कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मतदारसंघ आपल्याकडे मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात गेले दोन वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आले आहेत. पण आता या मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दावा केला आहे. आज झालेल्या एका बैठकीत हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळाला पाहिजे, येथे शिवसेनेची मशाल प्रज्वलित झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी रोजी शासकिय विश्रामगृह येथ पार पडली. अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमूख संजय पवार होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होती. परंतु छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेसची उमेदवारी देण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानूसार सर्व शिवसैनिकांनी जीवाचे रान करून छत्रपतींना विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला.उत्तर विधानसभा पोट निवडणूकीत उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आमदार जयश्री जाधव यांना विजय करण्यातसुध्दा शिवसैनिक आघाडीवर होते. दोन्ही निवडणूकीमध्ये शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी आघाडी धर्म प्रामाणीकपणे पाळला. उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पाच वेळा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. तेव्हा भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये उत्तरसह कोल्हापूर जिल्हयातील पाच विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळाले पाहिजेत अशा भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. पुढील निवडणूकांमध्ये पैशापेक्षा निष्ठेलाच मतदार महत्व देतील हे बाकी निश्चित.

हेही वाचा : कोल्हापूर: बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने साजरा

‘‘चला गद्दारांना गाडूया शिवरायांचा भगवा विधानसभेवर फडकवूया’’ अशी गर्जना सर्वांनी केली. उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख रघुनाथ खडके यांनी लढाई जिंकण्यासाठी सैन्याची गरज असते ती तयारी पूर्ण आहे का? याची माहिती घेतली. सर्व ठिकाणी बी.एल.ए, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुुख, उपशहरप्रमुख आहेत का? जिथे नसतील तिथे निवड करून चार दिवसांमध्ये यादी पूर्ण करण्याची सक्त ताकीद दिली. आम्ही उध्दव ठाकरेंचे दूत म्हणून आलो आहोत जो अहवाल द्यायचा आहे त्याची सविस्तर माहिती घेऊनच जे सत्य आहे ते पोहचवण्याचे काम करणार आहे, असे स्पष्ट केले. भविष्यात उत्तर विधानसभा मतदारसंघ व अन्य मतदारसंघामध्ये पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करावा. विरोधकांना चितपट करण्यासाठी सज्ज रहा अशा सुचना केल्या.

हेही वाचा : शाश्वत विकास परिषदेतून कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग, पर्यटन क्षेत्राला गती मिळेल – राजेश क्षीरसागर

या बैठकीला सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, रविकीरण इंगवले, सुनिल मोदी, हर्शल सुर्वे, विशाल देवकूळे, दत्ताजी टिपूगडे, कमलाकर जगदाळे, शशिकांत बिडकर, धनाजी दळवी, सुशील भांदिगरे, अनिल पाटील, सुरेश कदम, राहूल माळी, राजेंद्र पाटील, युवराज खंडागळे, सागर साळोखे, राजू जाधव, रविंद्र साळोखे, विराज ओतारी, सुहास डोंगरे, सागर गायकवाड, संतोश रेडेकर व अन्य प्रमुख पदाधिकारी मोठयासंख्येने उपस्थित होते.