मानव आणि कुत्रा यांच्यातील सहसंबंध सर्वांना माहीत असतात. तरीही कुत्र्यांचे वाढते हल्ले, कुत्रा आणि मानव यांच्यात होणारा संघर्ष चिंताजनक आहे. सध्या भारतातील कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर माणूस आणि कुत्रे यांच्यातील संघर्ष का वाढत आहे? कुत्र्यांची माणसांप्रतिची मानसिकता का बदलत आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणूस आणि कुत्रा यांच्यातील सहसंबंध

कुत्रा हा माणसाचा मित्र आहे, हे विधान केले जाते. माणूस आणि कुत्रा यांच्या सहसंबधांचे पुरावे पुरातत्त्वशास्त्रानुसार ३२ हजार वर्षांहून अधिक जुने आहेत. घोडे पाळण्याआधी कुत्रे पाळण्याची परंपरा असल्याचे दिसते. कुत्र्यांच्या आधी माणसाने लांडगे पाळण्यास सुरुवात केली. लांडगे माणसांचे अन्नधान्य उधळून टाकत असत. यावर नियंत्रण आणण्यासाठी माणसाने लांडग्यांना पाळण्यास सुरुवात केली. Boehringer Ingelheim या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधाप्रमाणे, हे लांडगे माणसांना शिकारीसाठी मदत करत. म्हणून माणसाने लांडग्यांना पाळण्यास सुरुवात केली. पुढे लांडग्यांची उपप्रजात कुत्रे यांचा पाळीव प्राण्यांमध्ये समावेश झाला. लांडग्याच्या शरीरविज्ञानाच्या उत्क्रांतीबरोबरच, मानव आणि ज्याला आपण आता कुत्रे म्हणतो, यांच्यातील संबंध विकसित होत असल्याचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत.

झेक प्रजासत्ताकमधील एका दफनस्थळावर एक कुत्रा मृत्यूनंतर त्याच्या तोंडात काळजीपूर्वक ठेवलेल्या हाडांसह पुरलेला आढळला. कुत्र्याचे हे मृत शरीर ३२ हजार वर्षे जुने आहे. जर्मनीमध्ये एका कुत्र्याचा सांगाडा पुरुष आणि एका महिलेच्या मृतदेहांसह पुरला होता. रेडिओकार्बन डेटिंगनुसार हे १४,३०० वर्षांपूर्वी पुरण्यात आले आहे. रशियातील तुमातचा ममी केलेला काळा कुत्रा १२,४५० वर्षे जुना असल्याचे मानले जाते आणि इस्रायलमध्ये ऐन मल्लाहा नटुफियन वस्ती येथे १२ व्यक्तींना दफन करण्यात आले आहे, ज्यापैकी एका व्यक्तीचा हात एका लहान पिल्लाच्या शरीरावर आहे. हे दफन १२ हजार वर्षांपूर्वी झाले असावे असे मानले जाते. यावरून कुत्रे आणि माणूस यांच्यामध्ये असणाऱ्या संबंधाचे हे काही पुरावे आढळतात. तसेच, मानव पशूंसह राहत होता, मानवी वस्तीमध्ये प्राणी पाळण्याची व्यवस्था होती याचेही अनेक पुरावे सापडतात.

अगदी वैदिक काळामध्ये ऋग्वेदातील दहाव्या मंडलामध्ये सरमा-पणि संवादसूक्त येते. हे सूक्त वैदिक काळात कुत्रे पाळले जात होते, याचे उदाहरण आहे. इंद्र देवतेच्या गाई पणि या आदिवासी प्रजातीने चोरलेल्या असतात. या गाईंचा शोध घेण्यासाठी देव त्यांच्या सरमा नामक कुत्रीला पाठवतात. तेव्हा पणि आणि सरमा यांच्यात झालेला संवाद म्हणजे हे सूक्त होय. यावरून मानवी कामांसाठी कुत्र्यांचा वापर करण्यात येत असे, असे लक्षात येते.

भारतातील कुत्र्यांचे वाढलेले हल्ले

भारतात २०१९ आणि २०२२ दरम्यान भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या सुमारे १६ दशलक्ष प्रकरणांची नोंद झाली. सरासरी दररोज १० हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतात भटक्या कुत्र्यांकडून सर्वाधिक हल्ले होतात. जगात रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ३६ टक्के मृत्यू भारतात होतात. रेबीजमुळे मृत्यू होण्याच्या सर्वाधिक घटनांसह जगात भटक्या कुत्र्यांची संख्याही भारतात आहे. प्राणी जन्म नियंत्रण नियम, २००१ चे पालन न करणे, हे याचे मुख्य कारण आहे. या नियमाच्या अंतर्गत भटक्या कुत्र्यांना मारले जाऊ शकत नाही, फक्त निर्बीजीकरण केले जाऊ शकते. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पालिकेकडे पैशांची कमतरता असल्याचे बहुतांश वेळा दिसून येते. उत्तर प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये कुत्रे चावण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमागील कारणे

कुत्रा आणि मनुष्य यांचे अनेक वर्षांपासूनचे सहसंबंध आहेत. म्हणजेच ते एकत्र राहिलेले आहेत. कुत्रा हा प्राणी माणसाळलेला आहे. परंतु, पाळीव कुत्रा आणि भटका कुत्रा असा साधारण फरक आपण करत असलो, तरी भटके कुत्रे हेही पाळीव कुत्र्यांप्रमाणेच इमानदार असतात. त्यांना कोणी विशेष सांभाळणारा नसल्यामुळे ‘भटके’ असे त्यांना म्हटले जाते. या भटक्या कुत्र्यांवर कोणाचेही नियंत्रण नसते. यामुळे ते माणसाला त्रासदायक वाटतात. प्राणितज्ज्ञ कावेरी राणा भारद्वाज यांनी या संदर्भात आपले संशोधन मांडले आहे.

