: History and Significance Ganesh Festival : प्रत्येक भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते. गणेश चतुर्थीचा शुभ दिवस आता अगदी जवळ आला आहे. गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. हा भारतातील सर्वांत लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे. त्याला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. गणपती हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र आहे. हिंदू धर्मात श्रीगणेशाला आराध्यदैवत मानले जाते. गणपती म्हणजे बुद्धी-समृद्धी-सौभाग्याची देवता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, १४ विद्या व ६४ कलांचा अधिपती, असे मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेशाच्या पूजनानंतरच होते. तसेच भक्तांची सर्व विघ्ने तो दूर करतो, अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला विघ्नहर्ताही म्हणतात. गणेश चतुर्थी सहसा ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान भाद्रपद या हिंदू महिन्यात येते. देशभरात विशेषत: महाराष्ट्र, गुजरात, ओडिसा, उत्तर प्रदेश व कर्नाटकमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दिवशी गणेशाचा जन्म झाला, असे मानले जाते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा हा १० दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत मनोभावे, उत्साहाने व आनंदात साजरा होतो. गणेश चतुर्थीच्या तारखेपासून इतिहासापर्यंत सर्व काही येथे जाणून घेऊ.

केव्हा आहे गणेश चतुर्थी?

द्रिक पंचांगानुसार(हिंदू पंचागानुसार) २०२३ मध्ये गणेश चतुर्थी सोमवार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३९ वाजता सुरू होईल आणि मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री २०.४३ वाजता समाप्त होईल.

चतुर्थी तिथी सुरुवात : दुपारी १२.३९ वाजता १८ सप्टेंबर २०२३

चतुर्थी तिथी समाप्त : दुपारी १.४३ वाजता १९ सप्टेंबर २०२३

हेही वाचा – Ganesh Utsav 2023 : मुंबईतील सात लोकप्रिय व मानाचे गणपती कोणते? जाणून घ्या …

गणेश चतुर्थीची कथा


हिंदू पौराणिक कथेवर आधारित भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानले जाते. गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे. त्यामागची कथा निश्चित तुम्ही ऐकली असेल. पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एका लहानशा मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यात प्राण ओतते. या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते. त्याप्रमाणे हा मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत असतो. त्याच वेळी देवी पार्वतीचे पती महादेव देवी तिला भेटण्यासाठी तिथे येतात. त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात. गणेश आपला पुत्र आहे हे भगवान शंकर यांना माहीत नसते आणि महादेवच आपले पिता आहेत हे गणेश यांना माहीत नसते. त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो. महादेवदेखील ते मान्य करत नाही आणि हा लहान मुलगादेखील मागे हटत नाही. महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो आणि शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात. तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकराकडे धरते. त्यावेळी, भगवान शंकर त्याच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वांत पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात. त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते. अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्रीगणेश पुन्हा जिवंत होतात, अशी ही कथा आहे.

गणेश चतुर्थीचे महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार, ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वतीचा मुलगा गणेश जन्माला येतात, तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते. श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट होते, असे मानले जाते. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात

गणेश चतुर्थी साजरी कशी करतात?

उत्सवाच्या सुरुवातीला घरात सुंदर सजावट केली जाते. गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. उपासना करण्याच्या १६ पद्धती आहेत. मूर्तीला लाल चंदन लावले जाते आणि पिवळ्या व लाल फुलांनी सजवले जाते. गणरायाला जास्वंदाचे फूल आणि दूर्वा अत्यंत प्रिय आहेत, त्या अर्पण केल्या जातात. तसेच गणेश उपनिषद आणि इतर वैदिक स्तोत्रांचा उच्चार केला जातो.

त्याशिवाय नारळ, गूळ आणि २१ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. मोदक हा गणेश यांचा आवडता पदार्थ मानला जातो. उत्सवाच्या शेवटी ढोल वाजवून, भक्तीने गायन आणि नृत्यासह मूर्तींच्या मोठ्या मिरवणुका जवळच्या नदीकडे नेल्या जातात. विधीचा एक भाग म्हणून मूर्तींचे विसर्जन केले जाते. गणेश आपले आई-वडील म्हणजेच शिव आणि पार्वतीचे घर असलेल्या कैलास पर्वतावर परत जातात, असे मानले जाते.

हेही वाचा – यंदा अष्टविनायक यात्रेचा विचार करीत आहात? जाणून घ्या, या स्वयंभू गणपतींविषयी माहिती …

गणेश चतुर्थीचे महत्त्व

शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून हा उत्सव ऐतिहासिकदृष्ट्या साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली; ज्यामुळे भारताच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान समाजातील सर्व जातींच्या लोकांमध्ये एकता निर्माण झाली.

या सणाला खूप सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. कारण- भारतातील आणि त्यापलीकडे भक्तगण भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी, यशासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र येतात. असे म्हटले जाते, ”जे लोक गणेशाची पूजा करतात, ते त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि ध्येये पूर्ण करण्यास सक्षम असतात. गणरायाची मनोभावे पूजा करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते आणि जे कोणी त्याची प्रार्थना करतात, त्यांची पापांची मुक्तता होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh festival 2023 ganesh chaturthi 2023 date shubh muhurat history significance and all you need to know about ganeshotsav snk