कोल्हापूर : आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना मंचावर आणून दोघांमध्ये समेट घडल्याचे नेपथ्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप मेळाव्यात रचण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात तीनवेळा लढत झालेल्या या दोन नेत्यांमध्ये इतक्यात मनोमिलन होणार का हा खरा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी कोणाला हा कळीचा मुद्दा असणार आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन लढती या प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यामध्ये झाल्या आहेत. यावेळची चौथी लढतही दोघांमध्येच होणार असे चित्र दोन दिवसांपूर्वी असताना अचानक भाजपची सूत्रे हलली.

केंद्रीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पाच वर्ष प्रतीक्षा यादीवर असलेले आवाडे यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे प्रकाश आवाडे व राहुल आवाडे या पिता पुत्रांना घेऊन भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर हे मंचावर आले. यातून श्रेष्ठींकडून आवाडे – हाळवणकर यांच्यात मतभेद नसल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न झाला.

हेही वाचा : कोल्हापूर: मुलीला त्रास देणाऱ्या जावयाचा सासू, सासऱ्याने काटा काढला; दोन्ही आरोपी जेरबंद

राजकारणात समोर दिसणारे आणि पडद्यामागील राजकारण यात मोठे अंतर असल्याचे सांगितले जाते. आवाडे – हाळवणकर यांच्यातील गेल्या २५ वर्षांतील राजकीय संघर्ष पाहता या उभयतांमध्ये रातोरात मनोमिलन होईल, अशी शक्यता अंधुक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

आवाडे यांच्या भाजप प्रवेशाचे सुरेश हाळवणकर यांनी वरवर का असेना पण स्वागत केले आहे. पण विधानसभा निवडणुकीची उमेदवारीचा निर्णय हा उभयतामधील वादाचा मुद्दा असणार आहे. प्रकाश आवाडे यांनी राहुल आवाडे यांना भाजपची उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला आहे. तर, उमेदवारीचा निर्णय भाजपच्या संसदीय समितीकडे असतो, असे नमूद करून सुरेश हाळवणकर यांनी मला उद्या मिळाली तर आवाडे यांची भूमिका काय असेल, असा प्रतिप्रश्न केला आहे. ही विधाने पाहता दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू राहण्याची शक्यता दिसत आहे.

हेही वाचा : कोल्हापूर : राधानगरी जंगलात निळ्याशार कारवीचा बहर, अवघे डोंगर निळ्या-जांभळ्या रंगात बुडाले

श्रेष्ठींची भूमिका निर्णायक

प्रारंभीच पडणारी पावले पाहता भाजप श्रेष्ठींनी वेळीच गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नेतेमंडळी गांभीर्याने याबाबत पाऊल टाकतात यावरही बरेच अवलंबून आहे. अन्यथा पूर्वी विरोध वेगवेगळ्या पक्षातून आवाडे – हाळवणकर यांचात उघड संघर्ष तापला होता तो आता एकाच पक्षात राहून धुमसत राहील, हे उघड आहे.