मल्याळम् वृत्तवाहिनी ‘मीडिया वन’च्या प्रसारणावर लादलेली बंदी बेकायदेशीर असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ‘मीडिया वन’ वृत्तवाहिनीच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यास केंद्र सरकारने आडकाठी आणली होती. माध्यमांशी अशी गळचेपी ही माध्यमस्वातंत्र्याला बाधा आणणारी असून केवळ सरकारवर टीका केली म्हणून संविधानाने अनुच्छेद १९ (२) नुसार दिलेला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार काढून घेता येत नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयावर केलेला प्रतिवादही न्यायालयाने फेटाळून लावला. राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित मुद्द्यांना भक्कम पुरावा असायला हवा, असेही न्यायालयाने सांगितले. तसेच वृत्तवाहिनीच्या बंदीवर सरकारने बंद लिफाफ्यात सादर केलेला अहवालदेखील न्यायालयाने स्वीकारण्यास नकार दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याआधीही अनेक वेळा बंद लिफाफ्याच्या पद्धतीवर टीका केलेली आहे. ही पद्धत सार्वजनिक न्यायाच्या हिताला बाधा आणत असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा