देशात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. केवळ भारतच नव्हे तर जगभरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची नोंद आहे. या वर्षी जगभरात विक्रमी प्रकरणे नोंदवली गेली आहेत; ज्यात ब्राझील आणि इतर दक्षिण अमेरिकन देश सर्वात जास्त प्रभावित आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या डेटावरून असे दिसून येते की, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. हा रोग कसा पसरतो? प्रकरणांमध्ये वाढ होण्याची कारणे काय? आणि या रोगाविरोधी लस उपलब्ध आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.

डेंग्यू म्हणजे काय?

डेंग्यू हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. हा रोग रक्त शोषणार्‍या डासांद्वारे पसरतो. प्रामुख्याने डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती हा रोग पसरवण्यास कारणीभूत असते. संसर्गाने ग्रस्त बहुतेक लोकांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात. ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ आणि उलट्या, डोळ्यांमध्ये वेदना आणि शरीरावर पुरळ उठणे ही प्रमुख लक्षणे आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये, संसर्गामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो आणि वेळेत उपाय न केल्यास मृत्यूदेखील होऊ शकतो. ‘द लॅन्सेट’च्या संपादकीयात गेल्या दोन दशकांमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये दहापट वाढ झाली असल्याची माहिती आहे. “डेंग्यू हा एकमात्र संसर्गजन्य रोग आहे, ज्यामुळे वार्षिक मृत्यू वाढत आहेत,” असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या डेटावरून असे दिसून येते की, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : काय आहे इस्रोचे ‘मिशन व्हीनस’? इस्रोला शुक्राचा अभ्यास का करायचा आहे? जाणून घ्या या मोहिमेचे उद्दिष्ट

यावर्षी किती लोकांना डेंग्यूचा संसर्ग?

डब्ल्यूएचओच्या जागतिक डेंग्यूच्या आकडेवारीनुसार, या वर्षी ऑगस्टपर्यंत जगभरात १२ दशलक्षाहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत आणि ६,९९१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात नोंदवलेल्या ५.२७ दशलक्ष प्रकरणांपेक्षा हा आकडा दुप्पट आहे. मागील वर्षापूर्वी गेल्या दशकभरात डेंग्यूची सुमारे दोन ते तीन लाख वार्षिक प्रकरणे नोंदवली गेली होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, २०२४ मध्ये नोंदवण्यात आलेला ही विक्रमी संख्यादेखील जास्त असण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे, भारतासह इतरही काही देश त्यांच्या डेटाचा अहवाल जागतिक पातळीवर देत नाहीत. डेटाचा अहवाल देणाऱ्या देशांमध्येही, डेंग्यूच्या प्रत्येक रुग्णाची चाचणी करून आरोग्य अधिकाऱ्यांना अहवाल दिला गेला नसावा अशी शक्यता आहे, त्यामुळे हा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता आहे.

भारतातील परिस्थिती काय?

गेल्या दोन महिन्यांत अनेक शहरांमध्ये डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामच्या ताज्या आकडेवारीनुसार, जून अखेरपर्यंत डेंग्यूमुळे ३२ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि ३२ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत ही संख्या आणखी वाढली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी ऑगस्टच्या सुरुवातीला सांगितले होते की, २०२३ च्या याच कालावधीच्या तुलनेत भारतात या वर्षी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जवळपास ५० टक्के वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे, भारतातही संसर्गाच्या भौगोलिक क्षेत्रात वाढ होत आहे. हा रोग २००१ मध्ये फक्त आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत सीमित होता, मात्र २०२२ पर्यंत हा रोग प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पसरला आहे. लडाखमध्ये २०२२ मध्ये पहिल्या दोन प्रकरणांची नोंद करण्यात आली होती.

गेल्या दोन महिन्यांत अनेक शहरांमध्ये डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

डेंग्यूच्या वाढीमागील कारणं काय?

लॅन्सेट संपादकीयमध्ये शहरीकरण, हवामान बदल आणि लोकांच्या स्थलांतरालाही डेंग्यूच्या प्रसार वाढण्याची तीन प्रमुख कारणे असल्याचे सांगितले आहे.

