Hasan Mushrif on Sharad Pawar: माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याक कार्यकर्त्याच्या मागे पवार साहेब का लागले आहेत? हे कळायला मार्ग नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. भाजपाचे कागल विधानसभेचे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीकास्र सोडले होते. लाचरीचा स्वीकार करणाऱ्यांना कागलकर धडा शिकवणार आणि साथ देण्याऐवजी सोडून जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असे आव्हान कागलमधून शरद पवार यांनी दिले होते. यावर प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी प्रतिआव्हान दिले आहे.

‘पवार साहेब तुमच्याशी वैर नाही..’

शरद पवार यांच्या कागलमधील आक्रमक पावित्र्यानंतर हसन मुश्रीफ माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादीतून ४० ते ५० आमदार फुटून बाहेर पडले. तरीही शरद पवार माझ्याच मागे का लागले आहेत. हे कळायला मार्ग नाही. पण यानिमित्ताने मी एकच सांगेन की, पवार साहेब तुमच्याशी माझे वैर नाही आणि समरजित तुझी आता खैर नाही. ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक अशी आहे.

हे वाचा >> “ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!

आपला मुद्दा स्पष्ट करताना हसन मुश्रीफ म्हणाले की, शरद पवार साहेबांनी कायम प्रजेचा आणि रयतेमधून आलेल्या सामान्य कार्यकर्त्यांचा प्रचार केलेला आहे. समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यामुळे काय परिणाम होईल, असा प्रश्न पत्रकारांनी हसन मुश्रीफ यांना विचारला. तेव्हा ते म्हणाले की, निवडणुकीत काय होईल? याचा निकाल जनता ठरवेल. कुणालाही कमी लेखून चालत नाही.

समरजित घाटगेंना मंत्रीपद देणार, पवारांची घोषणा

भाजपाचे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते म्हणाले की, समरजित घाटगे यांना कागलकरांनी मोठ्या मतांनी निवडून द्यावे. ते महाराष्ट्राच्या विधानसभेत ते नुसते आमदार राहणार नाहीत. त्यांना तिथे हवे ते काम करण्याची संधी दिली जाईल. हा विचार माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून आहे.

हे ही वाचा >> ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक

समरजित घाटगे यांना मंत्रि‍पदाची ऑफर दिल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी या ऑफरवर टीका केली. ते म्हणाले, मंत्री होण्यासाठी आधी निवडणुकीत निवडून यावे लागेल. मागच्या सहा निवडणुकांमध्ये मी विजय मिळविला आहे. तेव्हा माझ्यासमोर एकापेक्षा एक असे उमेदवार होते. तीन वेळा तिरंगी लढत झाली, तीन वेळा दोघांमध्ये लढत होती, तरीही मी विजय मिळवत आलो आहे.