संकटग्रस्त श्रीलंकेतील चहाचे उत्पादन कमी होत असताना भारत चहाची निर्यात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काही देशांनी भारतीय चहाची खरेदी करण्यास नकार देऊन भारताला मोठा धक्का दिला आहे. तैवान आणि इराणने भारताने निर्यात केलेला चहा स्वीकारण्यास नकार दिला आहे. गव्हाच्या वादानंतर भारतीय चहाच्या गुणवत्तेलाही दोष देण्यात आला आहे.
इराण आणि तैवानकडून भारताने निर्यात केलेला चहा स्वीकारण्यास नकार
इराण आणि तैवान या दोन देशांनी फायटोसॅनिटरी समस्या आणि कीटकनाशकांचे कारण देत भारतीय चहाचे तीन कंटेनर परत पाठवले आहेत. चहाचे ‘दोन कंटेनर तैवानमधून आणि एक इराणमधून परत पाठवण्यात आले आहेत. भारतीय चहामध्ये कमाल अवशेष पातळी (MRL) जास्त असल्याने आम्हा हा चहा विकत घेऊ शकत नसल्याचे तैवानचे म्हणणे आहे.
का नाकारला जात आहे भारतीय चहा?
चहांच्या मळ्यामध्ये जेव्हा कीटकनाशके फवारणी केली जाते तेव्हा चहामध्ये उच्च MRL पातळी आढळते. अहवालानुसार, निर्यातदारांचे म्हणणे आहे की, ज्या कंटेनरमधून हा चहा पाठवण्यात आला होता. त्या कंटनरमध्ये क्विनालफॉस किटकनाशकाचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त आढळून आले आहे. आतापर्यंत, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने MRL ला ३४ कीटकनाशकांसाठी अधिसूचित केले आहे. या चहाच्या कंटेनरची स्वतंत्र प्रयोगशाळेत चाचणी केली असता, एप्रिल ते मे च्या मध्यापर्यंत चहाच्या मालातील MRL FSSAI ने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आणि म्हणून तैवान आणि इराणने हे चहाचे कंटेनर स्वीकारण्यास नकार दिला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, इराणने जो चहा नाकारला त्यामागे चहा उत्पादकाचा दोष नसून निर्यातदारांचा दोष आहे.
एमआरएल पातळी वाढण्याची कारणे
इंडियन टी एक्सपोर्टर्स असोसिएशन (ITEA) चे अध्यक्ष अंशुमन कनोरिया यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की भारतीय निर्यातदार चहासाठी एफएसएसएआय नियमांचे पालन करतात. तथापि, अनेक देश EU मानकांच्या नियमांचे पालन करतात, जे FSSAI नियमांपेक्षा अधिक कडक आहेत. रासायनिक क्विनालफॉस (कीटकनाशक)साठी, भारतातील एमआरएल ०.०१ मिलीग्राम प्रति किलो आहे, जे जगातील सर्वात कठोर मानकांपैकी एक आहे. जपानसाठी मानक ०.१ आणि युरोपियन युनियनसाठी ०.७ आहे.
तैवानमध्ये कठोर नियम
चहा निर्यातदारांचे म्हणणे आहे, की अनेक देशांना त्यांच्या कडक एमआरएलमुळे तैवानला चहा निर्यात करणे खूप कठीण आहे. व्हिएतनाम आणि चीनमधील चहा देखील तैवानमध्ये नाकारले जातात कारण ते तैवानच्या अटी पूर्ण करू शकत नाहीत. निर्यातदाराने सांगितले की, तैवानने नाकारलेला भारतीय चहा कोलकाता येथील एका मोठ्या निर्यातदाराने पाठवला होता. मात्र, कंपनीने ६०० कंटेनर पाठवले होते, त्यापैकी केवळ दोनच नाकारण्यात आले. दुसर्या निर्यातदाराने सांगितले की, क्रोमियम सामग्रीच्या उपस्थितीमुळे चीनने भारताचा सीटीसी चहा देखील नाकारला. स्टेनलेस स्टीलच्या यंत्रांच्या वापरामुळे भारतीय चहामध्ये क्रोमियमचे अंश आढळतात.
गेल्या दोन वर्षांत भारताची चहाची निर्यात
पीटीआयने चहा बोर्डाच्या आकडेवारीचा हवाला देऊन म्हटले आहे की, गेल्या आर्थिक वर्षात भारताने २००.७९ दशलक्ष किलो चहाची निर्यात केली, जी मागील आर्थिक वर्षातील २०३.७९ दशलक्ष किलोपेक्षा थोडी कमी आहे. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात चहाच्या निर्यातीतून मिळालेला नफा जास्त होता. भारताने गेल्या आर्थिक वर्षात ५४१५.७८ कोटी रुपयांचा चहा विकला, तर मागील आर्थिक वर्षात ५३११.५३ कोटी रुपयांचा चहा विकला गेला. चहा उद्योगातील सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, शिपिंग कंटेनर्स आणि समुद्रातील उच्च मालवाहतुकीतील काही त्रुटींमुळे ही घट झाली आहे. भारतीय चहा निर्यातदार २०२२ मध्ये २२०-२२५ दशलक्ष किलोग्राम चहाची निर्यात करण्याचा विचार करत आहेत. तर २०२५ पर्यंत, चहा मंडळाचे वार्षिक ३०० दशलक्ष किलोग्रॅम चहा विकण्याचे उद्दिष्ट आहे.