कोल्हापूर : जिल्ह्यातील सहकारी संस्था व सहकार तत्त्वावर चालणाऱ्या चळवळींना अधिक सक्षम, स्वयंपूर्ण, प्रभावी, समृद्ध करण्यासाठी सहकार दरबार मधून पाठबळ देण्यात येईल, असे  प्रतिपादन पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी येथे केले.त्यांच्या संकल्पनेतून शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यातील पहिल्या सहकार दरबारचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयत करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

सहकार अनुषंगिक १७३ तक्रार अर्ज, यात ऑनलाईन ११० तर प्रत्यक्ष ६३ तक्रार अर्ज दाखल झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, लोकांच्या अडचणी, त्यांच्या सूचना, त्यांनी सांगितलेल्या उणिवा याबाबत विचार करून भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे सेवा द्या. दाखल अर्जांचे वेळेत आणि प्राधान्याने निरसन करा. आपण पुन्हा आलेल्या तक्रारींवरील उत्तरांसह त्यांच्याकडे जावू. धोरणात्मक विषय असतील तर राज्य शासनाकडे मांडू.  भारतासारख्या कृषिप्रधान देशात सहकार चळवळीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. शेतकरी, कारागीर, लघुउद्योजक, महिला बचतगट, सहकारी बँका, दूध संघ यांसारख्या विविध घटकांना संघटित करून आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगती घडवून आणण्याचे सामर्थ्य या चळवळीत आहे. या चळवळीला प्रभावी बनवण्यासाठी आणि तिचा विकास समृद्ध दिशेने व्हावा, यासाठी सहकार दरबार एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल. येत्या काळात राज्यस्तरावरही अशाच पद्धतीचा उपक्रम हाती घेतला जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

लोकांना येणाऱ्या अडचणी वेळेत सुटल्यानंतर सहकारी संस्था अधिक सशक्त, पारदर्शक आणि कार्यक्षम बनतील, सभासदांचा सहभाग वाढेल व  विश्वास निर्माण होईल असे श्री.आबिटकर म्हणाले. नवीन सहकारी संस्था स्थापन होण्यास चालना मिळेल. ग्रामीण व शेती आधारित अर्थव्यवस्थेला सामूहिक विकासाची दिशा मिळेल. सहकार चळवळ ही केवळ आर्थिक प्रगतीचे साधन नसून ती सामूहिक नेतृत्व, लोकशाही मूल्ये आणि समाजघटकांच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. अशा चळवळीला सहकार दरबारासारख्या उपक्रमांमधून मिळणारे पाठबळ हे तिचे मूळ बळ आहे,असे त्यांनी सांगितले.

सावकारी कडे लक्ष

आजही ग्रामीण तसेच काही शहरी भागात खासगी सावकारांचा विळखा आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गावर घट्ट बसलेला आहे. गरजूंना तातडीची मदत हवी असते, पण बँका किंवा अधिकृत संस्थांकडून त्वरित कर्ज न मिळाल्यास ते खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकतात. ही आर्थिक गुलामी तोडण्यासाठी पोलीस विभागाने सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. अशा प्रकारची सावधगिरी घेतल्यास सामान्य माणसांचा न्यायावरचा विश्वास वाढेल आणि आर्थिक शोषणाला आळा बसेल.

सहकार आणि पोलीस विभागाने अनाधिकृत सावकारीवर नियंत्रण ठेवून गोरगरीबांना न्याय द्यावा. हा घटक सहकाराशी संबंधित असल्याने सावकारीबाबत आलेल्या तक्रारींचा निपटारा तातडीने केला पाहिजे अशा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पोलीस विभागाला सूचना केल्या. अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, प्रादेशिक सहसंचालक सहकारी संस्था कोल्हापूर गोपाळ मावळे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे  उपस्थित होते. सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनीही भेट दिली.प्रास्ताविकात विभागीय सहनिबंधक डॉ.महेश कदम यांनी राज्यातील पहिलाच नाविण्यपूर्ण उपक्रम असून यामध्ये गुगल लिंक द्वारे अर्ज स्विकारणे, क्यूआर कोडचा वापर करणे तसेच व्यापक प्रसिद्धी केल्याने सर्वसामान्यांना याठिकाणी मदत मिळण्यास सोपे होईल असे सांगितले. आभार कार्यालय अधीक्षक मिलींद ओतारी यांनी केले.