बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे. कट्टरपंथी इस्लामी गट दुर्गापूजेचा उत्सव विस्कळित करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील देशाच्या अंतरिम सरकारने हिंदू सण शांततेत साजरे करता यावेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असतानाही अशांततेची भीती निर्माण झाली आहे. बांगलादेशात ९ ते १३ ऑक्टोबरदरम्यान दुर्गापूजा होणार आहे. पंतप्रधान शेख हसीना यांची देशातून हकालपट्टी करण्यात आली. त्या राजीनामा देऊन, भारतात पळून गेल्यापासून हिंदूंविरुद्ध भेदभावाचे अनेक आरोप समोर आले आहेत. दुर्गापूजा उत्सवादरम्यान बांगलादेशात अशांततेची भीती निर्माण होण्याचे कारण काय? दुर्गापूजेवर बांगलादेशातील इतर गट आक्षेप घेत आहेत का? त्याविषयी जाणून घेऊ.

बांगलादेशात दुर्गापूजा उत्सवादरम्यान भीतीचं सावट

‘न्यूज १८’च्या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, मुस्लीम संस्थांनी सुरक्षा व्यवस्था आणि धमक्यांचे कारण देत हिंदू अल्पसंख्याकांना दुर्गापूजा साजरी करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यात बांगलादेशातील अनेक भागांत दुर्गामूर्तींची तोडफोड झाल्याच्या बातम्यांचाही उल्लेख आहे. किशोरगंजच्या बत्रीश गोपीनाथ जिउर आखाड्यात गुरुवारी पहाटे देवीच्या नवीन मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. कोमिल्ला जिल्ह्यात दुर्गामूर्तीची तोडफोड करण्यात आली आणि मंदिरातील दानपेटी लुटण्यात आली, अशी बातमी ‘न्यूज१८’ ने दिली आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, सोशल मीडियावरील व्हिडीओंमध्ये बांगलादेशातील कट्टरपंथी गट दुर्गापूजा उत्सवाला विरोध करताना दिसत आहेत. ते “पूजो होते देबो ना” (दुर्गापूजेला परवानगी देणार नाहीत), अशा घोषणा देत रस्त्यावर उतरले आहेत.

बांगलादेशातील एका कट्टरपंथी इस्लामी गटाने देशातील हिंदूंना उघडपणे दुर्गापूजा साजरी करण्यापासून आणि मूर्तिपूजेत किंवा विसर्जनात भाग घेण्याविरुद्ध इशारा दिला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : बेकरीतील केकमुळे होऊ शकतो कॅन्सर? कोणत्या राज्याने दिला इशारा? कारण काय?

दुर्गापूजेवर इस्लामी गटाचा आक्षेप?

बांगलादेशातील एका कट्टरपंथी इस्लामी गटाने देशातील हिंदूंना उघडपणे दुर्गापूजा साजरी करण्यापासून आणि मूर्तिपूजेत किंवा विसर्जनात भाग घेण्याविरुद्ध इशारा दिला आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, इन्साफ कीमकारी छात्र-जनता या कट्टरपंथी गटाने गेल्या महिन्यात ढाक्याच्या सेक्टर १३ मध्ये दुर्गापूजा उत्सवासाठी खेळाच्या मैदानाचा वापर करणाऱ्या हिंदू समुदायाविरोधात आंदोलन केले. त्यांनी पर्यावरणाचे नुकसान आणि धार्मिक कार्यांसाठी सरकारी निधीचा वापर यासह उत्सवाला विरोध करण्यामागील कारणांचा तपशील असणारी एक यादीच सादर केली. हिंदू सणामुळे देशातील बहुसंख्य मुस्लिमांना त्रास निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी बांगलादेशातील अनेक विशेष जमिनींवर कब्जा करून बांधलेली मंदिरे हटविण्याचीही मागणी केली, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

