कोल्हापूर : गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग हा शेतकरी शेती पर्यावरण व समाज उध्वस्त करणार आहे. तो मार्ग केवळ भांडवलदारांच्या विकृत डोक्यातील संकल्पना आहे. महामार्गाचा निर्णय हाणून पाडण्यासाठी, सर्व छोट्या-मोठ्या संघटना गटातटांचे एकत्रीकरण करून पुढील दिशा ठरवत जन आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी ४ एप्रिल रोजी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा घेण्याचा निर्णय करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा निर्णय शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती कोल्हापूर यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय बाबा घाटगे होते. या मेळाव्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, विधान परिषद गटनेते आ. सतेज पाटील, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी, रयत शिक्षण संस्थेच्या सरोज पाटील, माजी आमदार संपत बापू पाटील, माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यासह विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. सेझ विरोधी जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांच्याशी चर्चा सुरू आहे.

हेही वाचा…ईडीच्या नावाने बोंब मारून कोल्हापुरात केजरीवालांच्या अटकेचा निषेध; आपची प्रतीकात्मक होळी

यावेळी बोलताना माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, देशात व राज्यात शेतकरी संकटात असताना सरकार त्यांना तारण्या ऐवजी कंत्राटदारांच्या हिताचा शक्तिपीठ महामार्ग लादून देशोधडीला लावत आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी गावागावात संघर्षाची ज्योत पेटवली पाहिजे. समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले,” शासनाची विकासाची कल्पनाच आम्हाला मान्य नाही. शासन एकाच ठिकाणी जाण्यासाठी अकारण तीन-तीन रस्ते का करत आहे हे न कळायला शेतकरी एवढा भोळा नाही. यामागे कंत्राटदार, अधिकारी व मंत्री यांचे साटेलोटे आहे हे स्पष्ट झाले आहे. यासाठी गट तट संघटना हट्ट सोडून सर्वांनी एकत्र लढण्याची गरज आहे.

कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांना कमी लेखू नये. शेतकरी विकासासाठी नेहमीच त्याग करत आला आहे. पण कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी शेतकरी आपली जमीन देणार नाही.
प्रकाश पाटील म्हणाले, कोल्हापुरातील कानाकोपऱ्यात ६० गावांमध्ये जाऊन जनजागृती झाली आहे. शेतकऱ्यांनी आता आपली इंचही जमीन देणार नाही अशी खूणगाठ बांधली आहे.

हेही वाचा…शक्तिपीठ महामार्गाविषयी कोल्हापुरात मंगळवारी जनसुनावणी; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर दखल

यावेळी प्रकाश पाटील, विक्रांत पाटील,के. डी. पाटील,दिगंबर कांबळे, नामदेव पाटील,अनिल चव्हाण, शिवाजी कांबळे,नितीन मगदूम, दिनकर सूर्यवंशी, अमित कांबळे, वाय. एन. पाटील यांची भाषणे झाली. यावेळी मल्हारी पाटील,आप्पा पाटील, हरीश कांबळे, प्रदीप पाटील, शरद मगदूम, पुंडलिक शिंदे, कृष्णा गुरव, सुधाकर पाटील, सुरेश शिंदे, तुकाराम नांदेकर, अजितकुमार पाटील, बाळू पाटील,जे. एन. पाटील शिवाजी डूम यासह भुदरगड, कागल, हातकणंगले, शिरोळ, करवीर, आजरा तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers planned to oppose goa nagpur shaktipeeth expressway on 4 april 2024 arrange a melava in kolhapur psg