महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी हाजी मलंग दर्ग्याचा मुद्दा उपस्थित केला, ठाणे आणि पालघरच्या सीमेवर असलेल्या मलंगगड येथे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ जानेवारी रोजी येथे हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मलंगगडाला मुक्त करण्याचे आश्वासन दिले. मलंगगडावरून हिंदू आणि मुस्लीम समाजांत गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. येथे पूर्वीपासून मंदिर असल्याचे सांगितले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मलंगगडाबद्दल तुमच्या भावना मला माहीत आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्ती चळवळ सुरू केली त्यानंतर आपण ‘जय मलंग श्री मलंग’ म्हणू लागलो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशा काही गोष्टी जाहीर बोलू शकत नाहीत. मला माहीत आहे की मलंगगड मुक्तीबद्दल तुमच्या मनात काही श्रद्धा आहेत. मला हे सांगायचे आहे की एकनाथ शिंदे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण करत नाहीत तोपर्यंत तो शांत बसणार नाही,” असे शिंदे यांनी “मलंगगड हरिनाम महोत्सव” या धार्मिक मेळाव्याला संबोधित करताना सांगितले.

वादाची सुरुवात

कल्याणच्या दक्षिणेला एका टेकडीवर असलेल्या हाजी मलंग दर्ग्याला हाजी मलंग बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले सूफी संत हाजी अब्दुल-उल-रहमान यांचे नाव देण्यात आले आहे. परंतु, ऐंशीच्या दशकाच्या मध्यात, दिघे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच्या स्थानिक संघटनेने हे स्थळ हिंदूंचे असल्याचे सांगून आंदोलन सुरू केले. मलंगगड म्हणून संबोधलेल्या या वास्तूवर पुन्हा हक्क मिळवण्यासाठी शिवसेनेने पहिली मोहीम सुरू केली होती.

अधिक वाचा: स्त्रियांचे अश्रू पुरुषांमधील आक्रमकता खरंच कमी करतात? काय सांगते नवीन वैज्ञानिक संशोधन…

गॅझेट मधील संदर्भ

१८८२ साली प्रकाशित झालेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियर्स मध्ये या स्थळाचा उल्लेख आढळतो. या संदर्भानुसार अरब धर्मप्रचारक हाजी अब्दुल-उल-रहमान यांच्या सन्मानार्थ हे स्थळ बांधण्यात आले, हाजी अब्दुल-उल-रहमान हे अनेक अनुयायांसह येथे आले आणि स्थायिक झाले होते.

दावे काय सांगतात?

१२ व्या शतकापासून हे स्थळ अस्तित्त्वात असल्याचे मानले जाते. ८०० वर्षांपासून हे ठिकाण दर्ग्याचे असल्याचे मुस्लीम समाज मानतो. तर हिंदूंकडून हे ठिकाण मूळचे हाजी मलंग यांच्याशी संबंधित नसून नाथ संप्रदायाशी संबंधित असल्याचा दावा केला जातो. या गडावर नाथ गुरु मच्छिन्द्रनाथ यांची समाधी असल्याचाही दावा यात समाविष्ट आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाथ गुरु मच्छिन्द्रनाथ कोण होते? हे जाणून घेणे संयुक्तिक ठरणारे आहे.

कोण आहेत मच्छिन्द्रनाथ?

मच्छिन्द्रनाथ हे नाथ संप्रदायातील थोर गुरु होते. नऊ नाथांच्या यादीतील सर्वात पहिले नाथ म्हणजे ‘मच्छिन्द्रनाथ’. वेगवगेळ्या साहित्यात, प्रांतांत मच्छिन्द्रनाथ हे वेगवेगळ्या नामविशेषांनी ओळखले जातात. मीननाथ, मच्छेंदपाद, मत्स्येंद्र, मच्छंद, मच्छघ्नपाद, मच्छेंद्रपाद, मत्स्येंद्रपाद, मीनपाद, मच्छिंद्रनाथपाद, मच्छेंद्रार, मच्छिंदर, भृंगपाद, मत्स्येंद्रनाथ, अनिमिषदेव अशा अनेक नावांचा समावेश होतो. मच्छिन्द्रनाथ नेमके कोठले आणि त्यांचे माता पिता कोण याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. मच्छिन्द्रनाथ हे ‘कैवर्त’ (कोळी) जातीचे असावेत, असा तर्क बंगाली अभ्यासक हरप्रसाद शास्त्री यांनी मांडला आहे. तर इतर काही अभ्यासकांनुसार आसाम, बंगाल या प्रांतात त्यांचे मूळ असावे, ‘चंद्रद्वीप’ हे आसाममधील कामरूपात आहे, ही त्यांची जन्मभूमी असावी असा तर्क मांडला जातो, परंतु याच नावाचे स्थळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून ते नाथ संप्रदायाशी निगडित असल्याने त्यांचे मूळ या भागात असावे, असे काही अभ्यासक मानतात. याशिवाय त्यांचे दक्षिण भारतात मूळ दर्शवणारे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. एकूणात मच्छिन्द्रनाथ हे नाथ संप्रदायातील पहिले मानवी गुरु आहेत. ते आदिनाथाचे शिष्य होते. तसेच गोरक्षनाथांचे गुरु आहेत. परंतु त्यांचे मूळ नक्की कोणते याविषयी आजही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.

