सुमित पाकलवार

वाघांच्या वाढलेल्या संख्येमुळे गडचिरोली जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून मानव वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झालाय. त्यात दोन वर्षांपासून ओडिशातून छत्तीसगडमार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींची भर पडली आहे. या २३ हत्तींच्या कळपाचा वावर प्रामुख्याने सीमाभागात आहे. ऑगस्ट महिन्यात हा कळप छत्तीसगडमध्ये परतला होता. परंतु मागील आठवड्यात हा कळप पुन्हा गडचिरोलीच्या जंगलात दाखल झाल्याने स्थानिकांसोबत वनविभाग धास्तावला आहे.

हा कळप आला कुठून ?

अभ्यासकांचे म्हणणे लक्षात घेतल्यास हा स्थलांतरित रानटी हत्तींचा कळप ओडिशातील आहे. तेथे सुरू झालेल्या खाणींमुळे त्यांचा अधिवास बाधित झाला. त्यामुळे हे २३ हत्ती स्थलांतरित होऊन काही काळ छत्तीसगडमध्ये स्थिरावले होते. त्यांनतर पाणी आणि अन्नाच्या शोधात ऑक्टोबर २०२१ दरम्यान ते गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात दाखल झाले. तेव्हापासून हा परिसर त्यांचा अधिवास बनला आहे. मधल्या काळात त्यांनी भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतदेखील उच्छाद मांडला होता. यात दोन लोकांचा बळी गेला तर शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले.

हत्ती छत्तीसगडमध्ये परत का गेले?

ऑक्टोबर २०२१मध्ये २३ हत्तींचा कळप गडचिरोलीत दाखल झाला. या सीमाभागात घनदाट जंगल असल्याने त्यांना पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे वर्षभर हा कळप गडचिरोलीसह गोंदिया व भंडारा जिल्ह्यातदेखील जाऊन आला. त्यांना पळवून लावण्यासाठी वनविभागाने विविध उपाययोजना केल्याने ते काही काळ छत्तीसगडमध्ये गेले. पाच महिने ते त्या भागात वास्तव्यास होते. त्यांच्यामुळे तेथेही शेतीचे प्रचंड नुकसान झाले. काही नागरिकांचा बळी गेला.

विश्लेषण: आणखी एक नक्षलवादी हल्ला… नक्षली समस्या संपल्याचा केवळ भ्रम?

मग आता हत्ती गडचिरोलीत परत का आले?

२०२०मध्ये हा कळप अल्प काळासाठी गडचिरोली सीमेवर येऊन गेला होता. त्यानंतर तो २०२१मध्ये परत आला. तेव्हापासून जिल्ह्यातील धानोरा, देसाईगंज, कुरखेडा, कोरची तालुक्यात हा कळप वास्तव्यास आहे. या भागात घनदाट जंगल आणि मुबलक पाणीसाठा असल्याने हत्ती बऱ्याच काळ येथे स्थिरावले. परंतु त्यांच्या वावराने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पाच महिन्यांपूर्वी ते छत्तीसगडला परत गेले. परंतु उन्हाळ्यात जंगलात लागणारे वणवे व यामुळे निर्माण होणारा अन्नाचा तुटवडा त्यासाठी हे हत्ती पुन्हा गडचिरोलीकडे वळले. सध्या ते धानोरा तालुक्यातील मुरुमगाव ते कुरखेडा तालुक्यातील पुराडा वनपरिक्षेत्रात वास्तव्यास आहेत.

वनविभाग नेमके काय करत आहे?

हत्तींच्या कळपामुळे जिल्ह्यातील शेती मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. एका वृद्धाचा बळीदेखील गेला. अनेक घरांची मोडतोड झाली. त्यामुळे या हत्तींना आवर घालणे वन विभागासमोर मोठे आव्हान आहे. हत्तीवर नजर ठेवणे, त्यांच्या हालचाली टिपणे व त्या भागात सतर्कतेचा इशारा देणे. याव्यतिरिक्त हत्तींना मानवी वस्तीपासून पळवून लावण्यासाठी पश्चिम बंगालमधून ‘हूल्ला’ पथकाला पाचारण करणे. या उपाययोजना वनविभाग करताना दिसून येतो. परंतु प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने हे प्रयत्न अपुरे पडत आहे.

विश्लेषण: बारसूनिमित्त कोकणातील प्रकल्पविरोधाची कूळकथा…

नागरिकांचे काय म्हणणे आहे?

दोन वर्षांपूर्वी हे संकट सर्वांसाठीच नवे होते. त्यामुळे ते हाताळताना वनविभाग हतबल दिसून येत होता. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे हत्तींबद्दल, त्यांच्या हालचालीविषयी वनविभागाला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे हे संकट हाताळताना आता कमी चुका झाल्यास नागरिकांचे नुकसान कमी होईल. मागील वर्षी प्रभाव क्षेत्रांतील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्याचे पंचनामे झाले परंतु अनेकांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. आता खरीपानंतर उन्हाळी पिकांवरदेखील संकट ओढवले आहे. त्यामुळे हत्तींना आवर घालण्यासाठी वनविभागाने नव्या उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी संत्रस्त नागरिकांनी केली आहे.

Live Updates