मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन जलाशयाच्या पुनर्बांधणीचा वाद सध्या चिघळला आहे. या कामासाठी ३८९ झाडे कापावी किंवा पुनर्रोपित करावी लागणार आहेत. तसेच या कामामुळे हँगिंग गार्डन काही वर्षे बंद ठेवावे लागणार आहे. या परिसरातील नागरिकांनी, पर्यावरणवाद्यांनी झाडे हटवण्यास विरोध केला आहे. त्यामुळे या जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम रखडले आहे. नागरिकांचा या कामाला विरोध का, त्यांचे म्हणणे काय, प्रशासनाची बाजू काय, या जलाशयाची आवश्यकता का, याबाबतचे हे विश्लेषण.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकरण काय आहे?

मलबार हिल परिसरात पालिकेचे तब्बल १३६ वर्षे जुने जलाशय आहे. या जलाशयाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. सध्या या जलाशयाची पाणी साठवण्याची क्षमता १४७ दशलक्ष लिटर आहे. ती १९१ दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या जलाशयातून दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. या जलाशयाच्या वर मुंबईतील सुप्रसिद्ध हॅंगिंग गार्डन आहे. मात्र जलाशयाची क्षमता वाढवायची असल्यास त्याकरिता झाडे कापावी लागणार आहेत व उद्यानही बंद ठेवावे लागणार आहे. झाडे कापण्यासाठी संबंधित विभागाने वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला असून हरकती व सूचना मागवल्या. त्यामुळे या विषयाला तोंड फुटले आहे. मलबार हिलसारख्या उच्चभ्रू विभागातील नागरिकांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे.

हेही वाचा : विश्लेषण : हमासची युद्धशैली बदलत आहे का ?

सेवा जलाशयांचा उपयोग काय?

संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबईत तब्बल २७ सेवा जलाशये आहेत. जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी जलशुद्धीकरण केंद्राजवळील महासंतुलन जलाशयात साठवले जाते. मग पुढील वितरणासाठी शहरात ठिकठिकाणी असलेल्या २७ सेवा जलाशयांपर्यंत पुढील वितरणासाठी विभागले जाते. सेवा जलाशयातून जलवाहिन्यांद्वारे पाणी विविध परिसरांतील ग्राहकांपर्यंत सुमारे ३ लाख ६० हजार जलजोडण्यांद्वारे पोहोचविले जाते. हँगिंग गार्डनच्या खाली असलेले हे जलाशय त्यापैकी एक आहे.

नागरिकांचा विरोध का?

या कामासाठी नक्की किती जागा लागेल ते अद्याप उघड झाले नाही. नुसते जलाशयच नाही तर उपसा करण्यासाठी (पंपिंग) जागा, जलवाहिन्या अशी सगळी यंत्रणा उभी करावी लागेल. त्यासाठी मोठी जागा लागू शकते. सात वर्षांत कामाच्या नावाखाली ही मोक्याची जागा हडप होईल की काय, आरेमध्ये जशी एका रात्रीत झाडे कापली तशी पुनरावृत्ती इथे होईल की काय, अशी भीती नागरिकांनी आणि पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जलाशयासाठी दुसरी जागा द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा : विश्लेषण : तेलाचा भडका उडूनही इंधन दरवाढ का नाही?

सद्य:स्थिती काय?

या विषयावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी नागरिक आणि प्रशासनाची बैठक बोलावली होती. त्यात काहीही तोडगा न निघाल्यामुळे या विषयावर विचार करण्यासाठी आता नागरिकांची समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल देईपर्यंत या कामाला आता स्थगिती देण्यात आली आहे.

प्रशासनाची भूमिका काय?

जलाशय बांधण्यासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कोस्टल रोडमध्ये भराव टाकून जी जमीन तयार झाली आहे तिथे जलाशय बांधावे, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. मात्र ते शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुंबईतील सगळे जलाशय उंचावर, टेकडीवर आहेत. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे किनारी मार्गाजवळची (कोस्टल रोड) जागा योग्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच नवीन जागा निवडल्यास पाणीपुरवठ्याची बाकीची यंत्रणा, जलवाहिन्या नव्याने स्थापित कराव्या लागतील. ते खर्चीक ठरू शकते.

हेही वाचा : निवडणूक रोख्यांविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार, या योजनेला विरोध का होतो?

मुंबईतील अन्य जलाशये कुठे आहेत?

मुंबईत एकूण २७ साठवण जलाशये आहेत आणि ही सगळी जलाशये टेकडीवर आहेत. त्यात शहरात माझगाव भागात भंडरवाडा टेकडीवरील जलाशय, गोलांजी हिल, फॉसबेरी हिल, रावळी टेकडी, वरळी टेकडी येथे जलाशये आहेत. तर पूर्व उपनगरात भांडुप, घाटकोपर, ट्रॉम्बे आणि पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, पवई, पाली हिल, वेरावली टेकडी येथे जलाशये आहेत. मलबार हिल जलाशय कमी पडू लागला तेव्हा १८९४ मध्ये भंडारवाडा टेकडीवर जलाशय बांधण्यात आला. त्याच्या छतावरही उद्यान साकारण्यात आले. ते उद्यान जोसेफ बाप्टिस्ट गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why controversy over reconstruction of malabar hill reservoir print exp css