशी जातींची माहिती या गणनेत घेतली जाईल. याव्यतिरिक्त पक्षी, कोंबडी, बदक, टर्की, लहान पक्षी, शहामृग व इमू यांसारख्या कुक्कुट पक्ष्यांचीही गणना केली जाईल.

हेही वाचा : लाहोरवर काजळी भारतामुळे? जगातील सर्वात प्रदूषित शहर होत ओढवली नामुष्की

पशुगणनेचे उद्दिष्ट काय?

ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात पशुधन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. उत्पादकतेच्या दृष्टीने विशेषत: कृषी क्षेत्रामध्ये कुक्कुटपालन आणि पशुपालन हे एकूण सकल मूल्यवर्धन (ग्रॉस व्हॅल्यू अ‍ॅडेड)च्या अंदाजे ३० टक्के योगदान देतात. एकूण अर्थव्यवस्थेत पशुधन क्षेत्राचे सकल मूल्यवर्धन अंदाजे ४.७% आहे. संपूर्ण कृषी क्षेत्राचे योगदान अंदाजे १५ टक्के आहे. सकल मूल्यवर्धन म्हणजेच जीव्हीए ही आर्थिक उत्पादकतेच्या मोजमापाची पद्धत आहे. इतर गोष्टींबरोबरच पशुधन क्षेत्रातील गणनेचा डेटा ‘जीव्हीए’च्या अंदाजासाठी वापरला जाईल.

तसेच या डेटाचा वापर पशुगणनेशी संबंधित धोरणे तयार करण्यात आणि अंमलबजावणी करण्यास केला जाईल. “पशुगणना धोरणांना आकार देते, भारताच्या पशुधन क्षेत्राची शाश्वत वाढ सुनिश्चित करते,” असे केंद्रीय मंत्री सिंह यांनी पशुधन गणनेचा प्रारंभ करताना सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्याच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी पशुगणनेतील डेटादेखील महत्त्वपूर्ण असेल.

२०१९ मध्ये अखेरची पशुगणना झाली होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

२१ वी पशुगणना मागील गणनेपेक्षा वेगळी कशी असेल?

२०१९ मध्ये अखेरची पशुगणना झाली होती. या वेळची गणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात केली जाईल. त्यामध्ये मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे ऑनलाइन डेटा संकलन, डिजिटल डॅशबोर्डद्वारे विविध स्तरांवर देखरेख, डेटा संकलन, स्थानाचे अक्षांश व रेखांश कॅप्चर करणे आणि पशुगणना यांचा समावेश असेल.

२१ व्या जनगणनेत काही नवीन डेटा पॉइंट्स कॅप्चर केले जातील. जसे की, जनगणनेत पहिल्यांदाच पशुधन क्षेत्रातील पाळीव प्राण्यांचे योगदान, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती आदींविषयी डेटा गोळा करील. पशुगणनेमुळे ज्या कुटुंबांचे मोठे उत्पन्न पशुधन क्षेत्रातून येते त्यांचे प्रमाण शोधले जाईल. त्यात भटक्या गुरांच्या लिंगाचाही डेटा असेल.

हेही वाचा : ‘या’ देशाने सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेगाडीत बसवल्या चाकू प्रतिरोधक छत्र्या; कारण काय?

२०१९ च्या पशुगणनेत काय आढळले?

एकूण पशुधन लोकसंख्या ५३५.७८ दशलक्ष होती. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या बाबी खालीलप्रमाणे :

  • १९२.९ दशलक्ष गुरे
  • १४८.८८ दशलक्ष शेळ्या
  • १०९.८५ दशलक्ष म्हशी
  • ७४.२६ दशलक्ष मेंढ्या
  • ९.०६ दशलक्ष डुकरे
    भारतातील एकूण पशुधन लोकसंख्येमध्ये इतर सर्व प्राण्यांचा वाटा फक्त ०.२३ टक्के आहे.