हेही वाचा- विश्लेषण : रिपर ड्रोनमुळे भारतीय सैन्यदलांची क्षमता कशी विस्तारणार?

कुत्र्यांची संख्या नियंत्रणापलीकडे वाढत आहेत. एक मादी कुत्री वर्षभरात सहजरीत्या २० पिल्लांना जन्म देऊ शकते. यामुळे अन्नपुरवठा आणि संख्या यामध्ये तफावत होते. भूक आणि जगण्याची इच्छा यामुळे ते अन्न मिळवण्यासाठी हल्ले करतात. घरातील एका कुत्र्याला साधारणपणे ५-६ पोळ्या आवश्यक असतात, असे जरी गृहीत धरले तरी रस्त्यावरील कुत्र्यांना किती अन्न आवश्यक आहे आणि त्यामानाने पुरवठा किती होतो, याचा अंदाज येईल. भूक त्यांना आक्रमक बनवण्याचे एक कारण आहे.

हेही वाचा – विश्लेषण : उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केलेले ‘गारदी’ नक्की आहेत तरी कोण? काय आहे गारदींचा इतिहास

कुत्र्यांची स्मरणशक्ती उत्तम असते. कुत्र्यांवर होणारे हल्ले, गाडी खाली येऊन होणारे कुत्र्यांचे मृत्यू, कुत्र्यांना होणारी अन्नातून विषबाधा, माणसाने कुत्रे दूर करण्यासाठी केलेली तुच्छ वागणूक या गोष्टी कुत्र्यांच्या लक्षात असतात. एखाद्या गाडीखाली येऊन एखादे पिल्लू मेले तर मादी कुत्री गाडीला आपला शत्रू मानते. यामुळे विशिष्ट भागात कुत्रे मागे लागणे, दुचाकीस्वारांच्या मागे लागणे अशा प्रकारे ते आपली दहशत निर्माण करतात.

हार्वर्ड युनिव्हर्सिटीने सादर केलेल्या संशोधनानुसार वाढत्या हवामानाचाही कुत्र्यांवर परिणाम होतो. तापमानवाढीमुळे कुत्रे अधिक आक्रमक होतात, असे त्यांनी संशोधन मांडले आहे. यासाठी त्यांनी उन्हाळ्यातील आणि पावसाळ्यातील कुत्र्यांच्या वर्तवणुकीचा अभ्यास केला.

हेही वाचा- विश्लेषण : अंतराळ संशोधनाला बळकटी देणारा ‘आर्टेमिस ॲकॉर्ड’ म्हणजे काय?

प्राणी बचावकर्ते अभिनव श्रीहान यांनी भटक्या कुत्र्यांमधील आक्रमकता कमी करण्यासाठीच्या उपाययोजना त्यांच्या संशोधनात मांडल्या आहेत. त्यांच्या मते, कुत्रा हा प्राणी माणसाळता येतो. मग तो भटका कुत्रा असला तरीही तो माणसाळू शकतो. नागरी संस्था किंवा लोकांचे काही समूह भटक्या कुत्र्यांना अन्नाचा पुरवठा करू शकतात. त्यांच्याशी प्रेमाने वागू शकतात. त्यांची नसबंदी करणे यांसारख्या गोष्टी करू शकतात. अगदी २० कुत्रे नाहीत, परंतु, ५-१० कुत्र्यांशी प्रेमाने वागल्यास ते इतर कुत्र्यांशी सुसंवाद साधू शकतात. माणसानेसुद्धा कुत्र्यांबाबतची वर्तवणूक बदलली पाहिजे. कुत्र्यांना ते ‘भटके’ प्रजातीत आहेत, हे कळत नाही. त्यामुळे पाळीव कुत्रा आणि भटका कुत्राही एकमेकांशी सुसंवाद साधतात. या संदर्भात त्यांनी एक निरीक्षण मांडले आहे की, ज्या लोकांकडे कुत्रे पाळलेले असतात, त्यांच्याशी इतर भटके कुत्रेही चांगली वर्तवणूक ठेवतात. त्यामुळे कुत्र्यांवरील हल्ले कमी करणे बहुतांशी माणसाच्या हातात आहे.

आज भारतातील कुत्र्यांच्या हल्ल्याची वाढती संख्या बघता शासनावर सर्वस्वी जबाबदारी सोपवून चालणार नाही. त्यासाठी आपल्या वैयक्तिक किंवा वस्ती पातळीवरही प्रयत्न होणे आवश्यक आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is there a constant increase in the incidence of dog bites why does dog aggression increase vvk
Show comments