कोल्हापूर : वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली असून महावितरणची १८ कार्यालये आणि कर्मचारी निवासमधील ३२३ सदनिका अशा ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट बसविण्यात आले आहेत.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविताना सर्वप्रथम महावितरणची कार्यालये आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची सूचना केली आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी वरदान ठरणाऱ्या या उपक्रमामध्ये महावितरणने स्वतःपासून सुरुवात करून उदाहरण घालून द्यावे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : इचलकरंजी महापालिकेची अतिक्रमण मोहीम दुसऱ्या दिवशीही सक्रिय; हातगाडे, फलक जप्त

नागपूर शहरात ६०, गोंदियामध्ये १४६, वर्धा येथे ३०, भंडारा येथे १० आणि चंद्रपूरमध्ये ९५ अशा एकूण ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये महावितरणची कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्व ग्राहकांच्या कार्यालय अथवा निवासस्थानी विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता प्रत्यक्ष मीटर बसविण्यात येत आहेत. वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहेत. तसेच संबंधित कंपन्यांवर या मीटरची दहा वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याचे बंधन आहे.

महावितरणच्या वीज ग्राहकांना देण्यात येणारे स्मार्ट मीटर हे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यामुळे वापरलेल्या विजेची अचूक नोंद होईल तसेच वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर नियमितपणे आपला वीजवापर समजेल. सध्या सर्वत्र वापरात असलेल्या पारंपरिक मीटरच्या बाबतीत चुकीचे रिडिंग होणे, वेळेवर रिडिंग झालेले नसणे, चुकीची बिले येणे, अशा काही समस्या जाणवतात. मोठा वीजवापर झाल्यानंतर बिल मिळाले की अचानक ग्राहकाला आपल्या वीजवापराबद्दल समजते आणि धक्का बसतो. अत्यंत पारदर्शी पद्धतीने अचूक बिलिंग हे स्मार्ट मीटरचे वैशिष्ट्य आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या बिलाविषयीच्या तक्रारींचे संपूर्ण निराकरण होईल. असे मीटर वापरणे काळाची गरज झाली आहे.

हेही वाचा : इचलकरंजी महापालिकेच्या शाळांची दुरवस्था; प्रशासनाचा भोंगळ कारभारच जबाबदार

या राज्यात स्मार्ट मीटरचा वापर

देशामध्ये मध्य प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात स्मार्ट मीटरचा वापर काही प्रमाणात सुरू झाला आहे व तेथील ग्राहक अचूक बिलिंग आणि वीजवापराची नियमित माहिती मिळणे या सुविधेचा वापर करत आहेत.