नीट-यूजीबाबत केंद्र सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल काय होता?

नीट-यूजी या परीक्षेचा पेपर २०२४ मध्ये फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर, परीक्षा अधिक पारदर्शक आणि पेपरफुटीमुक्त व्हावी, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्राो) माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नेमली. या समितीने आपला सविस्तर अहवाल गेल्या ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला सुपूर्द केला. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ अर्थात ‘एनटीए’ने केवळ शैक्षणिक प्रवेशांसाठीच्या परीक्षा घेणे इष्ट, असे समितीचे म्हणणे होते, जे शिक्षण खात्यानेही स्वीकारले. शिवाय, या अहवालात ‘सीयूईटी’सह सर्व प्रवेश परीक्षा संगणक आधारित असाव्यात, यावर भर होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संगणक आधारित परीक्षा घेण्यास का सुचविण्यात आले?

‘नीट’ची गेली परीक्षा (२०२४) पेन-कागद पद्धतीने झाली होती. म्हणजे, रीतसर प्रश्नपत्रिका मिळून योग्य उत्तराच्या पर्यायाचा गोळा पेनने भरणे, अशी ही परीक्षा होती. यात प्रश्नपत्रिकेची प्रत काही दिवस आधी छापणे गरजेचे ठरते, ज्यात कोणत्याही टप्प्यावर प्रश्नपत्रिकेला पाय फुटणे सोपे असते. संगणक आधारित परीक्षेत एक तास आधी प्रश्नपत्रिका तयार करून केंद्रांवर पाठवणे शक्य असल्याने हा धोका फारच कमी. संगणकआधारित परीक्षेचा आणखी एक फायदा म्हणजे परीक्षा वेगवेगळ्या सत्रांत घेता येते. या प्रत्येक सत्रांत प्रश्नपत्रिका वेगळी असली, तरी काठिण्यपातळी समान असू शकते. अशा वेगवेगळ्या सत्रांत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांतील गुणांचे समानीकरण करून पर्सेंटाइलवर गुणानुक्रम ठरवावे लागतात. ही पद्धत इतर अनेक परीक्षांत आताही वापरली जात असून, तीच ‘नीट’साठी वापरावी, अशी समितीची शिफारस होती.

हेही वाचा :देशातील प्रजनन दर झपाट्याने का घटतोय? हा चिंतेचा विषय आहे का?

समितीच्या शिफारशीनंतरही पेन-पेपर पद्धत का कायम ठेवली गेली?

संगणक आधारित परीक्षेसाठी सर्व केंद्रांत मुळात संगणकाची आणि पेपर पोचविण्यासाठी इंटरनेटची गरज असते. साहजिकच अखंडित वीजपुरवठा हीसुद्धा गरज असते. नीट-यूजी या परीक्षेला गेल्या वर्षी २४ लाख विद्यार्थी बसले होते. यंदा ही संख्या २८ लाख ते ३० लाखांवर जाईल, असा अंदाज आहे. बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागांतील केंद्रांवर परीक्षा देतील. यातील काही केंद्रांवर संगणक, इंटरनेट आणि अखंडित वीजपुरवठा या सुविधा नसतील, तर खोळंबा होणार आहे. नुकत्याच झालेल्या संगणकआधारित सीयूईटी परीक्षेवेळी अनेक केंद्रांवर तांत्रिक समस्येमुळे परीक्षा रद्द करावी लागली होती. त्यामुळे त्यांचे पुन्हा स्वतंत्र नियोजन करावे लागले. नीट-यूजी परीक्षा सुविहितपणे पार पाडण्याकरिता या सुविधा अत्यावश्यक आहेत. मात्र, त्या निर्माण करण्यासाठी हातात खूप कमी, म्हणजे जेमतेम तीन महिने इतकाच कालावधी उरला आहे. त्यामुळे शिक्षण मंत्रालयाने यंदाची नीट-यूजी पेन-पेपर याच प्रचलित पद्धतीने घ्यायचे ठरवले आहे.

हेही वाचा :Sanchar Saathi : घरबसल्या करता येणार सायबर फसवणुकीची तक्रार; काय आहे सरकारचे नवीन संचार साथी ॲप?

तंत्रज्ञानाव्यतिरिक्त आणखी कारणे काय?

संगणकआधारित परीक्षा घ्यायची झाल्यास, ती एकाच सत्रात घेणे शक्य नाही. एका सत्रात जास्तीत जास्त दीड लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येऊ शकेल, असे ‘एनटीए’चे म्हणणे आहे. ‘एनटीए’च्या अंदाजानुसार, यंदा ‘नीट-यूजी’ला ३० लाख विद्यार्थी बसले, तर २० सत्रांत घ्यावी लागेल; त्यासाठी किमान १० दिवस लागतील. या २० सत्रांसाठी समान काठिण्यपातळीचे वेगवेगळे प्रश्नपत्रिका संच तयार करणे हेही कमी कालावधीत अवघड आहे. शिवाय, प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असल्यास गुणांचे समानीकरण करावे लागेल, ज्याचे सूत्र ठरवणे क्रमप्राप्त ठरेल. हातात असलेल्या कमी कालावधीचा विचार करता, मुलांनाही आता आयत्या वेळी नवीन परीक्षा पद्धतीचा सराव करा, असे सांगणे इष्ट ठरणार नाही. त्यामुळे पेन-पेपर पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय आत्ता तरी व्यावहारिक दिसतो. फक्त, कागदी प्रश्नपत्रिकेचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी सीसीटीव्ही देखरेखीसह विविध उपाय करणे आवश्यक आहे. कारण, जर याही वर्षी पेपरला पाय फुटून पुढे फेरपरीक्षेचे त्रांगडे आणि प्रवेश प्रक्रियेला उशीर हेच घडले, तर प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांसाठी ते अन्यायकारक ठरेल.
siddharth.kelkar@expressmail.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why neet ug to be conducted in pen paper mode print exp css