Worlds Highest Bridge Chenab Bridge जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल अखेर तयार झाला आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर अनेक प्रकल्पांसह जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब पुलाचेदेखील उद्घाटन केले आहे. या पुलाला अभियांत्रिकीचा चमत्कार मानले जात आहे. हा पूल तयार झाल्याने भारताच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पान जोडले जाणार आहे. चिनाब नदीवर या पुलाचे बांधकाम हे सर्वात मोठे आव्हान होते. हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवर पेक्षाही उंच आहे. बांधकाम सुरू असतांना चिनाब पूलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. परंतु सर्व चाचण्यांमध्ये हा पूल उत्तीर्ण ठरला आहे. हा पूल तयार होण्यासाठी दोन दशकांहून अधिकचा कालावधी लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिनाब पुलाची प्रमुख वैशिष्ट्ये

२००८ मध्ये करार करण्यात आलेला चिनाब पूल जम्मू जिल्ह्यातील बक्कल आणि कौरीतून सुरू होतो आणि कटरा ते बनिहालला जोडतो. हा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) चा एक भाग आहे; जो तब्बल ३५,००० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. याचा उद्देश हवामान बदल आणि इतर नैसर्गिक बदलादरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवणे आहे. पूल तयार होण्यासाठी तब्बल १४ हजार कोटी रूपयांचा खर्च आला आहे. हा पूल नदीपात्रापासून १,१७८ फूट उंचीवर आहे. आयफेल टॉवरपेक्षा पूल ३५ मीटर उंच आहे आणि याचे आयुष्य १२० वर्षे इतके आहे.

जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी चिनाब पूल वरदान ठरणार आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

जगातील सर्वात उंच चिनाब पुलाच्या उद्घाटनापूर्वी स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. २६० किमी प्रतितास वेगाच्या वार्‍यांना, अति जास्त तापमान, भूकंप आदींना तोंड देण्यास हा पूल सक्षम आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, चिनाब, कौरी आणि बक्कलच्या दोन्ही बाजूंनी बसवलेली पुलाची कमान महाकाय केबल क्रेनच्या मदतीने तयार करण्यात आली आहे; जी तयार करण्यास अभियंत्यांना तीन वर्षांचा कालावधी लागला.

यूएसबीआरएल प्रकल्पाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी सुरेंदर माही यांनी ‘द इकॉनॉमिक टाईम्स (ईटी) ला सांगितले की, “आम्हा सर्वांसाठी हा खूप मोठा प्रकल्प होता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला पूल आणि बोगदे असलेले २६ किमीचे रस्ते बांधावे लागले. त्यांच्या मते, पुलाचे बांधकाम आयआयटी-रुरके, आयआयटी-दिल्ली, बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, संरक्षण आणि संशोधन संस्था (डीआरडीओ), नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या देशातील प्रतिष्ठित वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संस्थांच्या सहकार्याने साध्य झाले आहे.

जम्मू आणि काश्मीरसाठी हा पूल किती महत्त्वाचा ?

जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी चिनाब पूल वरदान ठरणार आहे. २००३ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर २० वर्षांहून अधिक काळाच्या प्रतीक्षेनंतर हा पूल अखेर सुरू झाला आहे. या प्रदेशात वाहतूक सुविधेचा प्रश्न आहे. या पुलामुळे या प्रदेशात पुढे तयार होणार्‍या प्रकल्पांसाठी प्रवास आणि मालाची वाहतूक सुलभ होईल. भारतीय रेल्वेने पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, हा भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश आहे. या प्रदेशात तैनात असलेल्या सशस्त्र दलांसाठी रेल्वे मार्ग अधिक उपयुक्त ठरेल आणि पर्यटनाला चालना देण्यासही याची मदत होईल.

निवृत्त मेजर जनरल एसपी सिन्हा यांनी ‘फॉरेन पॉलिसी’ला सांगितले की, उर्वरित भारतातून काश्मीर आणि लडाख प्रदेशात भारतीय सैन्यासाठी पुलाचे महत्त्व अधिक आहे. “हिवाळ्यात लष्करासाठी काश्मीरमध्ये जाण्यासाठी रस्ते मार्गांचा प्रश्न तयार व्हायचा. एकदा रेल्वे सुरू झाल्यावर भारतीय जवानांना काश्मीर आणि लडाखमध्ये जाणे अधिक सोयीचे होईल,” असे त्यांनी सांगितले. सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार, उत्तरेकडील प्रदेशाशी सर्व हवामानात कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे, हा पूल तयार होणे काश्मीरमधील पाकिस्तान सीमापार असणार्‍या दहशतवादासाठी हानिकारक ठरेल. “खोऱ्याशी ३६५ दिवस कनेक्टिव्हिटी असणे आमच्यासाठी फायद्याचे ठरेल. शेजारील देशाकडून येणार्‍या कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी अधिक मदत होईल,” असे ते म्हणाले. ते असेही म्हणाले की, रेल्वे जम्मू आणि काश्मीरला लडाखशी जोडेल आणि उत्तरेकडील चीन सीमेवर तैनात असणार्‍या संरक्षण दलांना याचा फायदा होईल.”

