यावर्षी भारताकडून ऑस्करसाठी कोणता चित्रपट पाठवायचा यावरू प्रचंड वाद निर्माण झाले. काही लोकांच्या म्हणण्यानुसार विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा पाठवायचा होता तर काहींचा मनात राजामौली यांचा ‘आरआरआर’ होता. पण या दोन्ही चित्रपटांना डावलून एक गुजराती चित्रपट पाठवला गेला आणि ते पाहून बऱ्याच लोकांचा भ्रमनिरास झाला. ऑस्कर हा एक असा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे जिथे जगातील प्रत्येक देश त्यांच्याकडून दरवर्षी एक चित्रपट पाठवतो. या सोहळ्याचं आणि त्या पुरस्काराचं महत्त्व मनोरंजसृष्टीत मोठं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने जसा गुजराती चित्रपट पाठवला तसाच पाकिस्ताननेही ‘जॉयलँड’ नावाचा त्यांचा चित्रपट ऑस्करला पाठवला. पण आता त्यांनी पाठवलेल्या या चित्रपटावर त्यांच्याच सरकारने बंदी घातली आहे. १८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, पण पाकिस्तानी सरकारने यावर घातलेल्या बंदीमुळे या चित्रपटाचं भवितव्य अंधकारमय दिसत आहे.

आणखी वाचा : ‘कांतारा’स्टार रिषभ शेट्टीच्या पत्नीच्या खांद्यावर होती ‘ही’ जबाबदारी म्हणाली “गरोदर असतानाही चित्रपटासाठी…”

कान्ससारख्या कित्येक आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात हा चित्रपट पाठवला गेला. समीक्षकांच्याही ती पसंतीस पडला, पण त्यात काही आक्षेपहार्य दृश्यं आणि चित्रपटाची मांडणी समाजासाठी योग्य नसल्याचं ठरवून पाकिस्तान सरकारने यावर बंदी घातली आहे. यामुळे सोशल मीडियावर पाकिस्तानची प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. चित्रपट ऑस्करला पाठवण्याआधी सरकारने बघितला नव्हता का असं म्हणत लोक या गोष्टीची खिल्ली उडवत आहे. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने प्रमाणपत्रदेखील दिलं होतं, तरी या चित्रपटावर बंदी घातल्या कारणाने याची चांगलीच चर्चा आहे.

चित्रपट कशावर भाष्य करतो?

सादीक यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘जॉयलँड’ पितृसत्ताक समाजातील लोकांच्या मानसिकतेवर कटाक्ष टाकतो. हा एक अत्यंत बोल्ड चित्रपट आहे आणि वास्तवाला धरून हा चित्रपट असल्याचं कित्येक समीक्षकांनी म्हंटलं आहे. एका कुटुंबातील तरुण मुलगा मादक नृत्य करणाऱ्या एका ट्रान्स महिलेच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासाठी तो त्याचं आहे ते आयुष्य बाजूला ठेवायला तयार होतो.

यामुळे त्या कुटुंबात निर्माण होणारे कलह, समस्या आणि त्या दोघांच्या नात्याची गुंतागुंत आणि यातून निर्माण होणारं नाट्य यावर हा चित्रपट बेतलेला आहे. एकूणच हा चित्रपट आणि यातील काही हीसंक आणि मादक दृश्यांमुळे यावर बंदी घालावी यासाठी पाकिस्तानी सरकारवर दबाव आणला आहे अशी चर्चादेखील आहे.

‘जमात-ए-इस्लामी’चे सदस्य मुशताक अहमद खान यांनी पाकिस्तानी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत या चित्रपटावर टीका केली आहे. ते ट्वीट करत म्हणाले, “पाकिस्तान हे एक इस्लामी राष्ट्र आहे, त्यामुळे इस्लाममध्ये निषिद्ध मानल्या गेलेल्या गोष्टींचा आम्ही निषेध करूच आणि हा चित्रपट इस्लामच्या विरुद्ध आहे त्यामुळे सरकारने घेतलेला निर्णय हा योग्यच आहे.”

दुसरीकडे या चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार मात्र या निर्णयामुळे नाराज आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. यातली कलाकार सारवत गिलानी म्हणते, “२०० पाकिस्तानी कलाकारांनी बनवलेल्या या चित्रपटाला विदेशातून एवढा सन्मान मिळाला आहे, पण आपल्याच देशात या चित्रपटाला मिळणारी वागणूक ही लज्जास्पद आहे. हा चित्रपट सगळ्यांनीच बघा अशी जबरदस्ती कुणीच करत नाही. पाकिस्तानी प्रेक्षक हुशार आहे. त्यांना जे योग्य वाटतं तेच ते बघतील अशी आमची खात्री आहे.”

‘जॉयलँड’ या चित्रपटात सानिया सईद, अली जुनेजो, अलिना खान, सरवत गिलानी, रस्ती फारूख, आणि सोहेल समीर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण पाकिस्तानने घातलेल्या या बंदीमुळे आता याच्या प्रदर्शनावरही प्रश्नचिन्हं उभं राहिलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why pakistan government banned their own film joyland which was sent for oscars avn
Show comments