सध्या कॅनडामध्ये एकूण १३२ विद्यार्थी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर आंदोलन करत आहेत. हे सर्व विद्यार्थी अलगोमा विद्यापीठाचे विद्यार्थी असून ते माहिती आणि तंत्रज्ञानविषयक पदवीच्या अभ्यासक्रमातील (आयटी) एका विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. मात्र, अनुत्तीर्ण झाल्यामुळे हे विद्यार्थी आंदोलन का करत आहेत? त्यांचे नेमके म्हणणे काय आहे? हे जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बहुसंख्य भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थी

आमच्यावर अन्याय झाला आहे. आम्हाला चुकीच्या पद्धतीने अनुत्तीर्ण करण्यात आले आहे, असे या विद्यार्थ्यांचे मत आहे. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य विद्यार्थी हे भारतीय आणि पाकिस्तानी आहेत. या विद्यार्थ्यांना अन्य तीन वर्गांच्या विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे. हे विद्यार्थी अनुत्तीर्ण कसे झाले? याचा एखाद्या बाह्य संस्थेने तपास करावा, अशी मागणी केली जात आहे.

आंदोलनाचे नेमके कारण काय?

टोरोंटो स्टार या ऑनलाइन संकेतस्थळाने या आंदोलनाबाबत एक वृत्त दिले. या आंदोलनाला ३ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. या दिवशी भारत आणि पाकिस्तानमधील काही विद्यार्थी ब्रॅम्प्टन, ओंटारियो येथील अल्गोमाच्या सॅटेलाइट कॅम्पसबाहेर जमा झाले होते. ‘टेक्निस ऑफ अ सिस्टिम अॅनॅलिस्ट’ या विषयात जवळपास १३२ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्यामुळे हे सर्व विद्यार्थी जमा झाले होते.

“उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावे”

या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सध्या समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा होत आहे. या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी केली. ‘स्टुडंट्स जस्टिस नाऊ’, ‘स्टॉप स्कॅमिंग स्टुडंट्स,’ आणि ‘एज्युकेशन इज नॉट फॉर सेल,’ अशा प्रकारच्या घोषणा या फलकावर लिहिलेल्या होत्या. या विद्यार्थ्यांकडून अलगोमा विद्यापीठ प्रशासनाला जबाबदार धरले जात होते. तसेच आमच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात होती.

“आमची पारदर्शक, तटस्थ गुणांकन पद्धतीची मागणी”

याच आंदोलक विद्यार्थ्यांपैकी सिमरन कौर नावाच्या एका विद्यार्थिनीने कॅनडातील द स्टार या वृत्तसंकेतस्थळाला प्रतिक्रिया दिली. “फक्त परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी हे सर्व चालू नाही, आम्हाला ते आवडतही नाही, आम्ही येथे अशा कडाक्याच्या थंडीत गंमत म्हणून उभे नाहीत” असे ही विद्यार्थिनी म्हणाली. या विद्यार्थिनीने अलगोमा विद्यापीठात पदव्युत्तर पदवीनंतरच्या दोन वर्षांच्या व्यवसाय व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला आहे. “विद्यापीठाने आम्हाला सरसकट उत्तीर्ण करावे, अशी आमची मागणी नाही. आम्ही फक्त पारदर्शक, तटस्थ अशा गुणांकन पद्धतीची मागणी करत आहोत”, असेही या विद्यार्थिनीने सांगितले.

याआधीही विद्यार्थ्यांवर अन्याय?

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याआधीही असे प्रकार घडलेले आहेत, असा आरोप केला आहे. याआधी अनेकवेळा भारतीय विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले आहे, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला. एका विशिष्ट विषयात, विशिष्ट प्राध्यापकाकडून असे वारंवार केले जात आहे, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. “पैसे कमावण्याचाच हा एक प्रकार आहे. अनुत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी घाबरतील आणि ते पुन्हा एकदा परीक्षेला बसतील. त्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा फी भरावी लागेल, त्या सत्राची फी भरावी लागेल, याची त्यांना कल्पना आहे. अशा प्रकारच्या चुकीच्या मार्गाने ते पैसे कमवत आहेत”, असा आरोप MYSO या विद्यार्थी संघटनेचे समन्वयक असलेल्या मनदीप यांनी केला.

अलगोमा विद्यापीठाने काय स्पष्टीकरण दिले?

विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. विद्यार्थ्यांनी केलेले सर्व आरोप विद्यापीठाने फेटाळले आहेत. आंदोलन करणाऱ्या एकूण १३२ विद्यार्थ्यांपैकी फक्त ३२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत, असे विद्यापीठाने सांगितले. विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देणारे एक निवेदनही विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे. “एकूण २३० विद्यार्थी असलेल्या वर्गात फक्त ३२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता या विद्यार्थ्यांना अॅप्टिट्यूड कॉमेटेन्सी परीक्षा देण्याची परवानगी देण्यात येईल. त्यासाठी प्रश्नपत्रिकेची रचना तसेच गुणांक अन्य प्राध्यापकांकडून करून घेतले जाईल”, असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.

विद्यापीठ प्रशासन पुनर्परीक्षण करणार

“दरम्यानच्या काळात विद्यापीठ प्रशासनातर्फे या विद्यार्थ्यांनी आधीच्या परीक्षा कशा दिलेल्या आहेत, त्यांना देण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये त्यांनी कसे काम केलेले आहे, याचे विद्यापीठ प्रशासन पुनर्परीक्षण करणार आहे. आरोप करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आम्ही चर्चा करत राहू”, असे विद्यापीठाने आपल्या निवेदनात सांगितले.

“निवेदन प्रसिद्ध केल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले”

विद्यापीठाने हे निवेदन प्रसिद्ध केल्यानंतर जवळपास १०० विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे, असा आरोप या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांना नोटीस

या आंदोलनानंतर काही विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. मात्र, आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना नोटिशी बजावण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे नियम मोडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या नोटिशींमुळे विद्यार्थी भयभीत झाले असून आम्हाला निलंबित केले जाईल का? असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला आहे.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह

दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर कॅनडामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या धोरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून शिक्षणासाठी कॅनडात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे, त्यामुळे तेथे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या धोरणावर टीका केली जात आहे.

“परदेशी विद्यार्थ्यांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे”

इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ओटावामध्ये परदेशातून कॅनडात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे यंत्रणा नियंत्रणाबाहेर गेली आहे. परदेशी विद्यार्थ्यांची ही संख्या चिंताजनक आहे, त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एखादी प्रणाली असणे गरजेचे आहे, असे मिलर म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why indian resident student protesting in canada against algoma university prd
Show comments