कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी जाहीर झालेल्या निकालाने कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या या जिल्ह्यात एकूण एक दहा गडांवर महायुतीचा भगवा झेंडा रोवला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व वाढीस लागण्याची चिन्हे दिसू लागली असून, हे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांसमोर आव्हान असणार आहे. याचे परिणाम महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांसह सहकार क्षेत्रावरही संभवत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दहा मतदारसंघांत निवडणूक अटीतटीची होणार हे आधीपासूनच दिसू लागले होते. ती शेवटच्या टप्प्यात आली तेव्हा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील, तसेच भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सर्व दहा जागा जिंकू, असा दावा केला होता. त्यातील महाडिक यांचा दावा खरा ठरल्याचे आजच्या निकालाने दिसून आले आहे. काँग्रेसकडे विधान परिषदेच्या दोन आमदारांसह एकूण सहा आमदार असताना या पक्षाला एकही जागा राखता आली नाही. काँग्रेसचे सर्व चारही उमेदवार पराभूत झाले. यात सतेज पाटील यांचा पुतण्या ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे आणि गणपतराव पाटील व राहुल पाटील यांचा समावेश आहे. सन २०१४नंतर पुन्हा एकदा काँग्रेस पराभूत झाल्याने सतेज पाटील तसेच महाविकास आघाडीसमोर उभारी घेण्याचे डोंगराएवढे आव्हान निर्माण झाले आहे. याचा फायदा उठवत विरोधक सतेज पाटील यांचा विधान परिषदेचा मार्ग खडतर करण्याचा प्रयत्न करतील, असे दिसत आहे.

हेही वाचा >>>Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरचा कल महायुती कडे

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीही अशीच वाताहत झाली आहे. शिवसेनेचे एकेकाळी या जिल्ह्यात सहा आमदार होते. २०१४ नंतर आता दहा वर्षात पक्षाकडे एकही आमदार आता राहिलेला नाही. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने ही पहिली निवडणूक लढवताना दोन मतदारसंघांत लक्ष केंद्रित केले होते. मात्र, पावसात भिजूनही त्यांना येथे अपयशाला सामोरे जावे लागले.

महायुतीचे प्राबल्य

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीने कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे एकतर्फी प्राबल्य असल्याचे दाखवून दिले आहे. एखाद्या पक्षाने जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा हा विक्रम पहिल्यांदाच घडला आहे. राजेश क्षीरसागर, अमल महाडिक यांच्याकडे पुन्हा आमदारकी आली आहे. हसन मुश्रीफ, विनय कोरे हे बड्या खात्याचे मंत्री होणार असे दिसू लागले आहे. याशिवाय राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, प्रकाश आबिटकर, शिवाजी पाटील, अशोक माने अशी दमदार आमदारांची कुमक महायुतीकडे असणार आहे. ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व महायुतीकडे असल्याने त्यांना आगामी निवडणुका जिंकणे आता अगदीच डाव्या हाताचा खेळ वाटू लागला आहे. अशा अत्यंत आव्हानाच्या स्पर्धेत महाविकास आघाडीचा निभाव कसा लागणार हेच आता पाहावे लागणार आहे. दुसरीकडे सर्वशक्तिशाली बनलेल्या महायुतीतील नेत्यांमध्ये समन्वय, मंत्रिपदाची स्पर्धा, आपल्या पक्षाचे महत्त्व वाढवण्याची चुरस यामुळे समन्वय कसा राहणार हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >>>कोल्हापूर जिल्ह्यात गायीच्या दूध खरेदी दरात ३ रुपयांनी कपात

विकासकामांचे आव्हान

राज्यात २०१४ पासून अडीच वर्षांचा कालावधीवगळता युती-महायुतीचे शासन राहिले आहे. आता पुन्हा एकदा निर्विवादपणे महायुतीकडे सत्ता सोपवलेली आहे. साहजिकच जनमानसाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. कोल्हापूर महापालिका हद्दवाढ, उच्च न्यायालयाचे खंडपीठ, पंचगंगा नदी प्रदूषण, आयटी पार्क, पश्चिम घाट, उद्योगांचा विस्तार, पर्यटनवाढीच्या संधी, महालक्ष्मी – जोतिबा विकास आराखडा असे प्रश्न सुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत. महायुतीला तिसऱ्यांदा संधी दिल्यावर हे प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा सामान्य जनता करत आहे. नव्याने येणारे पालकमंत्री, मंत्री, इतकेच नव्हे, तर खासदार, आमदार यांनाही या प्रश्नांची निर्गत करणे महत्त्वाचे ठरणार आहे. मोठ्या अपेक्षांनी जनतेने सत्ता सोपवली असल्याने त्यांना गुणात्मक कामातून उत्तर देण्याची जबाबदारी नव्या राज्यकर्त्यांवर आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly elections 2024 kolhapur district mahayuti dominance congress and ncp defeat amy