भारतात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण ३०२ माणसे मृत्युमुखी पडली. त्यापैकी ५५ टक्के मृत्यू केवळ महाराष्ट्रात झाले आहेत. केंद्राने पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून २९.५७ कोटी रुपये वितरित केले आहेत. २०२३ मध्ये भारतातील एकूण १६८ वाघांच्या मृत्यूपैकी सर्वाधिक ५२ मृत्यू देखील महाराष्ट्रातच झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानव-वन्यजीव संघर्ष का उद्भवतो?

मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षामुळे मालमत्तेचे, उपजीविकेचे नुकसान आणि अगदी जीवाचे नुकसान होते. परिणामी नागरिक आणि वन्यजीव दोघांनाही त्रास सहन करावा लागतो. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजांमुळे वन्यजीव अधिवासांमध्ये अतिक्रमण होते आणि स्थानिक समुदायांशी थेट स्पर्धा होते. रस्ते आणि वीज वाहिन्या, उत्खनन, वनजमीन गैर-वने वापरासाठी वळवणे यासारख्या प्रकल्पांमुळे वन्यप्राण्यांचा अधिवास हिरावला जात आहे. अशा अनेक कारणांमुळे हा संघर्ष वाढत चालला आहे. या संघर्षात मानवी मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण जितके जास्त आहे, तितकेच वन्यप्राणी मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : एका ‘मायक्रोसॉफ्ट’मुळे जग का कोलमडले? ‘क्राऊडस्ट्राइक’ बिघाड काय होता?

सर्वाधिक झळ कुठे?

महाराष्ट्रात वाघ आणि बिबटेच नाही, तर अस्वल आणि इतर प्राण्यांच्या हल्ल्यातदेखील मानवी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४२६ मानवी मृत्यू आणि तीन हजार २२५ जण जखमी झाले. आठवड्याला सरासरी एक मानवी मृत्यू आणि १२ लोक जखमी होत आहेत. राज्यात मानव-वन्यजीव संघर्षाची सर्वाधिक झळ गेल्या काही वर्षात चंद्रपूर गडचिरोली या दोन जिल्ह्यांना सर्वाधिक बसली आहे. हे दोन्ही जिल्हे या संघर्षामुळे सर्वाधिक प्रभावित आहेत. २०२३ मध्ये या दोन जिल्ह्यांत वाघ, बिबटे आणि इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ३८ माणसांनी जीव गमावला.

भरपाईत वाढ करून प्रश्न सुटेल?

महाराष्ट्रात वन्यप्राणी हल्ल्यात माणूस मृत्युमुखी पडल्यास २५ लाख रुपये त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्यात येतात. व्यक्ती अपंग झाल्यास सात लाख ५० हजार रुपये देण्यात येतात. गेल्या काही वर्षात ही रक्कम वाढून इथपर्यंत पोहोचली आहे. मात्र, नुकसान भरपाईत वाढ करून प्रश्न सुटणार नाही. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करायचा असेल तर आधी अतिसंवेदनशील, संवेदनशील आणि निमसंवेदनशील असे तीन भाग करावे लागतील. त्यानंतर उपाययोजना किंवा निधीचे नियोजन करताना सरसकट न करता या प्रत्येक भागासाठी विशेष धोरण तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक गावकरी, स्थानिक अधिकारी यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे.

संघर्ष कमी करण्यासाठी कोणते धोरण?

वन्यजीवांसाठी नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण केल्यास ते मानवी वस्तीत येणार नाहीत. त्यांचा कॉरिडॉर, संरक्षित क्षेत्र संरक्षित करावी लागतील.कुंपण, भीतीदायक उपकरणे आणि पीक वैविध्य यासारख्या तंत्रांची अंमलबजावणी केल्याने वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करता येते. वन्यजीवांच्या उपस्थितीबद्दल जवळपासच्या समुदायांना सतर्क करणे, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यास आणि मानवी सुरक्षेला धोका कमी करण्यास मदत करू शकते. स्थानिक समुदायांना वन्यजीवांसोबत एकत्र राहण्याबद्दल शिक्षित करणे, संरक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे आणि संघर्ष निराकरण तंत्रांचे प्रशिक्षण देणे वन्य प्राण्यांबद्दल अधिक समज आणि सहिष्णुता वाढवू शकते.

हेही वाचा >>>Microsoft outage जगाचे व्यवहार ठप्प करणारा मायक्रोसॉफ्टच्या सेवांमधील बिघाड (आउटेज) नेमका कशामुळे?

देशात, राज्यात व्याघ्रमृत्यूचे आकडे कसे?

गेल्या सहा महिन्यात भारतात एकूण ७६ वाघ मृत्युमुखी पडले. यात महाराष्ट्रातील १४ आहेत. २०२३ मध्ये १६८ वाघ मृत्यमुखी पडले होते, ज्यात महाराष्ट्रात सर्वाधिक ५२ वाघांच्या मृत्युचा समावेश होता. २०२२ मध्ये १२१ मृत्यू झाले, यात महाराष्ट्रातील २९ वाघ आहेत. २०२१ मध्ये भारतात १२७ वाघांचा मृत्यू झाला, यात महाराष्ट्रातील ३२ वाघ आहेत. २०२० मध्ये १०६ वाघ मृत्युमुखी पडले, यात महाराष्ट्रातील १८ वाघ आहेत. २०१९ मध्ये ९६ वाघ मृत्युमुखी पडले, यात महाराष्ट्रातील १७ वाघ आहेत. 

rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do most deaths in tiger attacks occur in maharashtra print news amy
Show comments