शांततापूर्ण उत्सवासाठी सरकारचे उपाययोजनेचे आश्वासन

दुर्गापूजेदरम्यान संभाव्य संघर्षाच्या भीतीने बांगलादेशच्या अंतरिम सरकारने या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की, ते हा उत्सव शांततापूर्णतेने पार पडेल, हे सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलतील. “या वेळचा दुर्गापूजा उत्सव मागील सर्व उत्सवांच्या तुलनेत सर्वोत्तम असेल. हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जे काही उपाय आवश्यक असतील, ते आम्ही करू,” असे गृह व्यवहार सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोहम्मद जहांगीर आलम चौधरी म्हणाले. मंगळवारी झालेल्या कायदा व सुव्यवस्थाविषयक सल्लागार समितीच्या बैठकीनंतर त्यांचे हे वक्तव्य समोर आले. अंतरिम सरकारने दुर्गापूजा उत्सवादरम्यान देशात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यामध्ये गस्त, गुप्तचरांकडून पाळत ठेवणे, सशस्त्र दल तैनात करणे आणि स्थानिक प्रशासन व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी पूजामंडपांची तपासणी करणे यांचा समावेश आहे, असे ‘डेली बांगलादेश’च्या वृत्तात म्हटले आहे.

“सोशल मीडियावरून धार्मिक भावना दुखावणाऱ्या कोणत्याही आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक विधानांचा प्रसार होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पूजा उत्सव समित्यांनी पूजामंडपांवर २४ तास देखरेख ठेवण्यासाठी पुरेशा संख्येने स्वयंसेवक आणि रक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे,” असे आदेशात म्हटले आहे. बांगलादेशी दैनिक ‘ढाका ट्रिब्यून’च्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरमध्ये युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दुर्गापूजा समित्यांनी अजान आणि नमाजदरम्यान त्यांची वाद्ये बंद ठेवावीत, अशी सूचना केली होती.

गृह व्यवहार सल्लागाराने लोकांना पूजा उत्सव पाहण्यासाठी सीमा ओलांडू नये, असे आवाहन केले होते. “पूजेच्या वेळी लोक सीमेपलीकडे जातात. या बाजूचे लोक पलीकडे (सीमेवर) पूजा पाहण्यासाठी जातात. मी सर्वांना विनंती केली आहे की, यावेळी सीमाभागात चांगल्या पूजामंडपांची व्यवस्था करावी; जेणेकरून आपल्या लोकांना पूजा पाहण्यासाठी पलीकडे जावे लागणार नाही आणि पलीकडच्या लोकांना येथे यावे लागणार नाही,” असे चौधरी यांनी ‘बंगाली दैनिक ‘प्रथम आलो’ला सांगितले. गेल्या महिन्यात धार्मिक व्यवहार सल्लागार एएफएम खालिद हुसैन यांनी दुर्गापूजेदरम्यान सांप्रदायिक सलोखा बिघडविणाऱ्या किंवा प्रार्थनास्थळांना लक्ष्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यांनी हिंदू समुदायाला आश्वासन दिले की, कोणीही त्यांच्या मंदिरांना हानी पोहोचवू शकणार नाही.

हेही वाचा : ‘ISIS’ने अपहरण केलेल्या याझिदी महिलेची ‘गाझा’मधून तीन देशांनी कशी केली १० वर्षांनंतर सुटका?

हिंदूंच्या सुरक्षेची चिंता

हसीना यांच्या हकालपट्टीनंतर बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा हा चर्चेचा विषय झाला होता. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, हसीना सरकार पाडल्यानंतर एका आठवड्यात हिंदूंवर हल्ला होण्याच्या २०५ घटनांची नोंद झाली. ऑगस्टमध्ये हिंदूंचे व्यवसाय, त्यांची मालमत्ता आणि मंदिरांची तोडफोड केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावेळी हजारो हिंदू ढाका आणि ईशान्येकडील बंदर शहर चट्टोग्राममध्ये संरक्षणाची मागणी करीत रस्त्यावर उतरले होते. बांगलादेशातील १७ कोटी लोकसंख्येपैकी आठ टक्के हिंदू आहेत. युनूस यांनी बांगलादेशची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी देशात जातीय सलोख्याचे आवाहन केले. “आपला जातीय सलोख्याचा देश आहे. तुमच्यापैकी कोणीही असे काहीही करू नये; ज्यामुळे धार्मिक सलोख्यावर परिणाम होईल.” युनूस यांनी १६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका कॉलमध्ये आश्वासन दिले होते की, अंतरिम सरकार बांगलादेशातील हिंदू व सर्व अल्पसंख्याक गटांच्या संरक्षण आणि सुरक्षेला प्राधान्य देईल.”