कोल्हापूर : तब्बल तीन आठवड्यांहून अधिक काळ उसाचे गाळप थांबले असल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांमध्ये कमालीची अस्वस्थता असताना शेतकरी संघटनांनी दराचा प्रश्न मिटल्याशिवाय उसाला कोयता लागू देणार नाही असा निर्धार केला असल्याने वाद तापला आहे. अशातच आता हे प्रकरण राजकीय वादावर पोहोचले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उसाचे पैसे मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम उधळणार असल्याची घोषणा शनिवारी केली. तर शेट्टी मांडत असले अर्थकारण चुकीचे कसे आहे हे सांगण्यासाठी थेट त्यांच्या सभेत जाण्याचा इरादा आमदार प्रकाश आइडें यांनी व्यक्त केला असताना कुरुंदवाडचे भाजपचे माजी नगराध्यक्ष जयराम डांगे यांनी स्वाभिमानीवर टीकेची तोफ डागली आहे.
कोल्हापुरात घटस्थापनेच्या पहिल्या माळेला कारखान्यांचे बॉयलर अग्नी प्रदीपपन झाले. दसऱ्याच्या मुहूर्तावर गाळपाला सुरुवात करण्याचे ठरवले. मात्र ऊस दराच्या आंदोलनामुळे गाळप तीन आठवड्यांहून अधिक काळ थांबले आहे. हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांमध्ये आंदोलनाची तीव्रता अधिक असून स्वाभिमानीचे राजू शेट्टी, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे कार्यकर्ते ऊस वाहतूक रोखत आहेत.
हेही वाचा : अखेर कोल्हापूरकरांचे स्वप्न पूर्ण; काळम्मावाडी नळपाणी योजनेचे पाणी शहरात पोहोचले
मंत्र्यांविरोधात आंदोलन
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही काल शिरोळमध्ये बोलताना साखर कारखान्याचे अर्थकारण समजून घेऊन राजू शेट्टी यांनी सहकार्य करावे. समजावून सांगूनही ते ऐकत नसतील तर काय करायचे? अशी खंत व्यक्त केली. त्यानंतर मंत्री मुश्रीफ कोल्हापूरला परतत असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध दर्शवला.
शासनाला लक्ष्य
दरम्यान, साखर कारखानदार आणि शेतकरी नेते यांच्यातील संवाद संपला असून संघर्ष अटळ बनला आहे. अशातच आज राजू शेट्टी यांनी उसाचे पैसे मिळत नसतील तर १७ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापुरात येऊ दिले जाणार नाही. विमानतळावर घेराव घालणार, त्यांचा कार्यक्रम उधळून लावणार, असा इशारा दिला आहे. टाकळीवाडीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ऊस तोडी बंद केल्या आहेत, असा प्रतिदावाही त्यांनी केला आहे. दिवाळीपर्यंत संयमाने आंदोलन केले. यापुढे सरकार व कारखानदारांना सळो की पळो करून सोडू, असे म्हणत संघर्ष करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आंदोलनाची वाढती तीव्रता पाहता ऊस गाळप नेमके कधी सुरू होणार, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
शेट्टींविरोधात मोर्चेबांधणी
आक्रोश पदयात्रा झाल्यानंतर शेट्टी यांनी जयसिंगपूर येथेच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या सूचनेनुसार काल शुक्रवारी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखाना अध्यक्षांना दिवाळी सणात खर्डा भाकरी देऊन ऊसदराची समस्या मांडली. याचवेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना भाजपला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे यांनी राजू शेट्टी यांचे आंदोलन म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग आहे. ते मांडत असलेले अर्थकारण एकांगी आहे. साखर कारखानदारांचे अर्थकारण समजून सांगण्यासाठी थेट त्यांच्या सभेच्या ठिकाणी जाण्याचा इरादा व्यक्त करीत एका परीने त्यांनी शेट्टी यांना आव्हान दिले आहे. याच वेळी कुरुंदवाडचे भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी ‘ऊस माझा; तो कोठे घालायचा, हा माझा अधिकार आहे. त्यामध्ये कोणी अडथळा आणू नये’, असे म्हणत राजू शेट्टी यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. तर शिरोळ तालुक्यातील टाकळवाडी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत साखर कारखान्यांना ऊस तोडी देणार असल्याचे घोषित करीत शेट्टी यांच्या विरोधात पवित्रा घेतला आहे.