कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेचा सुळकुळ पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासन उदासिन आहे. त्यामुळे सुळकुड योजना कार्यान्वित करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इचलकरंजीत आल्यावर त्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा निर्णय आज इचलकरंजीत झालेल्या सुळकुड पाणी योजना समन्वय समितीच्या मेळाव्यात घेण्यात आला. आमदार प्रकाश आवाडे आणि खासदार धैर्यशील माने यांच्यावरीलआरोप-प्रत्यारोपाने हा मेळावा गाजला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शासनाने इचलकरंजीची पाण्याची गरज ओळखून सुळकूड पाणी योजना मंजुर केली. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने याप्रश्‍नी समन्वय समिती स्थापन करण्यात आली. योजना कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ११ सप्टेंबर २०२३ ला बैठक घेण्याचे जाहीर केले होते . मात्र ही बैठक अद्याप झाली नाही. शहराचा पाणी प्रश्‍न गंभीर बनल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडत आहेत. त्यामुळे आज समन्वय समितीने पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मेळावा आयोजित केला होता.

आणखी वाचा-इचलकरंजीतील सायझिंग उद्योग बेमुदत बंद, अर्थकारण ढेपाळले; कोट्यवधीची उलाढाल ठप्प

या मेळाव्यात शशांक बावचकर, मदन कारंडे, प्रकाश मोरबाळे, पुंडलिक जाधव, राहुल खंजिरे, नितीन जांभळे, सयाजी चव्हाण, भरमा कांबळे, विकास चौगुले यांच्यासह प्रमुखांनी शहराच्या पाणी प्रश्‍नाची गंभीरता व्यक्त केली. गेल्या ६ महिन्यात आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने यांनी सुळकुड योजना कार्यान्वित करण्यासाठी कोणतचे प्रयत्न केले नसल्याचा आरोप केला. आमदार आवाडे समन्वय समितीवर टोळीचा आरोप करत असतील तर जनता समितीबरोबर आहे, हेही त्यांनी लक्षात ठेवावे. गेली अनेक वर्षे पाणी प्रश्‍न सुटलेला नाही हे सत्ताधार्‍यांचे अपयशच आहे. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी आता संघटीतपणे लढा उभा करुया आणि प्रत्यक्षात पाणी मिळेपर्यंत हा लढा सुरु ठेवुन एक आदर्श निर्माण करुया, असे आवाहन केले.

आणखी वाचा-माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम खून प्रकरणात तिघांचा सहभाग; दोघांना अटक

समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे यांनी शहराचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी ६ महिन्यांपूर्वी समितीची स्थापना करून विविध आंदोलने, उपक्रम राबवले. खासदार माने आणि आमदार आवाडे यांनाही हा प्रश्‍न सोडवण्याची संधी दिली मात्र प्रश्‍न सुटत नसल्याने आता सत्ताधारीही या समितीच्या मेळाव्यास अनुपस्थित आहेत. त्यामुळे आता शहराला मंजुर सुळकुड योजना कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी नियोजित कार्यक्रमासाठी इचलकरंजी परिसरात आल्यावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा निर्णय जाहीर केला. याचप्रमाणे भागाभागात बैठका घेऊन जनजागृती करुन प्रत्यक्षात शहराला पाणी मिळेपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धारही व्यक्त केला.

या मेळाव्यास डॉ. अरुण पाटील, शशिकांत देसाई, विजय जगताप, प्रसाद कुलकर्णी, सदा मलाबादे, सुनील बारवाडे, अभिजित पटवा, राजू आलासे, दौलत पाटील यांच्यासह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ichalkaranjis sulkud water issue will show black flags to chief minister eknath shinde mrj
Show comments