मच्छिन्द्रनाथांची जन्मकथा

नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक स्वतः भगवान शिव शंकर आहेत,अशी श्रद्धा आहे. प्रचलित कथांनुसार एका बेटावर शिव शंकर माता पार्वतीला गूढ ज्ञान प्रदान करत होते, त्यावेळेस जवळच्या जलाशयात असलेल्या माशाने हे ज्ञान ग्रहण केले, हे शिवाला समजताच, त्या माशाचे मच्छिन्द्रनाथात रूपांतर झाले. तर नवनाथ कथासार या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे माशाच्या गर्भातील अर्भकाने हे ज्ञान ग्रहण केले होते, हेच अर्भक पुढे मच्छिन्द्रनाथ म्हणून नावारुपाला आले. मच्छिन्द्रनाथ हे कौल योगिनी संप्रदायाचे प्रवर्तक आहेत. ते कवी नारायणाचे अवतार मानले जातात.

मच्छिन्द्रनाथ आणि बौद्ध

प्रसिद्ध अभ्यासक डॉ. बागची यांनी संपादित केलेल्या ‘कौलज्ञाननिर्णय’ या ग्रंथात त्यांनी मच्छिन्द्रनाथ हे बौद्ध तांत्रिक होते असे नमूद केले आहे. तर या तर्काला छेद देणारे मत प्रसिद्ध अभ्यासक रा. चिं. ढेरे यांनी आपल्या ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ या ग्रंथात मांडले आहे. त्यांच्या संशोधनानुसार मच्छिन्द्रनाथ यांनी आपले मूळचे मत सोडून योगिनींचे प्राबल्य असलेले योगिनीकौलमत स्वीकारले, ते बौद्ध तंत्राशी संबंधित नसून हिंदू शाक्त तंत्राशी संबंधित होते. प्रसिद्ध अभ्यासक आ. ह. साळुंखे यांनी नमूद केल्याप्रमाणे नेपाळमधील बौद्ध मच्छिन्द्रनाथ यांना बोधिसत्त्व अवलोकितेश्वर मानतात. नेपाळमध्ये त्यांचा संबंध सर्जनतेशी आहे.

अधिक वाचा: भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजाचे अपहरण करणारे हूती आहेत तरी कोण?

महाराष्ट्र आणि मच्छिन्द्रनाथ

वेगवेगळ्या अभ्यासकांनी मच्छिन्द्रनाथ यांचा संबंध वेगवेगळ्या प्रदेशांशी जोडलेला तरी महाराष्ट्र आणि नाथ संप्रदायाचा ऋणानुबंध अधिक खोल आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एकूणच इसवी सन आठव्या शतकापासून नाथ संप्रदायाचा प्रभाव आहे. महानुभाव, वारकरी, इत्यादी अनेक तत्कालीन मध्ययुगीन संप्रदायांची मुळे आपल्याला नाथ संप्रदायात आढळतात. महाराष्ट्रात इसवी सनाच्या १४ व्या शतकापासून महाराष्ट्रात मच्छिन्द्रनाथांचे पुरातत्त्वीय पुरावे सापडतात. पन्हाळे-काजी येथील लेणी क्र. १४ व २९, माणकेश्वर मंदिर, औंढ्याचे नागनाथ मंदिर, बीड येथील कांकाळेश्वर मंदिर, लोणार येथील बगीचा मंदिर, येळंब येथील रामेश्वर महादेव मंदिर अशा काही महत्त्वाच्या मंदिरात आपण मच्छिन्द्रनाथांचे शिल्प पाहू शकतो. बीड मधील नगर जिल्ह्यातील मढी येथील कानिफनाथ, आष्टी (जि. बीड) तालुक्यातील मायंबा येथील मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या स्थळाला भेट देतात.

संदर्भ:

बागची, पी.सी. संपा., १९३४, कौलज्ञान-निर्णय अँड सम मायनर टेक्स्ट ऑफ द स्कुल मत्स्येंद्रनाथा, कलकत्ता.
द्विवेदी, हजारीप्रसाद., १९५०, नाथ संप्रदाय, अलाहाबाद.
देशपांडे, एम.एन., १९८६, द केव्हज ऑफ पन्हाळे-काजी (प्राचीन प्रणालका), नवी दिल्ली.
ढेरे, रा. चिं., २०१०, नाथ संप्रदायाचा इतिहास, पुणे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is machchindranath related to malanggarh mentioned by chief minister eknath shinde svs
Show comments