माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. मात्र, आता नवीन संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार या शिखराची उंची दरवर्षी वाढत आहे. माउंट एव्हरेस्टला तिबेटीमध्ये चोमोलुंगमा आणि नेपाळीमध्ये सागरमाथा या नावानेही ओळखले जाते. भारतीय उपखंडाची युरेशियन टेक्टोनिक प्लेटशी टक्कर झाल्यानंतर सुमारे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी माउंट एव्हरेस्टची निर्मिती झाली असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. नवीन नोंदीनुसार शिखराची उंची आता ८,८४९ मीटर (२९,०३२ फूट) आहे. एव्हरेस्टच्या वाढीचा वेग आता वाढला आहे. ही वाढ अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. माउंट एव्हरेस्टची उंची का वाढत आहे? त्यामागील कारणे काय? हा धोक्याचा इशारा आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.

संशोधनातून काय समोर आले?

‘नेचर जिओसायन्स’ या जर्नलमध्ये सोमवारी (३० सप्टेंबर) प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, गेल्या ८९,००० वर्षांत माउंट एव्हरेस्टची उंची १५ ते ५० मीटर इतकी वाढली आहे. त्यात म्हटले आहे की, वाढीची ही प्रक्रिया आताही सुरूच आहे. एव्हरेस्ट दरवर्षी एक मिलिमीटरच्या अपेक्षित वाढीच्या तुलनेत सुमारे दोन मिलिमीटरने वाढत आहे. “माउंट एव्हरेस्ट हे पौराणिक कथा आणि दंतकथेशी जुळलेले एक उल्लेखनीय शिखर आहे आणि ते अजूनही वाढत आहे,” असे अभ्यासाचे सह-लेखक व युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल)चे पीएच.डी.चे विद्यार्थी ॲडम स्मिथ म्हणाले. बीजिंगमधील चायना युनिव्हर्सिटी ऑफ जिओसायन्सेसचे भूवैज्ञानिक जिन-जेन दाई यांच्या म्हणण्यानुसार, एव्हरेस्ट शिखर हिमालयातील इतर सर्वांत उंच शिखरांपेक्षा २५० मीटर अधिक उंच आहे, ही एक विसंगती आहे. न्यूयॉर्क टाइम्स (एनवायटी) नुसार, “जरी मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून पर्वत स्थिर दिसत असला तरी त्यांची सतत वाढ होत असते,” असे ते म्हणाले.

एव्हरेस्टच्या वाढीचा वेग आता वाढला आहे. ही वाढ अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : टाईप-१ मधुमेह येणार नियंत्रणात; काय आहे ‘Stem Cell Transplant’? याला आरोग्य क्षेत्रातील चमत्कारिक संशोधन का म्हटले जातेय?

एव्हरेस्टच्या वाढीमागील कारणे काय?

नेपाळ आणि चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या सीमेवर उभे असलेले माउंट एव्हरेस्ट एका नदीमुळे वाढत आहे. हिमालयाच्या सर्वांत उंच भागापासून ७५ किलोमीटर लांब असणार्‍या अरुण नदीच्या भूस्तरात होणार्‍या बदलांमुळे शिखराची उंची वाढत आहे. सुमारे ८९,००० वर्षांपूर्वी हिमालयातील कोसी नदीत अरुण नदीच्या उपनदीचा काही भाग विलीन झाला, जो आज एव्हरेस्टच्या उत्तरेस आहे. अभ्यासातील सह-लेखक व भूगर्भशास्त्रज्ञ मॅथ्यू फॉक्स यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला सांगितले की, ही घटना दुर्मीळ आहे. असे तेव्हाच घडते जेव्हा एखादी नदी आपला मार्ग बदलते. संशोधकांचे म्हणणे आहे की, दोन नद्या विलीन झाल्यामुळे एव्हरेस्टजवळील नदीची धूप वाढली आणि मोठ्या प्रमाणात खडक व माती वाहून गेली. त्यामुळे अरुण नदीच्या भूस्तरात बदल झाला आणि पृष्ठभागाचे वजन कमी झाले.

“वरच्या भागातून वाहणारी अरुण नदी उंचीवर पूर्वेकडे वाहते. नंतर ती अचानक कोसी नदीच्या रूपात दक्षिणेकडे वळते. याच अस्थिरतेचा संबंध एव्हरेस्ट शिखराच्या वाढत्या उंचीशी आहे,” असे ते पुढे म्हणाले. अरुण नदी कोसी नदी प्रणालीचा भाग झाल्यापासून नदीची धूप वाढली आहे. हजारो वर्षांहून अधिक काळापासून अरुण नदीच्या काठावरील अब्जावधी टन गाळ आणि दगड वाहून गेले आहेत. त्यामुळे मोठे घाट तयार झाले आहेत. प्रचंड प्रमाणात गाळ नष्ट झाल्यामुळे आजूबाजूची जमीन वाढली आहे; ज्याला ‘आयसोस्टॅटिक रिबाउंड’ म्हणून ओळखले जाते.

अभ्यासाचे लेखक म्हणतात की, या बदलांनी इतर हिमालयीन शिखरांवरदेखील परिणाम झाला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

संशोधनातून समोर आलेली माहिती महत्त्वाची का?

अभ्यासाचे लेखक म्हणतात की, या बदलांनी इतर हिमालयीन शिखरांवरदेखील परिणाम झाला आहे. जसे की, ल्होत्से व मकालू. ल्होत्से व मकालू ही सर्वोच्च उंच शिखरे जगात अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांचीही वाढ दर्शविण्यात आली आहे. अरुण नदीच्या सर्वांत जवळ असलेल्या मकालू शिखराच्या वाढीचा वेग आणखी वाढेल, असा संशोधकांचा अंदाज आहे. “हा प्रभाव अनिश्चित काळासाठी चालू राहणार नाही. नदी प्रणाली नवीन समतोल स्थितीत येईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील,” असेही त्यांनी सांगितले. “माउंट एव्हरेस्टसारखे अपरिवर्तनीय वैशिष्ट्यदेखील चालू भूगर्भशास्त्रीय प्रक्रियेमुळे प्रभावित होऊ शकते. यावरून दिसून येते की, पृथ्वी सतत बदलत आहे,” असेही त्यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले.

हेही वाचा : पाकिस्तानचं सिद्दीकी कुटुंब ‘शर्मा’ बनून भारतात का आले? मुस्लीम असूनही शेजारी देश सोडण्याचं खरं कारण काय?

एव्हरेस्टची उंची वाढणे अनेक आव्हाने निर्माण करू शकते. अतिरिक्त उंचीमुळे उच्च भागावर अधिक बर्फ वाढू शकतो. ‘फॉक्स’ या अभ्यासाच्या सह-लेखकांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला सांगितले, “याचा सर्वांत मोठा परिणाम कदाचित गिर्यारोहकांवर झाला आहे. कारण- त्यांना आणखी २० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीवर चढावे लागेल.” परंतु या अभ्यासाचे निष्कर्ष सर्वांनाच पटणारे नाहीत.