कोल्हापूर : पावसाला नुकतीच कोठे सुरुवात झाली असताना दरडी कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. अनुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मार्गाला होणारी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या वीस तासाहून अधिक काळ दरडोळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वर्षीच्या पावसाळ्यातील दरड कोसळण्याची ही या भागातील पहिलीच घटना आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात काल सायंकाळी दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान काल सायंकाळी साडेसहा वाजता पडलेली दरड काढण्याचे अद्यापही सुरू आहे. यामुळे तब्बल १५ तासांहून अधिक काळ रस्ता बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. काल दिवसभर राजापूर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू होती. तर यंदाच्या वर्षातील दरड कोसळण्याची ही पहिलीच घटना आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live Updates : ‘गुलाम जास्त आवाज करत नाहीत, शिंदे आणि अजित पवार आश्रित राजे’ – संजय राऊत

घाटातील सुरक्षित प्रवासासह घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दरम्यान, घाटातील रस्त्यात सायंकाळी कोसळलेली दरड आणि माती काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतु मोठमोठे दगड आणि दरडीचा भाग जास्त प्रमाणात कोसळल्याने तब्बल १५ तासांहून अधिक काळ मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू आहे. तशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील बावधनकर यांनी दिली.

हे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने लवकरच रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होणार असल्याची माहिती देण्यात आली. गत आठवड्यापासून मॉन्सून सक्रिय झाला असून तेव्हापासून तालुक्यामध्ये कमी-जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. मागच्या २४ तासांत राजापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने बाकाळे येथे घरांचे नुकसान झाले तर सायंकाळी उशिरा अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली.

हेही वाचा… रायगड : मुंबई गोवा महामार्गावर दरडींची टांगती तलवार, रुंदीकरणाच्या कामामुळे दरडींचा धोका वाढला

या मार्गावर दगड आणि मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आल्याने घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. वाहनांची नियमित वर्दळ असलेल्या या घाटात दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली आहे.कोकणामध्ये ये-जा करण्यासाठी शॉर्टकट मार्ग म्हणून या घटमार्गाची ओळख आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणाला जोडणारा पर्यायी मार्ग म्हणून अणुस्कुरा घाट महत्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अनेकजण कोल्हापुरात याच मार्गाने दळणवळणासाठी याच मार्गाचा वापर करतात.

परंतु मागच्या काही वर्षा या घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढल्याने जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तर रस्त्यांचीही काही ठिकाणी दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करण्याची वेळ येत आहे.