शहरीकरण : दाट लोकसंख्या असलेल्या शहरी भागात हा रोग अधिक वेगाने पसरू शकतो. याचे कारण म्हणजे शहरातील मोकळ्या जागा एडिस इजिप्ती डासांना प्रजननासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देतात. हे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात प्रजनन करतात. सामान्यत: पावसाळ्यात. त्यानंतर या प्रकरणांमध्ये वाढ नोंदवली जाते. “तुम्ही केवळ दिल्लीचे उदाहरण घेतल्यास सध्या दिल्लीत उष्णतेसह पाऊस पडतोय; ही डासांच्या वाढीसाठी सर्वोत्तम परिस्थिती आहे,” असे नवी दिल्लीच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग आणि व्हेक्टर बोर्न डिसीज ग्रुपमधील डॉ. सुजाता सुनील यांनी सांगितले.

हवामान बदल : तापमानात वाढ झाल्यामुळे, जी जागा पूर्वी या डासांच्या वाढीसाठी अनुकूल नव्हती, आज तिथेही डासांचा जन्म होऊ शकतो. उदाहरणार्थ उंच जागेवर. “जागतिक तापमानवाढीमुळे निश्चितपणे भौगोलिक प्रदेशात वेक्टरचा प्रसार वाढला आहे,” असे सुजाता सुनील म्हणाल्या. त्या शिवाय हवामानातील बदलामुळे विषाणूंचा प्रसार वाढला आहे. सध्याच्या प्रादुर्भावावर, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन म्हणाले, “उच्च तापमानामुळे डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या श्रेणीचा विस्तार होऊ शकतो, तसेच विषाणूचा प्रसार वाढवणार्‍या इतर घटकांवर त्याचा परिणाम होतो.”

लोकांचे स्थलांतर : लोकांच्या किंवा वस्तूंच्या स्थलांतरामुळे हे लोक त्यांच्याबरोबर घेऊन जाणाऱ्या संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. डेंग्यू व्यतिरिक्त, चिकनगुनिया आणि झिका यांसारखे इतर संक्रमणदेखील त्याच वेक्टरद्वारे प्रसारित होत आहेत. २०१६ मध्ये झिकाचा रुग्ण पहिल्यांदा भारतात आढळून आला, तेव्हापासून अनेकदा भारतात झिकाचा उद्रेक झाला आहे. “एका विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे वेक्टर डासांची प्रतिकारशक्ती कमी होते का आणि इतर दोन विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते का, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. जर असे झाले तर तिन्ही संसर्गाचा प्रसार वाढू शकतो,” असेही डॉ. सुजाता म्हणाल्या.

पहिले म्हणजे व्यक्तींनी हे सुनिश्चित केले पाहिजे की, त्यांच्या घरात किंवा त्यांच्या शेजारी डास तयार होणार नाहीत. भांडी, फुलदाण्या, पक्ष्यांसाठी अशा कोणत्याही ठिकाणी पाणी गोळा होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे डास चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. एडिस इजिप्ती डास दिवसा चावतात. त्यासाठी संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घातल्याने, विशेषत: पावसाळ्यात हे डास चावण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतात. तिसरे म्हणजे, सार्वजनिक आरोग्य यंत्रणांना उद्रेकाच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करावे लागेल, त्यामुळे प्रकरणांची संख्या कमी होण्यास मदत होईल आणि परिणामी संसर्गामुळे होणारे मृत्यूही कमी होतील.

हेही वाचा : श्रीलंकेच्या नव्या अध्यक्षांचे भारतविरोधी विचार? भारत-श्रीलंकेच्या संबंधांवर परिणाम होणार?

डेंग्यू विरोधी लस उपलब्ध आहेत का?

डेंग्यू विरोधी लस उपलब्ध आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दोन लसींची शिफारस केली आहे. त्यात ‘Sanofi’s Dengvaxia’ आणि ‘Takeda’s QDenga’ या दोन लसींचा समावेश आहे. मात्र, त्यांना अद्याप भारतात मान्यता मिळालेली नाही. असे सांगण्यात आले आहे की, भारत काही परदेशी संस्थांच्या सहकार्याने स्वतःच्या अनेक लसींवर काम करत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेशीयस डिसीजच्या अनुवांशिकदृष्ट्या कमकुवत विषाणूचा वापर करून लसींवर काम करत आहेत. त्यांच्या दोन्ही लस सर्वात प्रगत टप्प्यांत आहेत. याच विषाणूचा वापर करून ‘Panacea Biotec’ द्वारेही लस विकसित केली जात आहे.