अत्यंत हीन पद्धतीच्या रूढी, परंपरा, अनिष्ट चाली या साऱ्या जोखडामध्ये राजस्थान अडकलेला होता. स्वयंसहायता गट आणि मेस्त्री महिला मंडळाच्या अथक प्रयत्नातून महिलांना भेटून त्यांचे संघटन करून बचतीची सवय लावल्याने महिला सबला झाल्या. संघटनाशिवाय हे होऊच शकले नसते, असे मत मेस्त्री महिला मंडळाच्या अध्यक्ष मीरादेवी चौधरी यांनी व्यक्त केले. स्वयंसिद्धा सस्थेचा २४वा वर्धापनदिन शाहू स्मारक भवन येथे झाला. या वेळी यशस्वी महिला-विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. या वेळी मानाचा समजला जाणारा ‘परिवर्तन दूत’ पुरस्कार मीरादेवी चौधरी यांना देण्यात आला. तसेच आरोग्यम धनसंपदा पुरस्कार डॉ. सूर्यकिरण वाघ यांना देण्यात आला. या कार्यक्रमात चौधरी बोलत होत्या. आपले अनुभव कथन करताना त्या म्हणाल्या, २००२पर्यंत राजस्थानच्या महिलांची स्थिती अत्यंत हीन होती. त्यांच्यासाठी काम करायला येणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांनी अक्षरश: पळवून लावले. पण अशा स्थितीतही संस्थांनी आपले महिला संघटन आणि प्रबोधनाचे काम सुरू ठेवले. चिकाटीमुळेच पूर्वी पाच रुपये बचत करणाऱ्या महिला आज महिन्याला २०० रुपये बचत करत आहेत. सध्या या महिलांकडे त्यांचे स्वत:च्या बचतीचे ५ लाख रुपये आहेत. ही संघटनेची शक्ती आहे. या कार्यक्रमात डॉ. मेघना कामत, विनय चोपदार, जयलक्ष्मी महिला बचतगट, कविता बावदणे, सायली शिंदे, प्रतीक्षा देसाई, वंदना उपाध्ये, पद्मश्री तेरदाळे, उत्तम पाटील, शिवराज भोसले, राजलक्ष्मी पवार, तारा दिवेकर, सचिन जाधव, रोहित शिंगार्डे, प्रणाली चव्हाण, पूजा गदगीमठ आदी कीर्तिवंतांना पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविक तृप्ती पुरेकर यांनी केले. आभार व सूत्रसंचालन शीतल माने यांनी केले. या वेळी डॉ. मेघना कामत, सुहास कोरगावकर, सूधर्म जामसंडेकर, आप्पासाहेब ताटे, स्मिता बेरी, व्ही. बी. पाटील, कांचनताई परुळेकर, अनिलराज जगदाळे, सौम्या तिरोडकर, जयश्री गायकवाड आदी उपस्थित होते.