सध्या भारत, इंडिया, हिंदुस्थान यावर विविध अंगांनी चर्चा होत आहेत. विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ हे नाव धारण केल्यामुळे भारताला असणाऱ्या ‘इंडिया’ या उपनामात बदल करण्यात येत आहे. परंतु, भारताला इंडिया म्हणण्यास याआधीही विरोध झालेला होता. पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या मोहम्मद अली जिना यांनीही भारत देशाला इंडिया म्हणण्यास विरोध केला होता. हा विरोध करण्यामागे कोणती कारणे होती, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवार, दि. ५ सप्टेंबर रोजी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी, ”मोहम्मद अली जिना यांनीही भारत राष्ट्राला ‘इंडिया’ म्हणण्यास विरोध केला होता. कारण, भारताला इंडिया म्हटल्यामुळे भारत हा ब्रिटिशांचा उत्तराधिकारी आहे आणि पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र वाटेल, असे त्यांचे मत होते,” याची आठवण करून दिली. जी-२० समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिण्यात आल्याने देशाच्या राजकारणात मोठे वादंग माजले आहेत. मोदी सरकारकडून देशाचे नाव बदलण्याचा घाट घातला जात असून, विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीला भाजपा पक्ष घाबरला आहे, असा दावा विरोधक करीत आहेत. तर भाजपाच्या नेत्यांकडून तुम्हाला भारत या नावात काय अडचण आहे, असा सवाल विरोधकांना केला आहे. ‘इंडिया’ शब्दाच्या ऐवजी ‘भारत’ शब्दाचा प्रयोग करण्यात येत आहे. असे करणे पाकिस्तानच्या विचारांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे, असाही तर्क विरोधक लावत आहेत. आता इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत म्हणणे, हे पाकिस्तानी विचारधारेला पूरक कसे आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

जिनांना ‘पाकिस्तान’ हे नाव का द्यायचे होते ?

भारत आणि इंडिया हा वाद भारताच्या फाळणीपासून आहे. बृहत भारताचे विभाजन होऊन पाकिस्तान या नवीन राष्ट्राची निर्मिती झाली. या नवीन राष्ट्राला ‘पाकिस्तान’ हे नाव देण्याची जिना यांची इच्छा होती. ‘पाकिस्तान’ म्हणजे शुद्ध. भारत या देशातून विभाजित झालेले हे मुस्लीमबहुल राष्ट्र शुद्ध आहे, आणि त्याचा भारताशी काही संबंध नाही, हे दर्शवण्यासाठी मोहम्मद जिना यांना ‘पाकिस्तान’ हे नाव द्यायचे होते.
इतिहासकार जॉन की यांनी इंडिया : ए हिस्ट्री या पुस्तकात लिहिले आहे की, ‘भारत’ या नावाविषयी कोणतेच वाद नाही. तसेच पाकिस्तान या नावाविषयीही नाहीत. पाकिस्तान हे नाव इस्लाम धर्माशी जवळीक साधणारे आहे. ‘पाकिस्तान’ या शब्दाचा प्रयोग चौधरी रहमत अली यांनी १९३३ मध्ये केला होता. उत्तरेकडील काही प्रांतांचे ते संक्षिप्त स्वरूप होते. पंजाब (पी), अफगाण प्रांत (ए), काश्मीर (के), सिंध. (एस) आणि बलुचिस्तान (स्तान) अशा संक्षिप्त स्वरूपातून पाकिस्तान शब्द तयार झाला. १९४० च्या दरम्यान इस्लामिक चळवळी मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. भारताची फाळणी निश्चित झाल्यावर मुस्लीम बहुल राष्ट्रासाठी ‘पाकिस्तान’ हे नाव निश्चित करण्यात आले.

स्वतंत्र भारताला ‘इंडिया’ म्हणण्यास विरोध का होता ?

मोहम्मद जिना यांनी ‘पाकिस्तान’ हे नाव ठरवले. तसेच भारत देशाला ‘इंडिया’ म्हणण्यास त्यांनी विरोध केला. इतिहासकार जॉन की यांनी लिहिले आहे की, जिना यांना ‘इंडिया’ हे नाव स्वीकारायचे नव्हते. त्यांना हे ब्रिटिश सत्तेचे चिन्हांकित असणारे नाव वाटत होते. परंतु, ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी ‘इंडिया’ हे नाव स्वीकारावे, अशी मागणी केली आणि नेहरूंनी ती मान्यही केली. ही मागणी मान्य झाल्याचे कळल्यावर जिना यांना राग आला होता.

जिना यांना ‘इंडिया’विषयी राग का होता ?

एसओएएसमधील दक्षिण आशियाई कायद्याचे प्राध्यापक मार्टिन लाऊ यांनी ‘इस्लाम अँड द कॉन्स्टिट्यूशनल फाउंडेशन्स ऑफ पाकिस्तान’ या शोधनिबंधामध्ये जिना आणि भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांच्या पत्रव्यवहारांचे संदर्भ दिले आहेत. जिना यांच्या मते, इंडिया’ हे नावच भ्रामक आहे. तसेच भारताच्या झालेल्या फाळणीवरही जिना खूश नव्हते. त्यांच्या मते, पाकिस्तानला अपेक्षेपेक्षा खूप कमी जमीन देण्यात आली. ‘इंडिया’ हे नाव घेऊन भारताला ब्रिटिशांचा आधार मिळेल, अशी शंका जिना यांना होती. तसेच पाकिस्तानला भारताच्या अधीन राहावे लागेल, याचीही भीती त्यांना वाटत होती.
जिना यांचे म्हणणे होते की, फाळणी ही धार्मिक मुद्द्यावर झालेली आहे. त्यामुळे भारताचे नाव हिंदुस्थान असावे. परंतु, मार्टिन लाऊ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य कायद्याच्या तरतुदींनुसार पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र नाही. तसेच १९४७ च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार भारत हे केवळ हिंदू राष्ट्र नाही. त्यामुळे त्याचे नाव हिंदुस्थान असणार नाही.
जिना यांनी सर्वोतोपरी ‘इंडिया’ या नावाला विरोध केला. इतिहासकार आयेशा जलाल यांनी द सोल स्पोक्समन: जिना, द मुस्लिम लीग अँड द डिमांड फॉर पाकिस्तान या पुस्तकात जिना यांनी हिंदुस्थान या नावासाठी केलेले प्रयत्नही नमूद केले आहे. यासंदर्भात जिना आणि माऊंटबॅटन यांच्यात पत्रव्यवहार झाले होते. सप्टेंबर १९४७ मध्ये माऊंटबॅटन यांनी लंडन येथे आयोजित केलेल्या भारतीय कला प्रदर्शनाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी जिना यांना विनंती केली. परंतु, त्या पत्रामध्ये ‘इंडिया’ या शब्दाचा उल्लेख केला होता. केवळ या कारणासाठी त्यांनी अध्यक्षपद नाकारले.


परंतु, राज्यघटनेच्या कलम १ मध्ये ‘भारत’ त्याला पर्यायी शब्द ‘इंडिया’ असा वापरला जाईल, असे नमूद केलेले आहे. त्यामुळे १९४७ च्या दरम्यान कितीही विरोध झाला तरी भारत आणि इंडिया या नावांचा प्रयोग कायदेशीररित्या करण्यात येऊ लागला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why pakistans founder jinnah was opposed to the name india for the independent indian nation vvk
Show comments