कोल्हापूर : गव्याने धडक दिल्याने मोटरीतून प्रवास करणारे तिघेजण जखमी झाले. ही घटना राधानगरी जवळ सोमवारी घडली आहे. यामध्ये निलेश अर्जुन मर्गज (रा. सिंधुदुर्ग), आकाश महेश पाटील, महेश श्रीकांत पाटील (दोघे रा. कोल्हापूर) असे तिघेजण जखमी झाले असून मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे.
निलेश, महेश, आकाश हे तिघेजण मोटारीने कोकणात निघाले होते. निपाणी – देवगड राज्य मार्गावर राधानगरी जवळून ते जात होते. हा भाग घनदाट जंगलाचा असून राधानगरी हे गव्याचे अभयारण्य म्हणून ओळखले जाते. सांगावकर मळ्यासमोरून ते जात असताना बिथरलेल्या गव्याने अचानकपणे मोटारीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये तिघेही जखमी झाले. तसेच मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा – कोल्हापूरात मद्यपी मित्राकडून मित्राचा गळा दाबून खून
हेही वाचा – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यासाठी निर्भय पदभ्रमंती
वनपाल सूर्यकांत गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. गवा हल्ल्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने याबाबत उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.