जम्मूमधील आजूबाजूच्या भागांमध्ये जिथे रस्त्यांचं जाळं नाही, त्या भागांचाही विकास होईल. या प्रदेशातील ७३ गावे ज्यांना पूर्वी फक्त पायी किंवा बोटीने जाता येत होते, त्यांच्यासाठी हा सोयीस्कर मार्ग ठरेल, असे ‘इकॉनॉमिक टाइम्स’ च्या अहवालात म्हटले आहे. या पूलावरून आता वंदे भारत ट्रेन जम्मू आणि श्रीनगर दरम्यान धावणार आहे. हा प्रकल्प ‘एक भारत, श्रेष्ठ भारत या महत्वाकांक्षी योजनेचा एक भाग आहे; ज्याचा उद्देश काश्मीरला देशातील इतर राज्यांशी जोडणे आहे.

केंद्रशासित प्रदेशाला देशाच्या इतर भागाशी जोडल्याने या प्रदेशातील औद्योगिक आणि कृषी क्षेत्रांचीही भरभराटी होईल. यामुळे स्थानिक उत्पादने, विशेषत: सफरचंद, हस्तकला, लोकर आणि लाकडापासून तयार करण्यात आलेल्या वस्तु यांची देशभरात पोहोचवणे सुलभ होईल. यापूर्वी काश्मीरला भारताच्या उर्वरित भागाला जोडण्यासाठी ३०० किलोमीटरचा श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव पर्याय होता. परंतु हा रस्तादेखील कडाक्याच्या हिवाळ्यात बंद असतो आणि अपघात प्रवण क्षेत्र आहे.

न्यू काश्मीर फ्रूट असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिल कुमार मेहेंद्रू यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, “आम्हाला रस्त्यावरून जाताना खूप समस्या येत आहेत. एकदा का आपण उर्वरित भारताशी रेल्वेने जोडले गेलो की, या उद्योगाला, शेतीला मोठा फायदा होईल.” रियासी येथील सरकारी जनरल जोरावर सिंग मेमोरियल डिग्री कॉलेजचे मानसशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक राजिंदर कुमार यांनी ‘फॉरेन पॉलिसी’ला सांगितले की, हा पूल प्रदेशाच्या आर्थिक विकासात योगदान देईल आणि प्रदेशातील वाहतूक व्यवस्था सुलभ होईल. “रेल्वे प्रकल्पामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, तर अनेकांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दुकानेही उघडली आहेत.”

चिनाब पुलाचा पर्यटन उद्योगावर लक्षणीय परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकल्पाचे प्रभारी, अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करणारे स्थानिक सुनील कुमार म्हणाले की, पुलाचं काम पूर्ण झाल्यापासून हा परिसर पर्यटनाचं केंद्र झालं आहे. “जगातील सर्वात उंच रेल्वे पूल पाहण्यासाठी देशभरातून लोक या ठिकाणी येत आहेत. यामुळे रियासीच्या पर्यटन क्षेत्राला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे,” असे त्यांनी फॉरेन पॉलिसीला सांगितले.

हेही वाचा : अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष अडचणीत का?

पंतप्रधान मोदींसाठी ठरणार गेम चेंजर

चिनाब पूल पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी राजकीयदृष्टय़ा फायद्याचा ठरणार आहे. चिनाब पुलाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीरमध्ये आर्थिक विकास घडवून आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर, सरकारने या प्रदेशाला उर्वरित देशाशी जोडण्याचे आश्वासन दिले होते. हा प्रकल्प त्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. जम्मू दौऱ्यावर या पुलाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “अनुच्छेद ३७० हा जम्मू-काश्मीरच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा होता. भाजपा सरकारने ३७० रद्द केले आहे. आता जम्मू-काश्मीर सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करत आहे… कलम ३७० रद्द केल्यामुळे, भाजपाला ३७० जागा जिंकून देण्यासाठी आणि एनडीएला निवडणुकीत ४०० जागा जिंकण्यासाठी मदत करण्याचे मी आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds highest chenab bridge inauguration by pm modi rac
Show comments