मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी १२१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर व्हाईट टॉपिंग (सिमेंट काँक्रिटीकरण) करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ३७ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी पहिल्याच पावसात काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावरही खड्डे पडल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग अशा प्रकारे खड्ड्यात जात असेल तर ते केंद्र आणि राज्य सरकारसाठी नामुष्कीचे ठरणार आहे. नवे तंत्रज्ञान वापरून हाती घेतले गेलेले काँक्रिटीकरण प्रभावी असेल असे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया या मार्गावरील खड्ड्यांमुळे होणारी कोंडी फोडण्यासाठी उपयुक्त ठरेल का हा प्रश्न कायम आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खड्डे…

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षांपासून सातत्याने खड्डे पडण्याची समस्या निर्माण होत आहे. महामार्गालगत होत असलेले अतिक्रमण, पाणी निचरा होण्याचे बंद झालेले मार्ग, माती भराव यामुळे महामार्गावर पावसाळ्यात पाणी साचून राहते. त्यामुळे हळूहळू रस्ता फुटून त्यावर खड्डे तयार होतात. तर दुसरीकडे महामार्ग प्राधिकरणाकडून अपेक्षित देखभाल, दुरुस्ती होत नसल्याने त्याचा परिणाम हा रस्त्यावर पावसाळ्यात दिसून येत आहे. याशिवाय अलीकडच्या काळात महामार्गावर वाहतूक वाढली आहे. विशेषतः अवजड वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचाही परिणाम दिसून येत आहे.

हेही वाचा >>>26/11 Mumbai Terror Attack: हल्ल्यातील प्रमुख आरोपीचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण? कोण आहे तहव्वूर राणा?

खड्डे बुजविण्यासाठी काय उपाययोजना?

पावसाळा आला की, रस्त्यावरील खड्ड्यांची संख्याही वाढते. छोटे खड्डे हळूहळू मोठे होत जातात. या खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि त्यामुळे नेमका खड्डा कुठे आहे हे चालकाला दिसत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. सुरवातीला खड्डे दुरुस्ती करण्यासाठी खडी, बारीक भुकटी मिश्रित साहित्य टाकून खड्डे भरणे, डांबरीकरणाचा मुलामा दिला जात होता. मात्र पुन्हापुन्हा खड्डे तयार होत असल्याने मास्टिक, डांबरी कोल्ड मिक्सचा प्रयोग केला होता. तोही प्रयोग यशस्वी ठरला नाही.

व्हाईट टॉपिंग तंत्रज्ञानचा पर्याय का?

राष्ट्रीय महामार्ग हा दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. यापूर्वी मास्टिक, डांबरी कोल्ड मिक्सच्या सहाय्याने खड्डे बुजविले जात होते. रस्त्यावर तेही टिकून राहत नसल्याने दीर्घकालीन उपाय म्हणून वर्सोवा पूल ते तलासरी अच्छाड असा १२१ किलोमीटर रस्ता व्हाईट टॉपिंग आच्छादित करण्याचा निर्णय घेतला. व्हाईट टॉपिंग हे पोर्टलँड सिमेंट काँक्रीट (पीसीसी) आच्छादन आहे. हे आच्छादन रस्त्यांचे पुनर्वसन किंवा संरचनात्मक मजबूतीकरणासाठी दीर्घकालीन पर्याय म्हणून काम करते. याशिवाय डांबरीकरणाचा पृष्ठभाग आहे. तो काँक्रीटने व्यापला जाणार आहे. याशिवाय काँक्रिटीकरणाद्वारे तयार केलेला रस्ता तसेच रस्त्याचे तापमान कमी ठेवण्यास मदत करते.

हेही वाचा >>>केशरी ते बसंती: पवित्र निशान साहिबचा रंग का बदलला? जाणून घ्या रंगाभोवतीचा इतिहास आणि राजकारण

मग तरीही खड्डे का पडले?

रस्त्याच्या व्हाईट टॉपिंगचे काम करताना अनेक ठिकाणच्या भागातील काँक्रिटीकरणासाठी वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरल्याने त्यावर खड्डे पडले असल्याचा आरोप होत आहे. रस्ता तयार केल्यानंतर मजबुतीसाठी काँक्रिटवर ओलावा टिकून राहण्यासाठी पाण्याची मात्रा देणे गरजेचे होते. परंतु तशी मात्र सर्वच ठिकाणी दिली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या नव्या रस्त्यांनाही काही ठिकाणी तडे जाऊन खड्डे तयार झाले आहेत. तर दुसरीकडे काँक्रिटीकरणाचा मुलामा दिल्यानंतर विशिष्ट वेळेपूर्वीच त्यावरून वाहतूक सुरू केल्याने खड्डे तयार झाल्याच्या तक्रारी आहेत.

या कामामुळे काय समस्या?

कामात नियोजनाचा अभाव तसेच काम निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. जी कामे प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे होते ती कामे अजूनही झालेली नाहीत. काही ठिकाणी झालेली कामे अर्धवट तसेच निकृष्ट असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. रात्रीच्या सुमारास वाहनचालकांना दिशादर्शक, सूचना फलकाअभावी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून ४० हून अधिक जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प अपयशी ठरतो की काय अशी भावना प्रवाशांमध्ये तयार होऊ लागली आहे. १२१ किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची सुरुवात डिसेंबर २०२३ मध्ये करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी वसई, विरारमधील काम पूर्ण केले जाणार होते. ते पूर्ण झालेले नाही. मुंबईच्या दिशेने जाणारी वाहिनी पूर्ण झाली असली तरी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर काही ठिकाणी काम अर्धवट आहे. या मार्गावर ६५ किलोमीटर इतका रस्ता पूर्ण केला आहे. ३७ टक्के इतके काम पूर्ण झाल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे. परंतु सुरवातीच्या कामातच अनेक दोष असल्याने काँक्रिटीकरणाचा प्रकल्प खड्डेमुक्त करण्यासाठी यशस्वी ठरणार का याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.