दुबईच्या मैदानावर पंजाब विरुद्ध मुंबई या सामन्यात नव्या इतिहासाची नोंद झाली. निर्धारीत वेळेत सामना बरोबरीत सुटल्यामुळे, निकाल सुपरओव्हरवर गेला. पहिल्या सुपरओव्हरमध्ये मुंबईला विजयासाठी अवघ्या ६ धावांचं आव्हान होतं. परंतू ही सुपरओव्हरही अनिर्णित राहिल्यामुळे दुसरी सुपरओव्हर खेळवण्यात आली. ज्यामध्ये पंजाबने विजयासाठी आवश्यक असलेल्या १२ धावांचं आव्हान पूर्ण करत अखेरीस विजयावर शिक्कामोर्तब केलं. पंजाबकडून कर्णधार लोकेश राहुलने धडाकेबाज खेळी करत अर्धशतक झळकावलं.

मोक्याच्या क्षणी पंजाबचे फलंदाज माघारी परतत असताना राहुलने एक बाजू लावून धरत मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ५१ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह राहुलने ७७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने आयपीएलच्या तेराव्या हंगामात ५०० धावांचा टप्पा ओलांडून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपलं अव्वल स्थान आणखी बळकट केलं आहे. आयपीएलच्या सलग ३ हंगामांमध्ये ५०० पेक्षा जास्त धावा काढणारा राहुल पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

जसप्रीत बुमराहने राहुलला माघारी धाडल्यानंतर दिपक हुडा आणि ख्रिस जॉर्डन यांच्याकडे विजयाची चांगली संधी होती. परंतू अखेरची धाव घेताना जॉर्डन माघारी परतला आणि दुबईच्या मैदानावर सुपरओव्हरचं नाट्य रंगलं. लोकेश राहुलने सुपरओव्हरमध्ये अष्टपैलू खेळ करत संघाच्या विजायत मोलाची भूमिका बजावली. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.