कामाची डेडलाइन जवळ आलेली असते, प्रत्यक्ष कामापेक्षा बॉस आणि सहकाऱ्यांना सांभाळून घेण्यात जास्त एनर्जी जात असते आणि अशातच डोके ठणकायला सुरुवात होते. अशा वेळी सर्वात जवळचे काय वाटत असेल, तर ती वेदनाशामक गोळी (पेनकिलर). एक गोळी आणि पंधरा मिनिटांत कामाला सुरुवात.. हात दुखत असो किंवा पाठ, दाढ दुखत असो किंवा पायाचा घोटा.. पेनकिलरच्या जादुई मात्रेने सर्व सुरळीत होते आणि त्यासाठी पेनकिलरचे आभार मानावेत तेवढे कमीच. वैद्यकशास्त्राने सामान्यांच्या हातात दिलेल्या या संजीवनीने शहरातील धकाधकीच्या जीवनातील गाडे सुरळीत चालले आहे. पण ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खाता येत नाही, तशी पेनकिलरचीही गोडी लागता उपयोगाची नाही.
कोणत्याही औषधांच्या दुकानात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या गोळ्या या पेनकिलरच्या असतात. गल्लीतल्या केमिस्टकडेही दिवसाला दहा ते पंधरा पाकिटे हातोहात विकली जातात. एकूण औषधांच्या तुलनेत वेदनाशामक गोळ्यांच्या विक्रीचे प्रमाण सुमारे तीस टक्के आहे. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत असल्या, तरी त्या वापरताना सावध राहायला हवे. वेदनाशामक गोळ्या आजार बरा करत नाहीत. शरीरातील एखादा अवयव दुखू लागला, की तेथून मेंदूला रसायनांच्या माध्यमातून संदेश पाठवले जातात. पॅरासिटेमॉल असलेल्या गोळ्या मेंदूकडे येणारे व तेथून जाणारे वेदनेचे संदेश अडवण्याचे काम करतात आणि त्यामुळे वेदना होत असल्याचे लक्षात येत नाही. आयबुप्रोफेन असलेल्या गोळ्या वेदना होत असलेल्या ठिकाणी काम करतात. वेदना उत्पन्न करणाऱ्या रसायनांवर नियंत्रण ठेवून दाह कमी होतो.
‘‘वेदनाशामक गोळ्यांमुळे फायदा होतो, पण काही वेळा गंभीर परिस्थितीतही निर्माण होते. या गोळ्या केमिस्टकडून थेट घेता येत असतील तरी त्यांची क्षमता (स्ट्रेंथ) वेगवेगळी असते. शंभरातील एका रुग्णाला एखाद्या गोळीनेही त्रास होतो. अस्पिरीनमुळे हृदय तसेच मेंदूकडे जाणाऱ्या वाहिन्यांत ब्लॉकेज निर्माण होतात. काही वेळा जठराला ओरखडे पडून रक्तस्राव होतो. अनेकदा अत्यवस्थ रुग्णामध्ये हे नेमके कशामुळे झाले, तेदेखील डॉक्टरांच्या पटकन लक्षात येत नाही. सांधेदुखीसाठी देण्यात येणाऱ्या ‘कॉक्स टू इन्हिबीटर’मुळे मोठ्या आतडय़ामध्ये अल्सर झालेले रुग्ण उपचारांसाठी येतात. काही वेदनाशामक गोळ्यांमुळे मूत्रिपडावर प्रभाव पडतो,’’ असे ज्येष्ठ पोटविकारतज्ज्ञ डॉ. रेखा भातखंडे यांनी सांगितले. वेदनाशामक गोळी घेण्यापूर्वी वेदना नेमकी का होत आहे आणि ते कारण कमी करता येईल का, याचाही विचार व्हायला हवा. वेदनाशामक गोळी घेण्याचे मुख्य कारण म्हणजे डोकेदुखी. डोके दुखत असेल तर त्यामागे अपुरी झोप, सर्दी, ताण, उपास अशी कारणे असू शकतात. गोळी इन्स्टंट रिलीफ देत असली, तरी मूळ कारणावर उपाय केला तर पुन्हा पुन्हा गोळ्यांकडे वळावे लागणार नाही. वेदनाशामक गोळी हा केवळ तात्पुरता उपाय आहे. डॉक्टरांकडे जाण्याच्या वेळेपुरते आराम पडावा यासाठी त्याचा उपयोग करावा.
सध्या इंटरनेटद्वारे वेदनाशामक गोळ्यांच्या खऱ्या-खोटय़ा दुष्परिणामांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचली असेल. पण दुखणं आले की ही वाचलेली माहिती बाजूला पडते आणि पाकिटातून पेनकिलर काढून तोंडात टाकली जाते. ती तोंडात टाकण्याआधी पुन्हा एकदा विचार करावा, एवढय़ासाठी हा लेखप्रपंच..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा