केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण अचानक वाढले आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये लागोपाठ झालेल्या घटनांनी नवी दिल्लीला सुरक्षा यंत्रणेकडे पुन्हा एकदा कटाक्षाने लक्ष देण्यास भाग पाडले आहे. म्हणूनच या वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यांची कारणमीमांसा समजून घेण्याचा हा प्रयत्न.

या हल्ल्यांचे प्रमाण अचानक का वाढले?

या मालिकेतील पहिला हल्ला ९ जून २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या सोहळ्यादिवशी झाला. या हल्ल्यात रियासी परिसरात दहशतवाद्यांनी वैष्णव देवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट दरीत कोसळली, यात १० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्याची वेळ महत्त्वाची होती. या दिवशी पंतप्रधानांचा शपथविधी समारंभ होता. दहशतवाद्यांना या हल्ल्यातून दहशतवाद जिवंत असल्याचा संदेश भारत सरकारला द्यायचा होता. जम्मू काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करून आंतराष्ट्रीय रडारपासून त्याला दूर ठेवणे सरकारला शक्य नाही, हे सूचित करायचे होते. मे महिन्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर म्हणाले होते की, आंतराष्ट्रीय स्तरावर काश्मीरसंदर्भात शांतता, ही कानठळ्या बसवणारी आहे.

अधिक वाचा: विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

लोकसभा निवडणुकांची पार्श्वभूमी

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये ५८.५८ टक्के दहशतवाद आहेत, त्यातील ५१.५ टक्के काश्मीर खोऱ्यात आहे. काश्मीर खोऱ्यात झालेल्या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये फारच कमी नागरिकांनी मतदान,केले होते. कारण त्यावेळी हे खोरे फुटीरतावादाशी झुंझ देत होते. स्थानिकांना दहशतवाद्यांकडून धमकावले जात असे. परंतु, जेव्हा पासून हा प्रदेश केंद्रशासित झाला आहे आणि अनुच्छेद ३७० रद्द झाल्यापासून मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा समाचार घेण्यात आला आहे. आणि आता फुटीरवाद संपवण्यात आला आहे. त्यामुळे बहुसंख्य स्थानिकांनी निवडणुकांच्या प्रक्रियेत भाग घेतला. या लोकसभा निवडणुकांची पार्श्वभूमीही या हल्ल्यामागे आहे.

पाकिस्तानी सैन्याचा किती पाठिंबा?

भारताची पकड या भागावर मजबूत होऊ नये यासाठी पाकिस्तानचे राजकारणी आणि लष्कर यांचा दहशतवादी मार्गाने काश्मीरवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानने १९९९ साली भारताबरोबर केलेला लाहोर करार मोडल्याचे कबूल केले. त्यांचे पंतप्रधान मोदींशी चांगले संबंध होते. दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरु (२०१५) होण्यापूर्वी व्यापारी देवाण-घेवाण चांगल्या स्तरावर होती.

चीनची भूमिका किती महत्त्वाची?

भारताने पूर्वी १०,००० सैनिक भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात केले होते. त्यानंतर भारत- चीन सीमेवर सैन्याची मजबूत फळी तैनात करण्याचा विचार होता. दरम्यान पूर्वेकडे झालेल्या गलवान भागातील भारत-चीन झटापटीमुळे तणावपूर्ण संबंध निर्माण झाले. त्यानंतर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील भारत- चीन सीमेच्या ५३२ किमी लांबीच्या रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात आपल्या सैन्याची सज्जता राखण्याकडे नवी दिल्लीने लक्ष पुरवले.

अधिक वाचा: ज्ञानवापी मशिदीचे सत्य ‘या’ ब्रिटिश विद्वानाने आणले समोर? काय सांगते त्याचे संशोधन? 

चीन- पाकिस्तान संगनमत

भारताला पाकिस्तान आणि चीन या दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या ७ जूनच्या चीन भेटीदरम्यान दोन्ही बाजूंनी दक्षिण आशियामध्ये शांतता आणि स्थिरता राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शिवाय सर्व प्रलंबित विवादांचे निराकरण करण्याची आवश्यकताही प्रतिपादन केली. पाकिस्तानने काश्मीरमधील ताज्या घडामोडींची चीनला माहिती दिली आहे. पाक-चीन संगनमत भारतासाठी धोक्याची घंटा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.