कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या गड-दुर्गांची स्थिती आज दयनीय झाली आहे. गड-दुर्गांची संख्या, अतिक्रमणांची व्याप्ती, संवर्धनाची आवश्यकता हे सर्व पहाता गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण आणि अतिक्रमणे रोखण्यासाठी स्वतंत्र ‘गड-दुर्ग महामंडळा’ची राज्य सरकारने स्थापना करावी, या मागण्यांसाठी मुंबईत ३ मार्च रोजी ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्यावतीने बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी किशोर घाटगे,किरण दुसे, शिवानंद स्वामी, प्रमोद सावंत, मधुकर नाझरेे उपस्थित होते.
मोर्च्यामध्ये राज्यभरातून विविध गड-दुर्गप्रेमी संघटना आणि छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे २५ हून अधिक वंशज, यांसह विविध संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातूनही विविध गड-दुर्गप्रेमी संघटना जाणार आहेत.
३५ दुर्गांवरील अतिक्रमणे हटवा
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण शिंदे-फडणवीस सरकारने हटवून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात फाजिल लाड चालणार नाहीत, हे दाखवून दिले आहे. त्याच पद्धतीने राज्यातील ३५ महत्त्वाच्या गड-दुर्गांवरील अशी अतिक्रमणे हटवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.