कोल्हापूर : कर्नाटक शासनाच्या कृष्णाकाठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच फुटाने वाढवण्यासाठी गतीने पावले पडू लागली आहेत. या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकचा भाग सुजलाम सुफलाम होणार असला तरी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत बुधवारी विधिमंडळात आमदारांनी आवाज उठवला. तर पूर अभ्यासकांनीही याबाबत महाराष्ट्राने सजग राहण्याची गरज व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर कर्नाटकातील दुष्काळ निवारण आणि सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी अलमट्टी धरणाची उभारणी करण्यात आली आहे. अलमट्टी धरणाची पाणी पातळी सध्या ५१९.६० मीटर आहे. अलमट्टी धरणामुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका वाढत असल्याची भीती काही तज्ज्ञांनीही व्यक्त केलेली आहे. याबाबत वडनेरे समितीनेही सूचक विधान केलेले आहे.

हेही वाचा : बांगलादेशातील अस्थिरतेमुळे महाराष्ट्रातील गारमेंट उद्योगाला गती, तयार कपडे निर्मितीच्या मागणीत दुपटीने वाढ

बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची ५२४.२६ मीटर पर्यंत वाढवण्याचा निर्णय एका बैठकीवेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला. इतकेच नव्हे तर कृष्णाकाठ योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी सव्वा लाख एकर भूसंपादन, पुनर्वसन याला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढल्याने कर्नाटकातील सिंचनाखाली येणाऱ्या जमिनीचे प्रमाण वाढणार आहे. तेथे बारमाही पाणी मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे. हा प्रकल्प कर्नाटकसाठी जीवनदायी ठरणार असला तरी दुसरीकडे तो पश्चिम महाराष्ट्राला मृत्यूच्या दाढेखाली नेणारा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : काळम्मावाडी धरणाच्या गळतीवर तातडीने उपाययोजना करावी, सतेज पाटील यांची मागणी

अलमट्टी धरणाच्या सध्याच्या उंचीमुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुराचा फटका बसत असतो. ही उंची आणखी वाढल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे. कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची पाच फूट उंची वाढवण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. भूसंपादन गतीने होत आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून धरण उंची वाढीचे आणि भूसंपादनाच्या कामाला स्थगिती मिळवावी. अन्यथा पुराखाली येणारी गावे कायमची नष्ट होण्याची भीती आहे.

आमदार चंद्रदीप नरके

हेही वाचा : लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड

महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात जावे. २००५ सालच्या महापुरावेळी अलमट्टी धरणाचा फुगवटा नृसिंहवाडीपर्यंत पोहोचला होता. आता तो सांगली जिल्ह्यातील डिग्रजपर्यंत पोहोचला असल्याचे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने केलेल्या रेखांकनाने सिद्ध झाले आहे. आता धरणाची उंची पाच फूट वाढली तर कोल्हापूर, सांगली जिल्हा हा जलमय होणार, हे उघड आहे. महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभागाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अलमट्टी धरण उंची वाढीला स्थगिती मिळवली पाहिजे.

सर्जेराव पाटील, निमंत्रक, कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती, सांगली.
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka government krishna river project almatti dam increase chances of flood in western maharashtra css