लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : हुरहूर लागून राहिलेल्या शासकीय नोकरीची प्रतीक्षा संपली. शिक्षक नियुक्तीचे पत्र हाती आले आणि डोळ्यांच्या कडा ओलावल्या. याच क्षणी मोबाईलवर वडिलांचे निधन झाल्याचा संदेश आला. या घटनेने क्षेत्रात शिक्षकी क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या जुन्नर मधील तरुणाला गुरुवारी येथे जीवनातील वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. सुखदुःखाचा अनोखा अनुभव त्यांनी आला.

माणसाचे विधीलिखित कसे असते कोणीच जाणू शकत नाही. सुखदुःखाच्या फेऱ्यामध्ये तो गुरफटलेला असतो. याच विलक्षण अनुभव आज हरिभाऊ दिगंबर विरणक या तरुणास आल. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. आज भावी शिक्षकांसाठी समुपदेशन द्वारे पदस्थापनेची प्रक्रिया सुरू होती.

आणखी वाचा-कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचा व्यवसाय ५ हजार कोटीवर नेण्याचे उद्दिष्ट – स्वप्निल आवाडे

यावेळी हरिभाऊ यांना शिक्षकाच्या नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाले. या आनंदायी प्रसंगाने ते भारावले. गेली अनेक वर्षे ज्याची प्रतीक्षा सुरू होती ते कार्य सफल झाल्याने डोळ्याच्या कढा नकळत ओलावल्या. चेहरा आनंदाने फुलला. पण तो आनंद क्षणकाळ टिकला. कारण दुसऱ्या क्षणी त्यांच्या मोबाईलवर वडिलांचे निधन झाल्याचे संदेश आला. हा आनंद पाहण्यासाठी वडील हवे होते याचे दुःख त्यांच्या अश्रूतून ओघळत राहिले.

ही माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस. यांना समजली. ते तात्काळ सभागृहाबाहेर आले. हरिभाऊंनी धीर दिला. त्यांच्या खांद्यावर मन टाकून हरिभाऊंनी अश्रुना वाट मोकळी करून दिली. कार्तिकेएन एस. यांनी स्वतःच्या गाडीपर्यंत हरिभाऊ यांना आणून जुन्नरला पाठवण्याची व्यवस्था करीत अधिकाऱ्यातील संवेदनशीलता, माणुसकीचे दर्शन घडविले.