कोल्हापूर : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील शेतकरी कुटुंबाची चिकोत्रा प्रकल्पामध्ये चुकीच्या पद्धतीने जमीन संपादित झाली होती. त्या विरोधात कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या शेतकरी कुटुंबाने उपोषणाचा ठिया मारला होता. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि या शेतकरी कुटुंबाने त्यांच्या हस्ते सरबत पिऊन शुक्रवारी उपोषण सोडले.

याबाबत अधिक माहिती अशी, या गावात हरी लक्ष्मण पाटील या एकाच नावाच्या तीन व्यक्ती आहेत. त्यामध्ये हरी लक्ष्मण पाटील-श्रावण, हरी लक्ष्मण पाटील -तळपोटे आणि हरी लक्ष्मण पाटील -लांबडीचा असे तिघे आहेत. दरम्यान; हरी लक्ष्मण पाटील -श्रावण यांची मूळ जमीन साडेसात एकर आहे. परंतु; एकाच नावामुळे उर्वरित दोन शेतकऱ्यांचीही जमीन या एकाच शेतकऱ्याच्या आठ – अ खाती नोंद झाली. साहजिकच १९९९ पासून त्यांची जमीन कागदोपत्री एकूण १४ एकर झाली.

हेही वाचा – संजय मंडलिक यांच्या पराभवाला हसन मुश्रीफ जबाबदार? भाजपच्या निष्कर्षाने कोल्हापुरात महायुतीत वादाची ठिणगी

चिकोत्रा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी चार एकरच्या स्लॅबनुसार श्री हरी लक्ष्मण पाटील- श्रावण यांची ९३ गुंठे जमीन संपादित होणे कायदेशीर होते. परंतु; प्रत्यक्षात त्यांची एकूण १६० गुंठे जमीन संपादित झाली. हेलपाटे मारूनही दुरुस्ती होत नसल्यामुळे कै. पाटील यांची तिन्ही मुले बाळू हरी पाटील, काळू हरी पाटील आणि पांडुरंग हरी पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी उपोषणाला बसलेल्या शेतकरी कुटुंबाची भेट घेतली. त्यांची समस्या ऐकून घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच उपोषणस्थळी पुनर्वसन अधिकारी स्नेहल बर्गे यांना बोलावून घेतले. बर्गे यांनी ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीवरील नसून त्यासाठी आयुक्तांच्या परवानगीची गरज असल्याचे सांगितले. त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी आयुक्तांच्या नावाने तसा प्रस्ताव आजच्या आज करण्याच्या सूचना श्रीमती बर्गे यांना दिल्या.

हेही वाचा – कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी घेरा डालो मोर्चा; ११ जिल्ह्यांमध्ये निदर्शने, उपोषण करण्याचा संघर्ष समितीचा निर्णय

पाटील कुटुंबियांशी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, जमीन संकलनामध्ये झालेली ही तांत्रिक चूक वास्तविक त्यावेळेस दुरुस्त व्हायला हवी होती. परंतु; ती झाली नसल्यामुळे या कुटुंबावर अन्याय झाला आहे. या प्रकरणात मी स्वतः लक्ष घातले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. आयुक्त आणि वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करू. यावेळी शशिकांत देसाई, सागर पाटील, उत्तम पाटील, पुंडलिक पाटील, विठ्ठल पाटील, प्रमोद पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.