कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी धावपळ करीत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यांच्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती (फोटो कॉपी) आता प्रमाणित (अटेस्टेड) करण्याची गरज राहिलेली नाही. स्वत:ची सही करून विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या प्रती दिल्यास ती ग्राह्य़ धरण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे राजपत्रित अधिकारी, आमदार, खासदार, विशेष कार्यकारी अधिकारी यांच्याकडे रांगा लावून कागदपत्रे प्रमाणित करून घेण्याची त्यांना गरज भासणार नाही.
कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी बरीच कागदपत्रे प्रमाणित करून करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बराच आटापिटा करावा लागतो. महाविद्यालये प्रवेश देताना मूळ कागदपत्रे घेतात. त्यामुळे छायांकित प्रती विद्यार्थ्यांनी सही करून दिल्या, तरी त्याची पडताळणी करणे महाविद्यालयांना शक्य असते. विद्यार्थ्यांंची धावपळ टळावी, यासाठी हा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जारी होईल, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री फौजिया खान यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली. हा निर्णय शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण या सर्वासाठी लागू असून हे विभाग आणि त्यांच्या मंत्र्यांमार्फत तो महाविद्यालयांकडे पाठविला जाईल, असे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No need to authenticate xerox document for college admission