लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत ४० कोटी रुपये रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. आधीच्या महाविकास आघाडीच्या काळात निधी कूर्मगतीने मिळत असताना आता मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने रखडलेली कामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

नगर विकास विभागाच्या या निर्णयात म्हटले आहे की, महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास करण्यासाठी प्रथम टप्प्यात ७९.९६ कोटी रकमेच्या कामांना २० फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली होती. त्याकरिता २०१९-२०२० व २०२३ या वर्षांमध्ये १०. ७० कोटी निधी मंजूर केला आहे.

या आराखड्याच्या प्रथम टप्प्यात मंजूर निधी पैकी चालू आर्थिक वर्षात ६९.२६ कोटी इतका अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला होता. त्यानुसार ४० कोटी इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे. निधीपेक्षा जास्तीचे दायित्व घेण्यात येऊ नये तसेच कुठलाही शासन नियम, अधिकाराचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेशामध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा-कोल्हापूर : बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहार प्रकरणांच्या चौकशीसाठी मंगळवारी मोर्चा

पावनखिंड मार्गावर विश्रामगृह

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत पन्हाळा पावनखिंड मार्गावर विश्रामगृह बांधण्यासाठी १४ कोटी ९५ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाचे गडकोट, शिवप्रेमींनी स्वागत केले आहे.

पराक्रमाचा इतिहास

इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते.मुसळधार पावसात सुद्धा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिद्धी गाफील राहिला. शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिद्दी जौहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला. शिवा काशीदचे खरे रूप कळल्यावर सिद्धीने त्यांस ठार केले, तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते.

आणखी वाचा-“लोकसभेसाठी दोन, तर विधानसभेसाठी १५ जागा मिळाव्यात”, जोगेंद्र कवाडे यांची महायुतीकडे मागणी

छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून,विशाळगडाकडे कूच केल्याचे समजल्या- नंतर,सिद्दीने,सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले. त्यांचा पाठलाग चालू झाला. मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले,अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले. घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली,शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला. महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऐकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला. या युद्धात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले. बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 crores for mahalakshmi temple and 15 crores for pawankhind rest house approved mrj