कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी रंगपंचमीत वनस्पतीजन्य रंगांची उधळण होणार आहे. कोल्हापूर शहर व बारा तालुक्यांमध्ये वनस्पतीजन्य रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक, त्यांचा वापर व महत्त्व पटवून देण्याचे कार्य पार पडले असल्याने प्रतिसाद वाढला आहे.दलित मित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचलित निसर्ग मित्र परिवार व आदर्श सहेली मंच २००८ सालापासून वनस्पतीजन्य रंगनिर्मिती, प्रात्यक्षिक, जनजागृती व वनस्पतीजन्य रंगांच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.

मागील पंधरा वर्षांमध्ये विविध उपक्रमाला शहरातील अनेक पर्यावरणस्नेही कुटुंबांनी हातभार लावला. आदर्श सहेली मंचच्या महिलांकडून दरवर्षी वनस्पतीजन्य बनवले जाते. पर्यावरण प्रेमी लोक देणगीशुल्का मध्ये रंग विकत घेतात. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत हे रंगाचे प्रमाण कमी होते.ही कमतरता यंदा भरून काढण्याकरिता रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनस्पतीजन्य रंग बनवण्याचे प्रात्यक्षिक, त्यांचा वापर व महत्त्व पटवून देण्याचे कार्य युवराज तिकोणे, शामराव कांबळे, आनंद ठोंबरे, डॉ. विजय मगरे, संजय बुटाले, अनिल मगर, संदीप पाटील,पराग केमकर, शहाजी माळी, विजय ओतारी, अमोल सरनाईक आदींनी केले.

पाच हजार कुटुंबीय सहभागी

बेल, शेंद्री, पळस, काटेसावर, जांभूळ, कडूलिंब, झेंडू, गुलाब, हळद, हिरडा, बेहडा, आवळा इ. अशा एकूण ४० वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे. आम्ही यावर्षी नैसर्गिक रंग स्वतः बनवून त्याचा रंगपंचमीकरिता वापर करू, असा निर्धार जिल्ह्यातील सुमारे ५ हजार कुटुंबांनी केला आहे, अशी माहिती निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी शनिवारी दिली.

रंगनिर्माण वनस्पतींची रोपे
आदर्श सहेली मंचाच्या महिलांकडून १ हजार किलो वनस्पतीजन्य रंग तयार झाले आहेत. रंगनिर्माण वनस्पतींची रोपे देखील तयार करण्यात आली आहेत, अशी अध्यक्षा राणिता चौगुले यांनी दिली.

Story img Loader