कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, विशेष सभा आयोजित करून याबाबत ठराव करण्यात यावा, या आशयाचे निवेदन माणगाव (ता.हातकगणंगले) येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी माणगाव ग्रामपंचायतीकडे दिले. निवेदन उपसरपंच विद्या जोग यांनी स्विकारले. याप्रसंगी माजी उपसरपंच अख्तर भालदार, सदस्य नितीन कांबळे, मनोज आदाण्णा उपस्थित होते.

नागपूर ते गोवा या नियोजित शक्तिपीठ महामार्ग विरोधात माणगाव ता. हातकणगंले येथील शेतकरी आक्रमक  झाले आहेत. महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक येथील शारदा दूध संस्थेत झाली. याप्रसंगी शिवगोंडा पाटील यांनी, माणगाव येथील  ९६ एकर जमिन बाधित होणार असून  यातील ४ एकर जमिन खराब आहे. उर्वरित ९३ एकर जमिन ही बागायत  व दर्जेदार जमिन आहे. ही जमिन शासन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असून यामुळे गावातील ४५० शेतकरी भूमिहीन होणार असल्याचे सांगितले. राजू मुगुळखोड यांनी शासनाने महामार्गाचा पुर्नविचार करावा. महामार्गालगत वीस, पंचवीस फुटाचा भराव पडणार असल्याने गावातील जमिन शिल्लक राहणार नसून  शेतकरी भूमिहीन होण्याचा मार्गावर असल्याचे सांगितले.

आणखी वाचा-खासदार,आमदारांनी इचलकरंजीत अधिकार्‍यांच्या बदल्यांचा खेळखंडोबा लावला आहे; सागर चाळके, प्रकाश मोरबाळे यांचा आरोप

निवेदनामध्ये, माणगाव येथे शक्तिपीठ महामार्ग झाल्यास गावास पूराची भीती असून पूर वेशीलगत येण्याची शक्यता आहे. यामुळे हजारो एकर जमिन नापीक होणार आहे. ऊसाला दर मिळाल्यापासून शेतकऱ्यांची आर्थिक संपन्नता वाढली असल्याने यातून शेतकऱ्यांनी स्वखर्चाने व कर्ज घेवून सिंचनाची व्यवस्था केली आहेत. यामुळे गाव पूर्णपणे बागायत क्षेत्र झाले आहे. प्रस्तावित महामार्गामुळे यावर घाला येणार असल्याने शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचे निवेदन मध्ये नमूद आहे.

निवेदन प्रसंगी राजगोंडा बेले, युवराज शेटे, निळकंठ मुगुळखोड, राजू मुगुळखोड, सागर महाजन, अभय व्हनवाडे, सुभाष पाटील, महावीर पासगोंडा, शामराव कांबळे, अभिषेक मगदूम, प्रविण पाटील, महावीर देमाण्णा, सुनिल बन्ने, सह मोठ्या प्रमाणात  शेतकरी उपस्थित होते.

आणखी वाचा-ओमप्रकाश दिवटे हेच इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त; पल्लवी पाटील यांच्या निवडीला स्थगिती

मोर्चास प्रचंड उपस्थिती लावणार

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने १८ जून रोजी आयोजित केलेल्या शेतकरी निर्धार मेळावा व मोर्चास माणगाव  येथून मोठ्या संख्येने  शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचा निर्धार केला. बैठकीस मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.