Lok Sabha Election 2024 Winners भारतीय जनता पार्टीने (भाजपा) लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’चा नारा दिला होता. मात्र, भाजपाला ५४३ पैकी एनडीएला केवळ २९३; तर भाजपाला २४० जागा जिंकता आल्याने भाजपाचे ते स्वप्न भंगले. दुसरीकडे काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या; तर इंडिया आघाडीने २३३ जागांवर विजय मिळविला. भाजपासाठी हा निकाल अनपेक्षित होता. एकीकडे हा भाजपाचा पराभव असल्याचे विरोधक म्हणत आहेत; तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसर्‍यांदा सत्तास्थापनेचा दावा केला आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा मोदीदेखील वाराणसीतून फार कमी मतफरकाने विजयी झाले. २०१९ च्या निवडणुकीत ४.७९ लाखांच्या मतांनी विजयी होणारे पंतप्रधान मोदी यंदा १.५२ लाखांच्या फरकाने विजयी झाले. या लोकसभा निवडणुकीत कोणाचा सर्वाधिक मतांनी विजय झाला आणि कोण सर्वांत कमी मतांनी विजयी झाले? यावर एक नजर टाकू या.

एनडीएतील उमेदवार लक्षणीय फरकाने विजयी

भाजपाच्या शंकर लालवानी यांनी इंदूर लोकसभा मतदारसंघात १२ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवून इतिहास रचला. मध्य प्रदेशमध्ये नोटा (२,१८,६७४) उपविजेता ठरला. उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यातल्या हिंदी पट्ट्यातील लोकसभेच्या सर्व २९ जागा भाजपाने जिंकल्या. गुजरातच्या गांधीनगरमधून दुसऱ्यांदा विजयी झालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसच्या सोनल पटेल यांचा ७,४४,७१६ मतांनी पराभव केला.

हेही वाचा : Lok Sabha Election Result 2024 Live Updates : नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल; पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे भाजपाच्या तिकिटावर विदिशा मतदारसंघातून आठ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस नेते प्रताप भानू शर्मा यांचा पराभव केला. शर्मा यांना २,९५,०५२ मते मिळाली. गुजरात भाजपाचे अध्यक्ष सीआर पाटील यांना नवसारीमध्ये १०,३१,०६५ मते मिळाली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार नौशाद भूपतभाई देसाई यांचा ७.७ लाख मतांच्या फरकाने पराभव केला.

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भाजपाचे बृजमोहन अग्रवाल यांना १०,५०,३५१ मते मिळाली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या विकास उपाध्याय यांना ४७५,०६६ मते मिळाली. गुजरातमधील पंचमहाल लोकसभा मतदारसंघात भाजपाचे राजपालसिंह महेंद्रसिंह जाधव यांनी काँग्रेस नेते गुलाबसिंह सोमसिंह चौहान यांच्याविरुद्ध पाच लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

गुजरातच्या वडोदरा येथे भाजपाचे हेमांग जोशी यांनी ८,७३,१८९ मते मिळवली आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी पदियार जशपालसिंह महेंद्रसिंह (बापू) यांना ५.८ लाख मतांनी पराभूत केले. भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशातील गुना येथून काँग्रेसचे यादवेंद्र राव देशराज सिंह यांच्याविरोधात ५,४०,९२९ मतांच्या फरकाने विजय मिळवला. खजुराहो मतदारसंघातून भगवा पक्षाचे विष्णू दत्त शर्माही पाच लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) कमलेश कुमार उपविजेते ठरले असून, भाजपाचे आलोक शर्मा आणि सुधीर गुप्ता यांनीही अनुक्रमे भोपाळ आणि मंदसूरमधून पाच लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये भाजपाचे डॉ. महेश शर्मा पाच लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. विशाखापट्टणम येथे तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) श्रीभरत मथुकुमिल्ली यांनी युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) उमेदवार झाशी लक्ष्मी बोत्चा यांच्याविरुद्ध ५,०४,२४७ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

इंडिया आघाडीतील कोणते उमेदवार सर्वाधिक मतांनी विजयी?

आसामच्या धुबरी लोकसभा मतदारसंघात १० लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवीत काँग्रेसचे रकीबुल हुसेन यांनी इतिहास रचला. हुसेन यांना १,४७,१८८५ मते मिळाली; तर त्यांचे प्रतिस्पर्धी ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे बद्रुद्दीन अजमल यांना ४.५ लाख मते मिळाली. तामिळनाडूतील तिरुवल्लूर मतदारसंघावर काँग्रेसचे शशिकांत सेंथिल यांनी भाजपाच्या पोन बालगणपतीविरुद्ध ५,७२,१५५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. तेलंगणातील नालगोंडा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कुंडुरु रघुवीर ५.५ लाख मतांनी विजयी झाले.

राहुल गांधींनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला रायबरेली मतदारसंघ ३,९०,०३० मतांच्या फरकाने जिंकला असून, भाजपाचे दिनेश प्रताप सिंह यांना २,९७,६१९ मते मिळाली. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये सोनिया गांधींना मिळालेल्या मतांच्या दुप्पट फरकाने ही जागा जिंकली. राहुल गांधींनी केरळच्या वायनाडमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ॲनी राजा यांचाही तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. तृणमूल काँग्रेस (टीमसी) पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवली असली तरी टीमसी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपाच्या अभिजित दास (बॉबी) यांच्यावर सात लाख मतांनी मोठा विजय मिळवला.

हेही वाचा : अयोध्येत राममंदिर उभारूनही भाजपाचा पराभव; उत्तर प्रदेशवासीयांनी का सोडली भाजपाची साथ?

सर्वात कमी मतांनी विजयी होणारे उमेदवार?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार रवींद्र दत्ताराम वायकर यांनी महाराष्ट्रात सर्वात कमी फरकाने विजय मिळवला. त्यांच्या आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मतांमध्ये केवळ ४८ मतांचे अंतर होते.

काँग्रेसचे उमेदवार अदूर प्रकाश यांनी केरळमधील अटिंगल मतदारसंघात ६८४ मतांनी विजय मिळवला. ३२८,०५१ मतांसह प्रकाश यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) उमेदवार व्ही जॉय यांचा पराभव केला, ज्यांना ३२७,३६७ मते मिळाली.