रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्या हंगामात आपली धडाकेबाज कामगिरी सुरु ठेवत विजेतेपदावर मोहर उमटवली आहे. पहिला अंतिम सामना खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून मात करत मुंबई इंडियन्सने आपलं पाचवं विजेतेपद पटकावलं आहे. कर्णधार रोहित शर्माने अंतिम सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.

कर्णधार या नात्याने आयपीएलचं विजेतेपद पटकावण्याची रोहितची ही पाचवी वेळ ठरली आहे. तर रोहितचं हे एकंदरीत सहावं विजेतेपद ठरलंय.

५१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह रोहितने ६८ धावांची खेळी केली. साखळी फेरीत रोहित दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नव्हता. यामुळे त्याला भारतीय संघात आपलं स्थानही गमवावं लागलं. परंतू यावरही यशस्वीरित्या मात करत रोहितने अर्धशतकी खेळी करत आपला फॉर्म पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.