राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते हसन मियालाल मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कागल तालुका महत्वाची भूमिका बजावतो. कागल विधानसभा मतदारसंघ हा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. हा मतदारसंघ हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

हसन मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडानंतर मुश्रीफ यांनी शरद पवार यांची साथ सोडली. सध्या मुश्रीफ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. एकेकाळी मुश्रीफ हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात.

हेही वाचा : Haryana and Jammu Kashmir Result 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचा उद्या निकाल; निकालाची प्रत्येक अपडेट कुठे पाहाल?

कागलमधून सलग पाच वेळा विजयी

कागल विधानसभा मतदारसंघ हा हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सलग पाचव्यांदा हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेवर निवडून गेले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कागलमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. समरजीत घाटगे यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, युतीत कागलची जागा शिवसेनेला सुटल्याने समरजीत घाटगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. तर शिवसेनेकडून संजय घाटगे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

समरजित घाटगे यांनी निवडणूक अपक्ष लढवत ८८३०३ मते, तर मुश्रीफ यांनी १ लाख १६ हजार अशी सर्वाधिक मते घेऊन विजयाची नोंद केली. त्यांनी घाटगे यांच्यावर २८,१३३ मतांनी विजय मिळवला. ही माझी शेवटची निवडणूक आहे असे भावनिक आवाहन करणारे शिवसेनेचे संजय घाटगे यांना ५५६५७ मते मिळाली होती. या निवडणुकीत अपक्ष लढणाऱ्या समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांना कडवे आव्हान दिले होते.

हेही वाचा : शरद पवारांनी जाहीर केला पहिला उमेदवार; व्यासपीठावरूनच म्हणाले, “यांना तुम्ही विधानसभेत पाठवा!”

शरद पवारांनी मुश्रीफ यांची चिंता वाढवली

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राज्यातील राजकीय समि‍करणे बदलली. अजित पवार हे भाजप व शिंदेंच्या शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे महायुतीत कागलची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार हे स्पष्ट झाले. भाजपाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतु, हसन मुश्रीफ यांना कागलमधून उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळाल्यानंतर नाराज झालेल्या समरजीत घाटगे यांनी ऐन निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. समरजीत घाटगे हे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असतील.

शाहू उद्योग समूहाचे नेते समरजित घाटगे यांनी गेल्यावेळी पदार्पणातच चांगली मते घेतली होती. गेली पाच वर्षे त्यांनी निवडणूक लढवण्याच्या निर्धाराने नियोजनबद्ध पावले टाकली आहेत. राधानगरी धरण येथे शाहू जयंती साजरी करताना त्यांनी पुढील वेळी येताना आमदारकीचा गुलाल लावून येणार असा निर्धार व्यक्त केला. समरजित घाटगे यांचा शाहू साखर कारखान्यामुळे कागल आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात प्रभाव आहे.

हेही वाचा : Prithviraj Chavan : “महायुतीला तीन अंकी संख्याही गाठता येणार नाही, आम्ही १८३ जागा…”, पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत

समरजित घाटगेंना मंत्रीपद देणार, पवारांची घोषणा

भाजपाचे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शरद पवार म्हणाले, समरजित घाटगे यांना कागलकरांनी मोठ्या मतांनी निवडून द्यावे. महाराष्ट्राच्या विधानसभेत ते नुसते आमदार राहणार नाहीत. त्यांना तिथे हवे ते काम करण्याची संधी दिली जाईल. हा विचार माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून आहे.